भाज्यांची उन्हाची गरज

भाज्यांची उन्हाची गरज



बरेंचदा सर्वांनाच, त्यातही नवीन बागकर्मींना एक प्रश्न हमखास पडत असतो अन तो म्हणजे कुठल्या भाज्यांना किती उन लागतं. भाज्यांच्या, पेरणी ते काढणी या संपूर्ण जीवनचक्रात त्यांची उन्हाची गरज काय़ असते अन आपल्याकडं उपलब्ध असलेल्या उन्हात, मग ते थेट उन असो की सूर्यप्रकाश आपण कोणकोणत्या भाज्या घेऊ शकतो.

आपापल्या बागेमधे दिवसभरात पडणाऱ्या उन्हाच्या वेळा, प्रमाण, जागा अन त्याची तीव्रता हे सारं वेगवेगळं असतं. यामधे सुर्याच्या उत्तरायण अन दक्षिणायन यामुळं तर वर्षभर सतत बदल होत असतोच पण शेजारी-पाजारी होणारी बांधकामं अन बाहेरील किंवा आपणच आपल्या बागेत लावलेल्या झाडांची सतत होणारी वाढ यामुळंही उन्हाचे तास कमी अधिक होत असतात तसंच त्याची तीव्रताही कमी अधिक होत असते. हे सगळं आपल्या ताब्यात नसतं. यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. फार फार तर आपण आपल्या बागेतील वाढलेल्या झाडांची छाटणी करु शकतो. पण इतर बाबतीत मात्र आपल्याला अन आपण लावलेल्या रोपांना मिळेल तेवढ्या उन्हावर अन सूर्यप्रकाशावरच भागवून घ्यावं लागतं.

या लेखात आपण किती उन्हात कोणकोणत्या भाज्या लावू शकतो हे पहाणार आहोत. यासाठी आपण तीन प्रमुख गटांत भाज्यांची विभागणी करणार आहोत.
ते गट असे ;
६ ते ८ तास थेट उन आवश्यक असलेल्या भाज्या
४ ते ६ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या
२ ते ४ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या

इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी अन ती म्हणजे कुठल्याही वनस्पतीच्या वाढीसाठी उन्हाची गरज ही कमी-जास्त प्रमाणात आवश्यकच असते. त्यामुळंच फळांना चव अन फुलांना रंग मिळत असतो. परंतु काही भाज्या कमी उन्हातही तग धरु शकतात अन फुलतात व फळतातही. अर्थात अशा भाज्या जर उन्हात असत्या अन आपण त्यांची पूर्ण काळजी घेत त्यांना वाढवलं असतं तर त्यांच्या रंगरुपात अन चवीत नक्कीच फरक पडला असता. पण तरीही समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग या न्यायानं त्या वाढतात अन आपली अन्नाची गरज भागवतात.

६ ते ८ तास थेट उन आवश्यक असलेल्या भाज्या : टोमॅटो, वांगी, काकडी, मिरची, मका, दुधी व लाल भोपळा, भेंडी, चवळी व इतर शेंगवर्गीय भाज्या, तसंच सर्व वेलवर्गीय भाज्या यांना जेवढं जास्त उन मिळेल तेवढी त्यांची वाढ उत्तम होते. अर्थात तीव्र उन्हाच्या दिवसांत दुपारच्या वेळी म्हणजे साधारण सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच-तीन या वेळांत या भाज्यांवर सावली येईल अशी व्यवस्था केली तर ते अधिक फायद्याचं होईल. उन जास्त म्हणजे पाण्याची गरज जास्त हे गणित ठरलेलं. कारण कुंडीत लावलेल्या भाज्यांना पाण्यासाठी सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून रहावं लागतं. त्यामुळं या भाज्यांना पाण्याचा ताण बसू देऊ नये. 

४ ते ६ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या : बीट, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, गाजर, कांदा, लसूण, मटार, बटाटा, मुळा, आलं वगैरे भाज्या, म्हणजेच बहुतांशी कंदवर्गीय भाज्या अर्धसावलीत छान वाढतात. तीव्र उन वा प्रमाणाबाहेर जास्त उन असल्यास यांची वाढ व्यवस्थित होत नाही. कोबी, फ्लॉवर सारख्या भाज्यांची वाढ अतीउन्हात कमी होतेच पण त्यांच्या चवीतही फरक पडतो. ज्या भागात उन तीव्र असतं तिथं मोठ्या वृक्षांच्या सावलीत यांची लागवड केली तर उपलब्ध जागेचा वापरही होतो अन भाज्याही मिळतात.

२ ते ४ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या : मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर वगैरे सर्व पालेभाज्या तसंच लेट्यूस वगैरेंसाठी कमी उन असल्यास त्यांची वाढ उत्तम होते. साधारणतः पालेभाज्या कोवळ्या असतानाच खाल्ल्या जात असतात. त्यामुळं कमी उन्हात जर त्या वाढवल्या तर त्यांचे सर्व गुण अन चव अबाधित रहाते.

आपल्या बागेत किती उन येतं, दिवसाच्या कुठल्या वेळांत ते बागेमधल्या कुठल्या भागात अन किती प्रमाणात अन तीव्रतेत असतं याचा अभ्यास सुरुवातीचे काही दिवस तसंच वर्षभरांतल्या वेगवेगळ्या मोसमात करुन त्याप्रमाणं नियोजन करुन भाज्या लावण्याच्या जागा ठरवाव्यात. अर्थात आपण कितीही अभ्यास केला, अन त्याप्रमाणं ठरवलं तरीही शेवटी तो निसर्ग आहे हे एक अन सभोवतीच्या इमारती व मोठी झाडं वगैरेंमुळं सर्वच दिवस सारखे नक्कीच नसणार.

यासाठी आपल्या उपलब्ध जागेनुसार आपण झाडांची अन कुंड्यांची रचना करुन त्याप्रमाणं मिळणाऱ्या उन अन सावली यांमधे आपण भाज्या लावून त्यांची गरज भागवु शकतो. जास्त उन लागणाऱ्या भाज्या मधल्या मोकळ्या जागेत लावून वा त्या ठिकाणी कुंड्या ठेवून मोठ्या झाडांच्या पडणाऱ्या सावलीमधे कमी उन्हाची अन सूर्यप्रकाशाची गरज असणाऱ्या भाज्या आपण लावू शकतो. बागेत सावली असणारा भाग नक्कीच असतो. त्या भागात सावलीत वाढणाऱ्या भाज्या लावून तीही जागा आपण उपयोगात आणू शकतो.

बागेच्या ज्या भागात थेट उनच नव्हे तर सूर्यप्रकाशही अभावानंच पडत असेल तिथं आपण फुलझाडं वा ओर्नॅमेंटल झाडं लावु शकतो. ओर्नॅमेंटल वा इनडोअर प्रकारात मोडणारी झाडं अशा भागात छान वाढतात. ज्या भाज्यांना भरपूर उन आवश्यक असतं अन जी आपण एका रांगेत जर लावत असू तर अशा झाडांच्या रांगा उत्तर दक्षिण ठेवल्या तर सर्वच झाडांना सकाळ ते संध्याकाळ समान उन मिळेल. उन्हात वाढणाऱ्या भाज्यांच्या मुळांपाशी कुंडीत अर्धसावलीत वाढणाऱ्या भाज्या लावल्या तर एकाच खतात दोन भाज्या तर घेता येतातच, पण कमी जागेत जास्त भाज्या आपल्याला मिळू शकतील.

पूर्ण उन्हाची गरज असलेल्या भाज्या अर्ध उन्हात अन अर्ध उन्हात होणाऱ्या भाज्या जर सावलीत लावल्या तर त्या फळणार नाहीत असं नाही तर त्यांना लागणारी फळं रंग अन आकारानं कमी असतील. चव तीच असेल पण संख्या कमी असेल. आणि कळी ते पक्व भाजी हा काळही जास्त असेल. कारण एकच. त्यांना वाढीसाठी आवश्यक असणारं उन कमी प्रमाणात मिळेल अन त्यामुळं मिळणारी जीवनसत्वं अन अन्नद्रव्यं कमी मिळतील ज्यांची उणीव आपण खतांद्वारे भरून काढु शकणार नाही. म्हणून आपल्या जागेनुसार काय लावायचं ते ठरवा अन त्याप्रमाणंच बागेकडून अपेक्षा ठेवा. शेवटी आपल्या बागेत पिकलेला टोमॅटो बाजारातल्याप्रमाणं दोन इंच व्यासाचा नसला तरी तो आपण स्वतः पिकवला आहे अन त्याला कुठलं खत अन पाणी कुठलं दिलं आहे ते आपल्याला माहीत आहे अन त्यावर आपला अंकुश आहे हे महत्वाचं.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

तयारी हिवाळी बागेची

तयारी हिवाळी बागेची 



गेल्या लेखात पावसाळ्यानंतर आपल्या बागेत काय कामं करायची ते आपण पाहिलं. त्याप्रमाणं बरीच कामं झालीही असतील. नसतील झाली तर ती उरकुन घ्या. कारण बाग जेवढी स्वच्छ अन आटोपशीर तेवढी कामं करायला मजा तर येतेच पण कीड अन इतर रोग यांपासुनही आपली बाग मुक्त रहाण्यास मदत होते. अजुनही कुठं किडींना लपण्यासाठी जागा शिल्लक असेल तर तीही स्वच्छ करुन घेतलेली बरी.

हिवाळ्यातलं उन तितकंसं तीव्र नसतं, अर्थात ऑक्टोबर हीट जर तुमच्या भागात जास्त तीव्र असेल तर उन्हाळ्यात जशी आपल्या बागेची काळजी घेता तशीच ती याही महिन्यात घ्यावी लागेल. पण त्यानंतर मात्र सर्वत्र उत्साहाचं अन प्रसन्न वातावरण असतं. आपापल्या घरांतही सणासुदीचं अन उल्हासाचं वातावरण असतं. बागेत फुलपाखरं बागडत असतात. फुलझाडंही भरभरुन फुलत असतात. या दिवसांत बागकाम करण्यातही खूप उत्साह असतो. कारण कितीही काम केलं तरी घाम नाही अन त्यामुळं येणारा शिणवठा वा थकवाही नाही.

या सीझनमधे बागेत खूप भाज्याही घेता येतात. त्याची तयारी दोन आठवड्य़ांपूर्वी सांगितल्याप्रमाणं तुम्ही केलीच असेल, नसेल केली तर ती लगेचच करायला घ्या. या दिवसांत उन्हाचा तडाखा कमी असल्यामुळं सर्व प्रकारच्या पालेभाज्या आपल्याला लावता येतील. तसंच कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची वा भोपळी मिरची, मुळा, गाजर, वाटाणा, हरभरा, वाल वगैरेंसह वांगी टोमॅटो अन मिरचीही आपल्याला घेता येतील. उन कमी म्हणजे पाण्याची गरज कमी रहाणार. म्हणजेच कमी पाण्यात आपल्याला भरपूर पीक घेता येईल.

पावसाळी पिकं घेण्यासाठी तुम्ही काही रोपं बागेत लावली असतील अन त्यापासून भाज्याही घेतल्या असतील. आता त्यांना भाज्या येणार नाहीत किंवा आल्याच तर त्या संख्येनं अन आकारानं खूपच कमी अन लहान असतील. झालंच तर त्यांच्या अंगाखांद्यावर अन मुळाशी किडींचं आगार तयार झालं असेल. त्यामुळं अशी खराब झालेली झाडं अन वेली पूर्णपणं काढून घ्या. जर मोकळी जागा भरपूर असेल ते उन्हात वाळण्यासाठी पसरुन ठेवा. रोज किंवा एक दिवसाआड ते उलट सुलट करा म्हणजे उष्णतेनं कीड असलीच तर मरुन जाईल. त्यानंतर त्यांचे तुकडे करुन कंपोस्टमधे टाका. वांगी, मिरची सारखी काही झाडं तीन-चार वर्षं टिकतातही अन फळंही देत रहातात. त्यामुळं अशी झाडं ठेवलीत तरी चालेल. फक्त अशा झाडांची खोलवर छाटणी करुन घ्या. मूळ खोडापासून चार पाच इंच फांद्या ठेवुन फांद्यांची टोकं छाटा. म्हणजे नवीन फूट येऊन अधिक फळं मिळतील.

यानंतर आपली बागेसाठीची जागा, आपली आवड वगैरे गोष्टींचा विचार करुन काय काय भाज्या, फुलझाडं लावायची याचं व्यवस्थित नियोजन करुन घ्या. त्यासाठी काय काय लागेल, म्हणजे कुंड्या, खतं अन मुख्य म्हणजे बिया वगैरे गोष्टी ठरवुन घ्या अन त्याची व्यवस्था करा. काय़ लावायचं ते ठरल्यावर त्या त्या प्रकाराची उन्हाची गरज, व्यवस्थित अन पूर्ण वाढ होण्यासाठी लागणारी जागा, पुढं जाऊन सपोर्ट हवा असल्यास तो कसा देता येईल हे पहा अन त्यानुसार जागा निवडा. वर उल्लेख केलेल्या भाज्यांपैकी काही भाज्या अन काही फुलझाडं यांची रोपं करुन घेणं गरजेचं असतं. ती थेट त्यांच्यासाठी नियोजित केलेल्या जागी लावता येत नाहीत. म्हणून जर आधी रोपं तयार करण्यास ठेवली नसतील तर ती लगेचच ठेवा. त्यासाठी सीडलिंग ट्रे हवाच असं काही नाही. एखाद्या मोकळ्या कुंडीत किंवा पेपर कप्समधेही आपल्याला रोपं तयार करता येतील. पाणी वा सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या, मॅक़डीचे कप्स अन ग्लासेस. आईसक्रीमचे कप्स देखील चालतील. हे जर गेल्या दोन आठवड्यांत केलं नसेल तर त्यासाठी आपल्याकडं ऑक्टोबर महिना आहे. फक्त या महिन्यातलं हवेतलं तापमान लक्षात घेता रोपं उगवुन ती किमान सहा ते आठ इंच मोठी होईपर्यंत त्यांच्यावर थेट उन पडणार नाही पण सूर्यप्रकाश मात्र मिळेल याची काळजी घ्या.

हिवाळी बागेत ज्या भाज्या लावल्या जातात त्यांची संख्या इतर ऋतुंमधल्या भाज्यांपेक्षा निश्चितच जास्त असते. पण यासोबतच या भाज्यांचा लावणीपासून ते काढणीपर्यंतचा काळ तुलनेनं खुपच अल्प असतो. अन म्हणूनच सर्वांनी, निदान नवीन बागकर्मींनी या मोसमात भाज्यांचं पीक घेणं चांगलं. कारण त्यामुळं भाज्यांसोबतच बागकामामधला आत्मविश्वास अन उत्साह दोन्हीही वाढेल. हाताला यश मिळालं की ते काम पुढं नेण्यात उत्साह टिकून रहाण्यास मदत होते.

या मोसमात एरवी वर्षभर आपण घेत असलेल्या वांगी, टोमॅटो, भेंडी याव्यतिरिक्त कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, सिमला मिरची, कारली, काकडी, पालक, माठ, अंबाडी, कोथिंबीर, लेट्यूस, गाजर, मुळा, बटाटा, पांढरा व लाल, बीट, कांदा, लसूण, इत्यादी भाज्या तसंच वाटाणा / मटार, चवळी, फरसबी, घेवडा सारख्या शेंगवर्गीय भाज्या देखील या दिवसांत आपण आपल्या बागेत घेऊ शकतो. यासोबतच ऍस्टर, शेवंती, झेंडू, डेलिया, पिटुनिया, होलीहॉक, कार्नेशन, झिनिया, (आवडत अन चालत असेल तर) कॉसमॉस वगैरेंसारखी फुलझाडं अन सर्वांचा ऑल टाईम फेवरिट गुलाबही आपण लावु शकतो. बागेत फुलझाडं लावताना नेहमी भाज्यांच्या आसपास अन भाज्यांच्या दोन तीन कुंड्यांच्या जवळ एखादं फुलझाड किंवा जर वाफे करुन भाज्यांची लागवड केली असल्यास वाफ्यांच्या भोवती दोन चार फुलझाडं लावण्यानं कीडीपासून संरक्षण अन परागीभावनाची नैसर्गिक सोय असा दुहेरी फायदा होतो.

या मोसमात भाज्यांची लागवड करताना खतांची फारशी गरज पडत नाही. कारण फारसं उष्ण नसलेलं वातावरण, हवेतला गारवा अन शुद्ध हवा याचा झाडांच्या पोषक वाढीसाठी फार फायदा होतो. त्यामुळं भाज्यांसाठी वाफे तयार करताना वा कुंड्या भरताना भरपूर कंपोस्ट, हिरवळीचं खत अन एरवी जे काही पॉटिंग सॉईलसाठी वापरत असाल ते थोड्या प्रमाणात वापरलंत तरी चालेल. अर्थात नीमपेंड अन बोनमिल वा स्टेरामील याचा योग्य तो वापर करण्यास विसरु नका. या दोन गोष्टी रोपांची फुलण्या-फळण्यासाठी लागणारी टॉनिक्स आहेत. त्यातही फळभाज्यांची खतांची गरज ही पालेभाज्या अन फुलझाडं यांच्यापेक्षा जास्त असते. त्यामुळं तयार करण्यात येणारा वाफा किंवा कुंड्या हे झाडांच्या कोणत्या प्रकारांसाठी वापरणार आहात हे पाहून त्यानुसार खतांची विभागणी करा.

बिया पेरल्यानंतर वा रोपं ट्रान्स्प्लांट केल्यानंतर मल्चिंग करणं अतिशय गरजेचं आहे. उन्हाळ्यात आपण मल्चिंग करतो ते झाडांना दिलेल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून. पण या दिवसांत मल्चिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे झांडांच्या मुळांशी सम तापमान राखलं जातं. थंडी वा हवेतील गारवा कमी जास्त होतच रहातो, पण मल्चिंगमुळं मुळांजवळचं तापमान योग्य त्या प्रमाणात राखलं जातं. याच बरोबर पाण्याचं प्रमाणही राखलं जात असल्यामुळं जास्त पाणी देण्याचीही गरज भासत नाही. एवढंच नाही तर या दिवसांत ड्रिप सिस्टिम वगैरेंचीही फारशी गरज पडत नाही.

रोपं लहान असताना किंवा बिया पेरल्या असताना जर अचानक पाऊस आला तर रोपांचं पावसापासून संरक्षण करण्याला पहिलं प्राधान्य द्या. बागेत नियमित लक्ष द्या. खास करुन सकाळच्या वेळी. कोवळ्या उन्हात बागेत जर फुलपाखरं किंवा मधमाशा दिसत असतील तर परागीभवन नैसर्गिकरित्या होईल याची खात्री बाळगा. पण जर फुलपाखरं नसतील किंवा कमी प्रमाणात असतील तर परागीभवन तुम्हालाच करावं लागणार हे ध्यानात ठेवा. त्यासाठी छोटा पेंट ब्रश अथवा इअर बड्स वगैरे हाताशी लागतील अशा ठिकाणी ठेवा. लक्षात ठेवा परागीभवनाअभावी कारली, दुधी, काकडी वगैरेंसारखी फळं बाल्यावस्थेतच काळी वा पिवळी पडून गळुन जातात. परागीभवन नैसर्गिकपणं होत नसेल तर ते तुम्हालाच करायचं आहे. एकदा परागीभवन झालं. की फळाची वाढ सुरु होते अन पुढच्या टोकाचं फूल सुकुन गळुन पडतं.

रोपांवर कीड अन रोग पडणं हे अगदीच कॉमन आहे. कितीही काळजी घेतलीत तरी ते होतच असतं. निसर्गाचं चक्रच आहे ते. यासाठी वरचेवर झाडांची, पानांच्या मागच्या बाजूची पहाणी करत रहा. त्यासोबतच बुंध्याजवळची मातीही हलकेच, मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घेत मोकळी करत रहा. दर पंधरा-वीस दिवसांनी कुंडी वा वाफा यांच्या आकारानुसार नीमपेंड मातीत मिसळून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी कडुलिंबाचा हिरवा पाला आपल्या गरजेच्या प्रमाणात आणून तो हातानंच चुरडून एखाद्या बादलीत वा टबात पाणी घेऊन त्यात दोन-तीन दिवस भिजत ठेवावा. नंतर ते पाणी गाळून घेऊन बाटलीबंद करुन सावलीत ठेवावं अन दर दहा-पंधरा दिवसांनी स्प्रे बॉटलमधे थोडं घेऊन त्यात दहापट साधं पाणी मिसळून ते सर्व झाडांवर फवारावं. यामुळं बहुतांश कीड नष्ट होईल. असा तयार केलेला अर्क सावलीत ठेवल्यास सहा महिने तरी चांगला राहील. समजा वास आलाच तरी काळजीचं काही कारण नाही. पुन्हा सहा महिन्यांनी असाच अर्क तयार करुन ठेवल्यास पुढच्या सहा महिन्यांचीही सोय होईल. लक्षात घ्या की आपण जर भाज्यांवर कीटकनाशक फवारणार आहोत तर ते सेंद्रीय अन आपल्या पोटात त्याचा थोडा अंश चुकुन गेलाच तर आपल्याला अपाय होणार नाही असंच असायला हवं. त्यामुळं बाजारात तयार मिळणारं कुठलंही कीटकनाशक शक्यतो वापरु नका. कारण आपल्या बागेत तयार होणाऱ्या भाज्या आपण खाणार आहोत. त्या शोभेसाठी लावलेल्या नाहीत. आणि किटकनाशक फवारताना ज्या भाज्या काढणीसाठी तयार होत आल्या आहेत त्यांच्यावर फवारणी करु नका. फळं काढायच्या अन पालेभाज्या तोडायच्या तीन चार दिवस आधी फवारणी करणं टाळा. म्हणजे काळजीचं काही कारण उरणार नाही.

हिवाळ्यात अन्नाचं पचन उतम प्रकारे होत असतं. खाण्याचे भरपूर अन विविध प्रकार करावेसे वाटतात. अशा दिवसांत आपल्या बागतेल्या आपणच पिकवलेल्या भाज्या खाण्यामधलं अन सूप वगैरे पिण्यामधलं सुख हे अतुलनीय आहे. आशा आहे की या टीप्स आपल्याला उपयोगी पडतील अन स्वनिर्मितीच्या आनंदासह तुमच्या बागेतल्या सेंद्रीय पद्धतीनं तुम्हीच पिकवलेल्या भाज्या खाण्याचाही आनंद तुम्हाला मिळेल.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

पावसाळ्यानंतरची बागेतील कामे

पावसाळ्यानंतरची बागेतील कामे


पावसाळा आता बऱ्यापैकी संपत आला आहे. शेवटचा तडाखा देऊनच जरी तो जाणार असला तरी ते दिवसही फार दूर नाहीत. चार ऑक्टोबरपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल त्यामुळं साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस गेलेला असेल. त्यानंतर आपल्याला बागेत प्रचंड कामं असतील. पावसानं, त्यातुनही शेवटी काहीसा धसमुसळेपणानं पडलेल्या पावसामुळं बागेत खूपच पडझड झाली असेल. आपापल्या रहाण्याच्या ठिकाणानुसार या पडझडीचं प्रमाण कमीअधिक असु शकेल. पण तरीही त्यामुळं कामं कमी होणार नाहीत.

त्यातुन आपल्याला हिवाळ्यासाठीही बागेची तयारी करायची आहे. पण ते सारं नंतर आधी आपल्याला आपली बाग सावरायची आहे. तर वादळानंतर किंवा खूप दिवसांनी परत येऊन आपलं बंद घर उघडून जसं आपण पदर खोचुन किंवा बाह्या सरसावुन कामाला लागतो तसंच बागेतही पुष्कळ कामं करायची आहेत. ती कुठली ते आपण क्रमाक्रमानं पाहू.

बागेची साफसफाई : सर्वात आधी बाग छोटी असो की मोठी, ती साफ करायला घेणं महत्वाचं. पावसाळ्यात झाडं अस्ताव्यस्त वाढून एकमेकांत गुंतली असतील तर ती सोडवुन घेऊन प्रत्येकाला आपापल्या पायावर उभं करावं लागेल. कुंड्यांमधे किंवा झाडांच्या आळ्यांत आपण पावसाळ्यापूर्वी मल्चिंग केलं असेल. त्यातलं सारंच डिकंपोज झालं नसेल. काटक्यांचे काही अवशेष अन पालापाचोळ्यामधल्या जाडसर पानांचेही अवशेष तसेच असणं शक्य आहे. त्यामधले मोठे तुकडे काढून एका ठिकाणी गोळा करुन घ्या. सगळा कचरा एकत्र केल्यावर त्याला दोन दिवस मोकळी हवा खाऊ द्या. नंतर जमेल तसं हे सगळं बारीक करा. काड्याकाटक्या आतुन पोकळ झाल्याच असतील. त्या लगेचच साध्या हातानंही मोडतील. पानं मात्र हातानं कुस्करुन मोडणार नाहीत. थोडीच असतील तर कात्रीनं कापून घ्या अन जास्त असतील तर राहुद्या तशीच. नंतर ढीगाच्या आकारानुसार एखादं पोतं किंवा ड्रम अन बाग जमिनीवरची असेल तर एका बाजुला ढीग करुन त्यावर जे काही कल्चर किंवा पूर्ण तयार झालेलं कंपोस्ट असेल तर ते घालुन घ्या. एखादी बुरशी पावडर असेल तर तीही आकाराच्या प्रमाणानुसार चमचा दोन चमचे घातलीत तर उत्तम. याचं तीन ते चार आठवड्यात उत्तम कंपोस्ट तयार होईल.

मल्चिंगच्या अवशेषांसोबतच काही तण उगवले असतील. पक्षांच्या कृपेनं काही नको ती रोपं, वेली अन गवत उगवलं असेल. ते कुंडीतल्या आपण लावलेल्या झाडाच्या मुळावर उठण्याची शक्यता असते. या अशा नको त्या रोपांमधे वा तणांमधे बहुतेक वेळा, उंबर, पिंपळ यासोबतीनंच नाजुक फुलांच्या वेली अन मायाळू सारख्या वेलीही दिसतील. यापैकी जी हवीत ती रोपं काढून घेऊन त्यांची वेगळी व्यवस्था करा. बाकीचं तण कंपोस्टच्या ढीगात जाऊद्या, अर्थातच तुकडे करुन. नाहीतर ते तिथं पुन्हा नव्यानं जोम धरुन उभं रहायचं. यानंतर झाडांभोवतीची माती मोकळी करुन घ्या. कुंड्यांना पाणी वाहुन जाण्यासाठी केलेली छिद्रं बुजली असतील तर तीही मोकळी करुन घ्या.

झाडांची छाटणी : पावसाळ्यात झाडांची अफाट वाढ झाली असेल. पावसादरम्यान जर बागेत लक्ष दिलं नसेल तर रोपं जागा मिळेल तशी वाढली असतील. कुंड्या जवळ जवळ असतील तर ती एकमेकांत गुंतलीही असतील. भाज्यांची रोपं असतील तर आता पावसाचा जोर कमी होत आल्यानं त्यांवर फुलं किंवा क्वचित फळंही धरली असतील. तेव्हा सारा गुंता हलक्या हातानं सोडवुन घ्या. शक्यतो फळं वा फुलं असलेल्या फांद्या तुटणार नाहीत किंवा दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. खराब वा रोगग्रस्त पानं अन फांद्या छाटुन वेगळ्या ठेवा. या नंतर आपल्याला नष्ट करायच्या आहेत. अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या छाटून घेऊन झाडाला व्यवस्थित आकार द्या.

हेच आपल्याला आंबा, चिकू वगैरे फळझाडांच्याही बाबतीत करायचं आहे. लगेचच येणाऱ्या पुढच्या सीझनला आपल्याला भरपूर फळं हवी असतील तर आताच हे करणं गरजेचं आहे. जमिनीलगतच्या साऱ्या फांद्या छाटून घ्या. ज्या फुलझाडांच्या फांद्यांपासून नवीन रोपनिर्मिती होणं शक्य असेल त्या फांद्यांमधून पेन्सिलीच्या जाडीएवढ्या फांद्या वेगळ्या काढून ठेवा. तुम्हाला हव्या असतील तर रोपं करण्यासाठी ठेवा किंवा कुणाला द्यायच्या असतील तर देऊन टाका. मोठ्या फळझाडांच्या फांद्या छाटतानाखालच्या फांद्या छाटुन घ्या. झाडाच्या सर्व भागावर उन्ह पडेल अशा पद्धतीनं फांद्यांचा आकार अन संख्या कमी करा. छाटलेल्या फांद्या जमेल तेवढे छोटे तुकडे करुन कोपऱ्यात रचुन ठेवा. याचा उपयोग अजुन बारीक तुकडे करुन मल्चिंगसाठी होईल किंवा सरळ फांद्या वेली वा तोमॅटो वगैरेंसारख्या फळभाज्यांना आधार म्हणून उपयोगी पडतील. बाकी वाकड्यातिकड्या फांद्या जाळून त्याची राख उपयोगात आणता येईल. झाडावरच्या फांद्या छाटलेल्या उघड्या भागावर कीटकनाशक किंवा हळद लावा. त्यामुळं बुरशी वा इतर कुठली कीड लागणार नाही.

खतं देणं : पावसामुळं आपण वेळोवेळी दिलेली खतं वाहून गेली असतील. खास करुन कुंड्यांमधे हे शक्य आहे. त्यामुळं आता नेहमीप्रमाणं खतं देण्यास सुरुवात करण्यास हरकत नाही. कुंडीमधे खत देण्याची पद्धत अन प्रमाण हे याआधी अनेकदा सांगितलं आहेच. कुंडीतील मातीचा वरचा एक इंचाचा थर भरेल एवढं खत माती मोकळी करुन देऊन त्यावरुन माती सारखी करुन घ्यायची आहे. जमिनीवरच्या झाडांनाही त्यांच्या आकारानुसार अन वयानुसार खतं द्यायची आहेत. मोठ्या फळझाडांना साधारण दोन ते तीन घमेली शेणखत आळ्यातली माती उकरुन त्यात मिसळून द्यायचं आहे. कुंड्यांमधे खत देताना शेणखताऐवजी कंपोस्ट दिल्यास छोट्या झाडांना ते पचायला सोपं जाईल. या सोबतच बागेच्या सर्व प्रकारात खताच्या प्रमाणात नीमपेंड, बोनमील अन सोबतीला चमचाभर ट्रायकोडर्मा द्यावी. झाडांच्या मुळांतली माती अजुन काहीशी ओलसर असेल त्यामुळं बुरशीजन्य रोग लागु नयेत म्हणून ही काळजी घ्यायची आहे. यानंतर खतं नियमितपणं द्यायची आहेत.

पाणी देणं : खतं दिल्यानंतर पाऊस अजिबात नसेल तर थोडं पाणी देऊन खतं ओली होतील याची काळजी घ्या. नंतर पुढच्या पाच सहा दिवसांत पाऊस पडला नाही तर पाणी द्या. तुमच्या भागात ऑक्टोबर हीट किती आहे हे पाहून पाण्याच्या पाळ्या ठरवुन घ्या. कुठं रोज पाणी द्यावं लागेल तर कुठं चार पाच दिवसांतुन पाणी द्यावं लागेल. जमिनीवरच्या बागेत जर पाऊस उत्तम पडला असेल तर एवढ्या पाणी देण्याची गरज नाही. पाऊस अल्प प्रमाणात झाला असेल तर पानं कोमेजल्यासारखी वाटली तरच पाणी द्यावं. जमिनीवरच्या बागेतली झाडं पाण्याच्या शोधासाठी मुळं मातीत खोलवर पाठवत असताट. त्यामुळं तिथं चिंतेचं कारण नाही. यासाठी फक्त बागेचं नियमित निरीक्षण करणं गरजेचं आहे. सकाळी वा संध्याकाळी पानं मलूल पडली असतील तरच पाणी देणं गरजेचं आहे. दुपारच्या तीव्र उन्हात पानांचं मलूल पडणं हे नैसर्गिकच आहे.

पाऊस कमी होत असतानाच ही कामं करुन घ्या कारण नंतर लगेचच आपल्याला हिवाळीबागेचं अन त्या सीझनमधे लावायच्या भाज्या अन फुलझाडं यांचं नियोजन करायचं आहे. तेव्हा घ्या हातात खराटा अन सरकवा चपला पायात आणि जा बागेत.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya 

गच्चीवरचा पोर्टेबल मांडव (DIY)

गच्चीवरचा पोर्टेबल मांडव (DIY)




आपल्यापैकी बरेचजणांची बाग गच्चीवर आहे. मग ती गच्ची स्वतःच्या बंगल्याची असो की सोसायटीची असो. अशा गच्चीवर कुंड्यांमधे फुलझाडं, फळझाडं, भाज्या वगैरे तर आपण नेहमीच लावत असाल. पण जेव्हा वेलवर्गीय भाज्या किंवा फुलं लावता तेव्हा त्या वेलींना वर चढण्यासाठी आधार देण्याची गरज असते. अशा वेळी काही कायमस्वरुपी व्यवस्था असेल तर उत्तमच. पण एखादा मांडव जो आपल्या गरजेप्रमाणं केव्हाही कुठंही हलवता येऊ शकेल किंवा काढून ठेवता येत असेल, अन हे सारं कमी खर्चात अन स्वतः, म्हणजे बाहेरील कुणाचीही मोबदला देऊन मदत न घेता करता येत असेल तर? मी माझ्या घराच्या गच्चीवर गेल्याच महिन्यात असा एक मांडव तयार केला. अगदी एकट्यानं. वय अन कंबरेच्या दुखण्यामुळं बंधनं आली आहेत म्हणून मला दोन दिवस लागले. त्यात सतत पाऊसही सुरु होता. पण सारं साहित्य तयार असेल तर तुम्ही सिमेंटच्या क्युअरिंगचे चोवीस तास वेगळे काढलेत तर अक्षरशः तासाभरात हा मांडव उभा करुन त्यावर वेली सोडू शकता. लागणारं साहित्य अन सोबत जोडलेल्या फोटोंवरुन तुम्हालाही कल्पना येईल अन तुम्हीही असा मांडव तुमच्या गच्चीवर उभा करु शकाल. याहीपेक्षा सुंदर अन स्टर्डी.

साहित्य : १० फूट लांबी बाय ६ फूट रुंदी बाय ७ फूट उंचीच्या मांडवासाठी

अर्धा इंच व्यासाचे पीव्हीसी पाईप्स ६ (आपली गरज अन उपलब्ध जागेप्रमाणं ही संख्या वाढू शकेल.)
थ्री वे कनेक्टर्स  ४
कपलर्स २
पत्र्याचे डबे किंवा प्लास्टिकच्या कुंड्या अथवा रंगाच्या बादल्या ४
सिमेंट ४ किलो
वाळू व/वा विटांचा चुरा ४ घमेली
करवत किंवा करवतीप्रमाणं दाते असलेली सुरी.
जाळी बांधण्यासाठी नायलॉन दोरी किंवा काथ्या

हार्डवेअर स्टोअरमधे हे पाईप्स, त्याला लागणारे कपलर्स, कनेक्टर्स मिळतात. माझी गरज वर दिलेल्या मापानुसार असल्यानं मी असे ६ पाईप्स आणले. दुकानदार विकताना हे पाईप जरी दहा फूट असल्याचं सांगत असले तरी ते ३ ते ४ इंच कमीच असतात. हे अशासाठी सांगितलं की कागदावर गणितं सोडवून साहित्य आणण्यापेक्षा प्रत्यक्ष साहित्य पाहूनच मापं घ्यावीत. (हेलपाटे वाचवण्यासाठी उरलेलं सामान तसंच्या तसं असल्यास परत घेण्याच्या बोलीवरच घ्यावं.)

(एक सूचना : अर्धा इंच व्यासाचे पाईप्स दोऱ्या बांधताना दिल्या गेलेल्या ताणामुळं वाकतात किंवा नंतर दुधी भोपळा वगैरेंच्या वजनानंही वाकतात. त्यामुळं एक इंच व्यासाचा पाईप घेतला तरी चालेल.) 

मला उंची दहा फूट नको होती कारण माझ्या पत्नीला उभ्याने, स्टूल वा शिडीचा वापर न करताही भाज्या सहजासहजी काढता याव्यात म्हणून. तर या सोयीसाठी म्हणून ७ फूटांची उंची घेण्याचं ठरवलं. त्यानुसार सात फूट लांबीचे चार पाईप्स कापून घेतले. हे जे चार छोटे तुकडे मिळाले ते एका कपलरच्या सहाय्यानं दोन तुकडे जोडून घेतल्यामुळं मांडवाच्या रुंदीसाठीचे दोन पाईप्स तयार झाले. ते प्रत्येकी झाले साधारण सव्वासहा फूट लांब. ही झाली माझ्या मांडवाची रुंदी. दहा फूटी दोन पाईप्स लांबीसाठी वापरले. त्यामुळं मांडवाचा आकार झाला १० (९’९") बाय ६’३" बाय ७ फूट.

माझ्याकडं पत्र्याचे चार डबे होते. १५ लिटर तेलाचे असतात ते. त्यांना खाली अन बाजूंना आधी लोखंडी टोच्याच्या सहाय्यानं छिद्रं पाडून घेतली. नंतर त्यात पाईप मध्यभागी उभा धरुन बाजुनं डबा अर्धा भरेल एवढा विटांचा चुरा टाकला. (मला वाळू मिळणं खूपच कठीण गेलं. त्यामुळं मी तो नाद सोडून दिला.) हातोडीच्या सहाय्यानं विटांचा चुरा व्यवस्थित दाबून घेऊन पाईप त्यात विनाआधार उभा राहील असं पाहिलं. त्यावर पाणी मारुन तो चुरा ओलसर करुन घेऊन त्यावर एक किलो सिमेंट पिठल्यासारखं ओलसर कालवुन घेऊन ओतलं. डबा व्यवस्थित हलवल्यावर ते सिमेंट सरळ लेव्हलला येतं. असे चारही डबे करुन त्यात पाईप उभे केले. सिमेंट वाळल्यावर रात्रभर डब्यात वर एक दीड इंच राहील एवढं पाणी भरून ठेवलं. 

सकाळी सिमेंट घट्ट बसलेलं दिसलं. पाईप हलवुन पाहिला तर तो व्यवस्थित उभा होता. डब्यातल्या सिमेंटच्या लेव्हलवर येतील अशी चारही बाजूंनी छिद्रं करुन घेतली अन त्यातील पाणी वाहून जाऊ दिलं. अर्धा डबाच का, कारण एक तर पूर्ण डबा भरण्याएवढी आपली गरज नाही. अन दुसरं म्हणजे डब्याच्या वरच्या उरलेल्या अर्ध्या भागात माती घालून काही रोपं, शक्यतो पोलिनेटर्सना आकर्षित करुन घेणारी फुलझाडं लावता यावीत किंवा चिनी गुलाब सारखी मुळांची वाढ कमी असणारी रोपं लावता यावीत यासाठी. यानंतर या पिलर पाईपच्या टोकाला थ्री वे कनेक्टर बसवला. डबे योग्य त्या अंतरावर अन हवे तिथं ठेवल्यावर वरचे लांबी अन रुंदी वाले पाईप्स जोडून घेतले. हा झाला मांडवाचा सांगाडा. हे कनेक्टर्स जोडताना ते वारंवार निघू नयेत म्हणूण सोल्युशनही हार्डवेअरच्या दुकानात मिळतं. पण मग असे पाईप्स त्यातुन सोडवता येत नाहीत. त्यामुळं मांडव एकदा फिक्स झाला की काढता येत नाही. म्हणून मी सोल्युशन वापरलं नाही. ज्यांची इच्छा आहे ते सोल्युशन वापरुन मांडव कायमस्वरुपी करु शकतात.

हा झाला सांगाडा. नंतर यावर उभ्या आडव्या अशा नायलॉनच्या दोऱ्या बांधून झाल्यावर तयार झाला पोर्टेबल मांडव. नायलॉनच्या दोऱ्यांऐवजी तुम्ही काथ्याही वापरु शकता. पण उन्ह-पाऊस यामुळं काथ्या लवकर खराब होतो अन हे काम दर वर्षी करावं लागतं. म्हणून मी काथ्या वापरला नाही. नायलॉनची दोरी वापरलीत तर ती किमान ५ वर्षं तरी नक्कीच टिकेल. या मांडवाचं आयुष्य किमान आठ ते दहा वर्षं धरुन चालायला हरकत नाही. वापरलेले पाईप्स कसे आहेत यावर सारं अवलंबुन आहे. पण हे पाईप बऱ्यापैकी टिकतात.

दोऱ्या बांधताना आपण त्या घट्ट बांधतो अन त्यामुळं वरच्या चौकटीचा शेप बदलुन समोरासमोरच्या दोन्ही बाजू आत वळुन आयताचा आकार जातो. त्यामुळं दोऱ्या बांधताना सैलसर बांधल्या तर उत्तम. फक्त फळं लागल्यावर त्या खाली झुकतील. हे टाळण्यासाठी थोड बजेट वाढवावं लागेल. म्हणजे मोठ्या लांबीच्या मध्यभागी समोरासमोर दोन उभे पाईप घेऊन, चार पायांएवढीच उंची घेऊन ते पाईप वरच्या आडव्या पाईपला "टी" कनेक्टरनं जोडून घ्यायचे. म्हणजे ते खाली झुकणार नाहीत. किंवा दुसरा पर्याय म्हणजे इथं "टी" कनेक्टर घेण्याऐवजी चार कोपऱ्यांसाठी घेतलेला थ्री वे कनेक्टर घेऊन वरही रुंदीच्याच मापाएवढा पाईप लावून लांबीच्या दोन्ही बाजू वरच्याही बाजूनं जोडून घ्यायच्य़ा. हे दोन वाढीव खांब खाली टेकण्यासाठी तुम्ही अजुन दोन डबे घेऊन तेही आधीच्याच पद्धतीनं विटांचा चुरा अन सिमेंटच्या सहाय्यानं पाया बनवु शकता अन त्यातही हवी ती रोपं लावू शकता.

मांडव तयार केल्यावर त्यावर तुम्ही वेली चढवु शकता. उन्हाळ्यात जेव्हा वेलवर्गीय भाज्या नसतील तेव्हा याच मांडवावर पातळसर कापडं, जुन्या साड्या किंवा ओढण्या घालून शेडनेट करुन नाजूक रोपांचं तीव्र उन्हापासून संरक्षण करु शकता. तसंच टोमॅटो, वांगी सारखी रोपं ज्यांना आधार लागतो तीही या मांडवाखाली ठेवुन वरुन दोऱ्या सोडून त्या रोपांना बांधू शकता. तसंच चवळी वगैरेंसारख्या वेलीही यावर आपण चढवु शकता. फक्त मांडवावर जास्त दाटी होणार नाही अन मुख्य म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होणार नाही यासाठी मोजक्याच वेली यावर चढवाव्यात.

पहा करुन. दोऱ्या बांधल्यावर अन वेली चढल्यावर मूळचा आयताकार नक्कीच जातो. कधी तर चार खांब ९० अंशात न राहून वरच्या बाजूनं वयोवृद्ध झाल्यासारखे वाकलेलेही दिसतील, पण हरकत नाही. आपलं लक्ष्य आहे वेलवर्गीय भाज्या घेणं, मांडव बांधणं नव्हे. मांडव हे एक माध्यम आहे किंवा वेलींची ती गरज आहे. साध्य नव्हे.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

एप्सम सॉल्ट - बागेत वापरावं की वापरु नये?

एप्सम सॉल्ट - बागेत वापरावं की वापरु नये?



आजकाल बागकामातले सारेच तज्ञ कुठल्याही प्रश्नावर दोन उत्तरं हमखास देत असतात. एक म्हणजे कांद्याच्या सालींचं पाणी आणि दुसरं म्हणजे एप्सम सॉल्ट. या कांद्याच्या सालींच्या पाण्यावर नंतर केव्हातरी, पण आज एप्सम सॉल्टवर चर्चा करुया. बागकामांतील तज्ञ, अनेक ऑनलाईन सल्ले देणाऱ्या साईट्स अन ब्लॉगर्स पॉटींग मिक्स तयार करण्यापासून ते रोपांना फळं-फुलं धरेनाशी झाल्यावर एप्सम सॉल्ट वापरण्याचाच सल्ला देत असतात. परंतु याचा नियमित किंवा अती वापर केल्यास फारसा फायदा तर होत नाहीच पण तोटेच जास्त होतात.

काय असतं हे एप्सम सॉल्ट? तर एप्सम सॉल्ट म्हणजेच मॅग्नेशिअम सल्फेट अर्थात MgSO4 हे आहे एक रासायनिक संयुग. यात असतं मॅग्नेशिअम, सल्फर आणि ऑक्सिजन. हे अर्थातच कुठंतरी "बनवलं" जातं. म्हणजेच हे ना नैसर्गिक आहे ना सेंद्रिय. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास या एप्सम सॉल्टमधे असतं मॅग्नेशिअम, सल्फर आणि थोडं पाणी. खरंतर हे एप्सम सॉल्ट जे बनवलं जातं अन मेडिकल दुकानांतुन विकलं जातं ते वेगळ्याच म्हणजे औषधी उपचार व इतर शारिरीक व्याधींवरील उपचार वगैरे या कारणांसाठी असतं. बागेतील उपयोगांसाठी ते बनवलेलंच नसतं. अन्यथा ते नर्सरीज किंवा ऍग्रीकल्चरल स्टोअर्समधे उपलब्ध असतं. 

वनस्पतींना वाढीसाठी अन फुलण्या-फळण्यासाठी त्यांच्या जीवनकालात जी काही अन्नद्रव्यं लागतात त्यामधे मॅग्नेशिअम हे एक अत्यल्प प्रमाणात लागणारं अन्नद्रव्य आहे. म्हणजे ज्याला आपण दुय्यम अन्नद्रव्यं म्हणजेच सेकंडरी न्युट्रिअंट म्हणतो ते. आणि पृथ्वीच्या पाठीवरच्या बहुतांश भागातील मातीमधे हे मॅग्नेशिअम आवश्यक त्या प्रमाणात असतंच. काही ठिकाणी ते जास्तही असु शकतं. पण अजिबात नाही असा भूभाग अभावानंच असेल.

मॅग्नेशिअमबरोबरच या एप्सम सॉल्टमधे असलेला दुसरा घटक म्हणजे सल्फेट. सल्फेटमधे असतं सल्फर आणि ऑक्सिजन. हा सल्फेटही मातीमधे उपलब्ध असतो अन तोही वनस्पतींसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी एक दुय्यम अन्नद्रव्य म्हणजेच सेकंडरी न्युट्रिअंटच आहे. मातीमधील हा सल्फेटही वनस्पतींची मुळं झाडाच्या आवश्यकतेनुसार हवा तेवढाच शोषून घेत असतात.

असं असताना हे दोन्ही घटक वेगळे वरतुन देण्याची आवश्यकता नसते. किंबहुना ते तसे दिले गेल्यास मातीमधील त्यांचं नैसर्गिकरीत्या असलेलं प्रमाण अन रेशोच आपण बिघडवत असतो. जर आपण बागेतील त्यातही खास करुन कुंडीतील झाडांना नियमितपणं कंपोस्ट देत असाल तर हे दोन्ही घटक वनस्पतींसाठी उपलब्ध होतच असतात.

तथाकथित वा स्वयंघोषित जाणकार, तज्ञ मंडळींकडून वनस्पतींमधील काही रोगांवर अन लक्षणांवर हे एप्सम सॉल्ट वापरण्यासाठी सांगितलं जातं. उदा.

टोमॅटोवर पडणाऱ्या "ब्लॉसम एंड रॉट"साठी. याला कारणीभूत असतं ते म्हणजे कॅल्शिअमची कमतरता वा पाणी देण्यामधली अनियमितता. ती भरुन काढण्यासाठी कॅल्शिअमच देण्याची आवश्यकता असते. त्याऐवजी मॅग्नेशिअम देऊन चालणार नाही. अन पाणीही नियमितपणं द्यावं लागतं. या कारणासाठी जर एप्सम सॉल्ट दिलं तर कुंडीत मॅग्नेशिअमचं प्रमाण वाढेल अन मुळं मॅग्नेशिअमच जास्त घेतील, कॅल्शिअम वरुन दिला गेला तरी. परिणामी मूळ रोग तसाच राहील किंवा वाढेलही कारण कॅल्शिअमची कमतरता तशीच रहाणार. म्हणून या रोगासाठी कॅल्शिअमयुक्त खतंच देणं अन मल्चिंगसारखे उपाय प्रभावी ठरत असतात.
वनस्पतींची पानं पिवळी पडणं ही तशी साधारण बाब असते. पण पानं अकाली पिवळी पडणं वा हिरवेपणा कमी होणं यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात. त्यातही मुख्यत्वे लोहाची कमतरता हे कारण जास्त जबाबदार असतं. ती भरुन काढण्यासाठी लोहयुक्त खतं देणंच गरजेचं असतं. एप्सम सॉल्ट ही कमतरता भरून काढू शकत नाही. खारं तर एप्सम सॉल्टच काय पण हा रोग कुठल्याही फवारणीनं आटोक्यात येत नाही, तर त्यासाठी जे उपाय करायचे असतात ते मातीतुनच करायचे असतात. अन आपल्या बागेत त्यासाठी (सेंद्रीय) खतांचीच मदत होते.
बियांची उगवण चांगली अन उगवण्याची टक्केवारी वाढवण्यासाठी म्हणूनही एप्सम सॉल्ट वापरायला सांगितलं जातं. निसर्गतः जेव्हा वनस्पतींच्या पुढील पिढीसाठी बियांची निर्मिती केली जाते तेव्हा त्या बियांमधे माती, पाणी अन हवा यांच्या संपर्कात येईपर्यंत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी जे काही लागतं ते सारं काही आतमधेच उपलब्ध करुन ठेवलेलं असतं. हे निसर्गतःच होत असतं. आपण जेव्हा या बिया आपल्या बागेत लावतो तेव्हा फक्त या तीन गोष्टी त्यांना उपलब्ध करुन देण्याची गरज असते, मानवाचा हस्तक्षेप असलाच तर तो इतकाच. अन्यथा बिया या तीन आवश्यक गोष्टी मिळाल्यावर रुजतच असतात. त्यामुळं एप्सम सॉल्ट दिल्यामुळं बिया हमखास रुजतात हा भ्रम आहे. काही प्रकारच्या बिया वा कंद तर हवा अन पाणी यांच्या संपर्कात आल्यावरही रुजत असताना आपण पहातो. उदा. कारंद, कांदा, सूबाभूळ, कडधान्यं वगैरे वगैरे.
इनडोअर प्लांट्ससाठीही एप्सम सॉल्ट देण्यास सांगितलं जातं. इनडोअर प्लांट्सची पाण्याची गरज अल्प असते. यांचं पॉटींग मिक्सही एरवीपेक्षा वेगळं असतं. या वनस्पतींना लागणारी अन्नद्रव्यं कंपोस्ट वा इतर सेंद्रीय खतांमधुन मिळतच असतात. अशा रोपांना पाणी जास्त दिलं जात नसल्यानं खतं अन अन्नद्रव्यं वाहून जाण्याची शक्यता नसते. त्यामुळं जी अन्नद्रव्यं नियमित अन जास्त प्रमाणात वापरली जात नाहीत ती वाहून न जाता कुंडीतच रहात असतात. परिणामी ती मुळांना उपयोगी ठरण्याऐवजी त्रासदायक ठरत असतात. छोट्या आकाराच्या कुंडीतल्या मातीत जास्त प्रमाणात घातलेलं मॅग्नेशिअम अन सल्फेट उपयोगाविना तसंच पडून राहिल्यास ते मुळांना अपायकारकच ठरतं.
झाडांवर फुलं फळं कमी लागत असतील तरीही एप्सम सॉल्ट वापरण्यास सांगितलं जात असतं. मुळात म्हणजे झाडं जर फुलांना अन फळांना जन्म देण्यास सक्षम असतील तर आणि तरच ती फुलतात वा फळतात. दुसरं म्हणजे झाडांना फुलण्यासाठी योग्य अन पोषक वातावरण असेल तर ती फुलणारच. या दोन्ही गोष्टींसाठी योग्य ती खतं योग्य त्या प्रमाणात देणं, वेळच्या वेळी पाणी देणं हेच सर्वात जास्त महत्वाचं असतं. रोपांसाठीची माती मुख्य अन्नद्रव्यांनी युक्त असेल तर फुलं वा फळं येणं हे होतच असतं. जर फुलं वा फळं येत नसतील तर त्याची कारणं वेगळी असु शकतील. ती शोधण्याची अन त्यावर उपाय करण्याची गरज असते. परंतु केवळ कुणीतरी सांगतंय म्हणून काहीही उपाय करणं चुकीचं असतं. केवळ चुकीचंच नव्हे तर त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. त्यामुळं खतपाणी वेळच्यावेळी करणं हाच उपाय करणं आवश्यक आहे.

इथं एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे अन ती म्हणजे मातीमधे सर्वच अन्नद्रव्यं एका ठराविक प्रमाणात निसर्गतःच असतात. आपण जेव्हा वरखतं देत असतो तेव्हा हे प्रमाण बिघडत असतं. पीकं घेतल्यानंतर मातीमधली अन्नद्रव्यं नक्कीच कमी होत असतात अन त्यांचं गुणोत्तरही बदलत असतं. पण जेव्हा आपण पीकांच्या एका हंगामानंतर थोडे दिवस त्या मातीला विश्रांती देत असतो तेव्हा हे गुणोत्तर निसर्गतःच पूर्ववत होत असतं. अन यासाठीच बागेतील वापरलेल्या मातीला काही काळ विश्रांती दिली जात असते. जमिनीवरील बागेतही हे पथ्य पाळलं जात असतं. फक्त मातीमधली मुख्य अन्नद्रव्यं म्हणजे उदा. एन, पी, के, कॅल्शिअम वगैरे पीकांच्या वाढीदरम्यान जास्त प्रमाणात वापरली जात असल्यानं अन त्यांचं पुनर्भरण होण्याचा वेग तुलनेनं मंद असल्यामुळंच ती खतांद्वारे दिली जातात. अन्यथा तीही आपल्याला द्यावी लागली नसती.

परंतु जी अन्नद्रव्यं दुय्यम अन्नद्रव्य म्हणजेच सेकंडरी न्युट्रिअंट्स या सदरात मोडतात ती वनस्पती अल्प प्रमाणात घेत असतात अन ती मातीमधे पुन्हा नैसर्गिक रित्या तयारही होत असतात. त्यामुळं ती वरुन देण्याची आवश्यकता नसते. एक नैसर्गिक सत्य आपण लक्षात घ्यायला हवं अन ते म्हणजे जे अधिकचं असतं अन जे वापरलं जात नसतं ते कुठंतरी साचत रहातं. मग ते फॅट म्हणजे मेद असो वा इतर काहीही. एप्सम सॉल्टद्वारे मिळणारं अधिकचं मॅग्नेशिअम अन सल्फेट हेही कुठं ना कुठ साचतच जात असतं. एप्सम सॉल्ट हे पाण्यात विरघळणारं अन परिणामी प्रवाही असल्यामुळं ते आपल्या गच्चीवरल्या बागेतुन वहात जाऊन जमिनीतच कुठं ना कुठं साचत जातं. म्हणजेच आपण नकळत मातीमधील अन्नद्रव्यांचं गुणोत्तर बिघडवत असतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं झाल्यास हेही एक प्रकारचं प्रदूषणच. अन त्याला आपलाच हातभार लागत असतो.

पण मग एप्सम सॉल्ट बागेत वापरायचं की नाही? तर बागेपेक्षा ते मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या शेतीमधे जास्त फायद्याचं होऊ शकेल. अर्थात जर मातीचं परीक्षण केल्यावर त्यात मॅग्नेशिअम अन सल्फेटची तीव्र कमतरता असेल तरच. अन अशा मातीत घेतल्या जाणाऱ्या पीकाची या अन्नद्रव्यांची ती गरज असेल तरच. अन्यथा जगात या एप्सम सॉल्टविनाही असंख्य बागा फुललेल्या अन फळलेल्या आहेतच की. तेव्हा अशा गरज नसलेल्या गोष्टींचा वापर आपल्या बागेत करु नये. त्यामुळं फायदा तर काहीच होत नाही, उलट झालंच तर नुकसानच जास्त आहे, तुमच्या बागेला अन पर्यावरणालाही.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

सहचर रोपांची लागवड (Companion Planting)

सहचर रोपांची लागवड (Companion Planting)

निसर्गतः काही वनस्पती या एकमेकांचे जोडीदार असतात किंवा त्यांच्यात मैत्री असते. दोन्ही वनस्पती भलेही भिन्न प्रकारातील वा कुळातील असल्या तरीही त्यांच्यात घट्ट मैत्री असते अन एकत्र वा जवळजवळ लावल्यास त्या एकमेकांच्या साथीनं वाढतात. एवढंच नव्हे तर एकमेकांची काळजीही घेतात. एकीवर कीड वा रोग पडला तर दुसरी त्या कीडीचा वा रोगाचा नायनाट करते किंवा एकीनं उत्सर्जित केलेला टाकाऊ भाग दुसरी खताप्रमाणं सेवन करुन वाढते. दोन्ही वनस्पती एकमेकांच्या सहाय्यानं अन आधारानं एकोप्यानं वाढतात. कुणावरही कुरघोडी न करता, सकारात्मक स्पर्धा करत दोन्ही वनस्पती वाढतात अन फुलतात व फळतात. एकत्र वाढताना त्या एकमेकांना विरोध करण्याऐवजी एकमेकांना पूरक ठरतात.

अशा वनस्पती ओळखून त्या जर जवळजवळ वा एकाच जागी लावल्यास आपले बरेचसे कष्टही वाचतात अन खर्चही आटोक्यात रहातो. या प्रकारालाच सहचर रोपांची लागवड किंवा Companion Planting असं म्हणतात. याचे बरेचसे फायदे आहेत. आपल्या सीमीत स्वरुपातील बागेला, बाग गच्ची-बाल्कनीतील असुद्या किंवा परसातील असुद्या, निसर्गाच्या या गुणामुळं आपण जसं जागेची बचत करु शकतो किंवा कमी जागेत जास्त रोपं लावू शकतो तसंच कीडींवर अन तणांवरही नियंत्रण ठेवु शकतो. सहचर रोपांची लागवड करण्याचे काही फायदे पुढीलप्रमाणं आहेत;

कमी जागेत जास्त पीकं : गच्ची असो की बाल्कनी, बाग एकदा करायला घेतली की तिच्यासाठी थोड्याच दिवसांत जागा कमी पडू लागते. कुंड्या, त्यातही गोलाकार कुंड्या असल्या की हे हमखास होतंच. अशा वेळी या पद्धतीनं रोपांची लागवड केल्यास उपलब्ध जागेतही जास्त रोपं लावता येतात. पर्यायानं बागेत वैविध्यही जपता येतं अन जर आपण बागेत भाज्या लावत असु तर उत्पादनही जास्त मिळतं.

अनावश्यक तणांवर नियंत्रण : बाग म्हटली की तिथं अनावश्यक तण हे आलंच. तणांच्या बिया कधी वाऱ्यानं उडून येत असतात किंवा खतांद्वारेही येत असतात. अशा बियांना एकदा मोकळी जागा मिळाली की त्यांची वाढ भराभर होते. आपण लावलेल्या रोपांना आपण जे खत वा इतर अन्नद्रव्यं देत असतो ते खाऊन हे तणही जोमानं वाढत रहातं. परंतु जर एकाच कुंडीत दोन वेगवेगळ्या प्रकारची रोपं असतील तर तणांना वाढण्यासाठी जागाच उरत नाही. पर्यायानं कुंडीत तणच रहात नाही. किंवा असलंच तर ते अल्प प्रमाणात असतं.

कीडीचं नियंत्रण : बागेत कुठलीही रोपं लावली की त्यावर कीड ही येतच असते. निसर्गतःच हे होत असतं. अर्थात त्यामागं निसर्गाचीही काही कारणं आहेत. पण त्यामुळं आपल्या बागेचं मात्र अतोनात नुकसान होत असतं. परंतु या कीडींचंही एक शास्त्र असतं. कुठलीही कीड कुठल्याही रोपांवर नाही पडत. रोपांच्या अन फळा-फुलांच्या प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळी कीड असते. काही किडी असतीलही ज्या बहुतेक प्रकारच्या झाडांना त्रास देतात. पण तशा किडींचा वेगळा उपाय करता येतो. पण कुंडीत जेव्हा दोन वेगळ्या प्रकारची झाडं लावली जातात तेव्हा कीडीला जर एक प्रकारचं झाड आवडत असेल किंवा आकर्षित करुन घेत असेल तर तिथंच असणारं दुसरं झाड हे किडीच्या दृष्टीनं त्रासदायक असेल. सहाजिकच कीड अशा ठिकाणी येण्याचं टाळते.

परागीभावन : परागीभवन करणारे जे माशा वा फुलपाखरं वगैरे मित्र आहेत ते कुंडीतील विविध प्रकारच्या फुलांकडं आकर्षित होऊन रोपांवर येऊन त्यातील मध प्राशन करण्यासाठी येतात अन त्यामुळं आपोआप परागीभवन होऊन रोपांवर फळं जास्त धरली जातात. याचा फायदा आपल्यालाच होत असतो. रोपांवर येणाऱ्या सर्व मादी फुलांचं रुपांतर जर फळांमधे होत असेल तर सहाजिकच आपल्याला जास्त भाज्या वा फळं मिळतील.

उन्हापासून संरक्षण : काही नाजूक प्रकृतीची रोपं असतात ज्यांना फार तीव्र वा थेट उन्ह सहन होत नाही. अशी रोपं जर मोठी वाढ होणाऱ्या रोपांजवळ लावली तर त्यांना आवश्यक तेवढंच उन्ह मिळून त्यांची वाढही व्यवस्थित होते. त्यांना दुपारच्या तीव्र अन थेट डोक्यावर पडणाऱ्या उन्हाचा सामना करावा लागत नाही. सकाळचं कोवळं किंवा संध्याकाळाचं सरतं उन्ह मिळून त्यावर त्यांची वाढ चांगली होते.

वनस्पतींमधे प्रत्येक वनस्पतीची बी रुजण्यापासून ते फळं देऊन जीवन संपेपर्यंत जी जी अवस्था अन अन्नद्रव्यांची गरज असते ती सर्वस्वी वेगवेगळी अन अद्वितीय असते. दोन विभिन्न प्रकारच्या वनस्पतींची अन्नाची व खतपाण्याची गरज ही वेगवेगळी असते. परंतु त्यातही दोन वेगळ्या प्रजातींच्या वनस्पती एकमेकांना पूरक ठरत अन एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत वाढवल्यास खतपाण्याचीही बचत होते अन कमी जागेतही जास्त उत्पादन घेता येतं.

बागेत सहचर रोपांची लागवड करण्यासाठी पुष्कळ प्रकारच्या मित्र वनस्पती आहेत. अर्थात या वनस्पतींची निवड करताना, आपलं ठिकाण, तिथला पाऊस, हवामान, रोपांसाठीचा योग्य तो हंगाम, मातीचा पोत वगैरेंचा विचार करुनच निवड करावी. व्यवस्थित नियोजन करुन या प्रकारे रोपांची लागवड केल्यास आपल्याला मर्यादित जागेतही भरपूर उत्पादन घेता येईल.

सोबत दिलेल्या यादीत मित्र वनस्पतींची नांवं जशी दिली आहेत तसंच कुठली रोपं कुणाबरोबर लावू नयेत हेही लिहिलं आहे. ही यादी सर्वसमावेशक नक्कीच नाही. आपण साधारणतः ज्या ज्या प्रकारची रोपं वा भाज्या आपल्या बागेत लावत असतो तीच नांवं दिली आहेत. या यादीशिवायही वनस्पतींचे पुष्कळ प्रकार आहेत जे एकमेकांसोबत वाढतात. परंतु आपल्या मर्यादित बागेचा विचार करत असताना या सर्वच वनस्पतींचा विचार करण्याची आपल्याला आवश्यकता नाही.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya 

बियाणांमधे पुसा आणि अर्का यांचा अर्थ काय?

बियाणांमधे पुसा आणि अर्का यांचा अर्थ काय?

बरेंचदा आपण नर्सरीमधून वा बियाणांच्या दुकानांतुन भाज्यांच्या बिया घेत असतो. प्रत्येक भाजीच्या बियाणांमधे बरेच प्रकार असतात. त्या त्या प्रकाराचं नांव पाकीटावर छापलेलं असतंच पण त्यासोबत वाणाच्या आधी पुसा किंवा अर्का अशी नांवंही छापलेली असतात. या बिया अर्थातच हायब्रीड असतात. बियाणं हायब्रीड असल्याची हीही एक खूण आहे. तर काय अर्थ असतो या शब्दांचा?

भारतीय शेतकी संशोधन संस्था अर्थात Indian Agriculture Research Institute ही देशातील शेतकी संशोधन करणारी सर्वोच्च अन शसकीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९०६ मधे बिहारमधील पुसा या गावी झाली होती. त्यावेळी तिचं नांव "पुसा इन्स्टिट्युट" एवढंच होतं. १९३४ मधे झालेल्या भूकंपात या संस्थेचं पुष्कळ नुकसान झालं. त्यामुळं १९३६ मधे ती दिल्लीला हलविण्यात आली. या संस्थेद्वारे बियाणांवर जे काही संशोधन होतं अन जी वाणं प्रसारित केली जातात त्यांना नांवं देताना आधी "पुसा" हे नांव देऊन मग त्या वाणाचे गुण सांगणारं नांव दिलं जातं. उदा. भेंडीची एक जात "पुसा सावनी" अशी आहे. याचा अर्थ भेंडीचं वाण जे पुसा संस्थेकडून विकसित करुन प्रसारित केलं ती अन हे वाण पावसाळी मोसमात घेतलं तर अधिक उत्पादन देतं. तसंच "पुसा ज्वाला" या नावाचं मिरचीचं एक वाण आहे. नांवावरुनच लक्षात येतं की ही मिरची अतिशय तिखट असते.

याच भारतीय शेतकी संशोधन संस्था अर्थात Indian Agriculture Research Institute ची दक्षिण भारतामधील शाखा म्हणजे The Indian Institute of Horticultural Research अर्थात IIHR. बंगळुरातील अर्कावती नदीच्या काठी या संस्थेचा कारभार चालत असल्यानं इथं संशोधित केलेल्या बियांचं "अर्का" हे नामाभिधान केलं जातं. अर्थात या संस्थेची नांवं देण्याची पद्धत थोडी निराळी असल्यानं नांवावरुन वाणाचे गुण समजत नाहीत. म्हणजे उदा. भेंडीच्या काही वाणांची नांवं "अर्का अनामिका", "अर्का निकिता" अशी आहेत.

या संस्था थेट बियाणं विकत नाहीत तर "ऍग्रीलाभ" वगैरेंसारख्या कंपन्यांद्वारे नर्सरीज वगैरेंना ते त्या विकतात. त्यामुळं जेव्हा तुम्ही बिया खरेदी करता तेव्हा बिया हायब्रीड आहेत की कशा, त्या एफ वन म्हणजे F1 आहेत की F2 हेही विचारा. बियाणं जेव्हा संकरित केली जातात तेव्हा त्यांच्या पहिल्या पिढीला F1 म्हणजे Filial 1 असं म्हणतात. अन त्यानुसार दुसऱ्या पिढीला F2 अन तिसऱ्या पिढीला F3 अशी नांवं दिली जातात. अर्थात एकाच प्रकारच्या जास्त पिढ्या तयार केल्या जात नाहीत. बियाणं वातावरणाशी सुसंगत झाल्यावर त्यात काही वैगुण्यं तयार होत जातात किंवा त्यातले दोष टाळून एखादी नवी जात विकसित केली जाते अन नव्या नावानं ती बाजारात येते. मग पुन्हा नवं नांव अन त्यासोबतच F1, F2, F3 वगैरे दिलं जातं.

तेव्हा बियाणं घेताना या सगळ्या गोष्टींची चौकशी करा. आपण जे काही घेत आहोत ते सर्व बाजुंनी सुरक्षित आहे ना, त्याचा बागेतील इतर झाडांवर काही परिणाम होणार नाही ना याची खात्री करुनच बिया विकत घ्या.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...