भाज्यांची उन्हाची गरज

भाज्यांची उन्हाची गरज



बरेंचदा सर्वांनाच, त्यातही नवीन बागकर्मींना एक प्रश्न हमखास पडत असतो अन तो म्हणजे कुठल्या भाज्यांना किती उन लागतं. भाज्यांच्या, पेरणी ते काढणी या संपूर्ण जीवनचक्रात त्यांची उन्हाची गरज काय़ असते अन आपल्याकडं उपलब्ध असलेल्या उन्हात, मग ते थेट उन असो की सूर्यप्रकाश आपण कोणकोणत्या भाज्या घेऊ शकतो.

आपापल्या बागेमधे दिवसभरात पडणाऱ्या उन्हाच्या वेळा, प्रमाण, जागा अन त्याची तीव्रता हे सारं वेगवेगळं असतं. यामधे सुर्याच्या उत्तरायण अन दक्षिणायन यामुळं तर वर्षभर सतत बदल होत असतोच पण शेजारी-पाजारी होणारी बांधकामं अन बाहेरील किंवा आपणच आपल्या बागेत लावलेल्या झाडांची सतत होणारी वाढ यामुळंही उन्हाचे तास कमी अधिक होत असतात तसंच त्याची तीव्रताही कमी अधिक होत असते. हे सगळं आपल्या ताब्यात नसतं. यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. फार फार तर आपण आपल्या बागेतील वाढलेल्या झाडांची छाटणी करु शकतो. पण इतर बाबतीत मात्र आपल्याला अन आपण लावलेल्या रोपांना मिळेल तेवढ्या उन्हावर अन सूर्यप्रकाशावरच भागवून घ्यावं लागतं.

या लेखात आपण किती उन्हात कोणकोणत्या भाज्या लावू शकतो हे पहाणार आहोत. यासाठी आपण तीन प्रमुख गटांत भाज्यांची विभागणी करणार आहोत.
ते गट असे ;
६ ते ८ तास थेट उन आवश्यक असलेल्या भाज्या
४ ते ६ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या
२ ते ४ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या

इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी अन ती म्हणजे कुठल्याही वनस्पतीच्या वाढीसाठी उन्हाची गरज ही कमी-जास्त प्रमाणात आवश्यकच असते. त्यामुळंच फळांना चव अन फुलांना रंग मिळत असतो. परंतु काही भाज्या कमी उन्हातही तग धरु शकतात अन फुलतात व फळतातही. अर्थात अशा भाज्या जर उन्हात असत्या अन आपण त्यांची पूर्ण काळजी घेत त्यांना वाढवलं असतं तर त्यांच्या रंगरुपात अन चवीत नक्कीच फरक पडला असता. पण तरीही समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग या न्यायानं त्या वाढतात अन आपली अन्नाची गरज भागवतात.

६ ते ८ तास थेट उन आवश्यक असलेल्या भाज्या : टोमॅटो, वांगी, काकडी, मिरची, मका, दुधी व लाल भोपळा, भेंडी, चवळी व इतर शेंगवर्गीय भाज्या, तसंच सर्व वेलवर्गीय भाज्या यांना जेवढं जास्त उन मिळेल तेवढी त्यांची वाढ उत्तम होते. अर्थात तीव्र उन्हाच्या दिवसांत दुपारच्या वेळी म्हणजे साधारण सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच-तीन या वेळांत या भाज्यांवर सावली येईल अशी व्यवस्था केली तर ते अधिक फायद्याचं होईल. उन जास्त म्हणजे पाण्याची गरज जास्त हे गणित ठरलेलं. कारण कुंडीत लावलेल्या भाज्यांना पाण्यासाठी सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून रहावं लागतं. त्यामुळं या भाज्यांना पाण्याचा ताण बसू देऊ नये. 

४ ते ६ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या : बीट, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, गाजर, कांदा, लसूण, मटार, बटाटा, मुळा, आलं वगैरे भाज्या, म्हणजेच बहुतांशी कंदवर्गीय भाज्या अर्धसावलीत छान वाढतात. तीव्र उन वा प्रमाणाबाहेर जास्त उन असल्यास यांची वाढ व्यवस्थित होत नाही. कोबी, फ्लॉवर सारख्या भाज्यांची वाढ अतीउन्हात कमी होतेच पण त्यांच्या चवीतही फरक पडतो. ज्या भागात उन तीव्र असतं तिथं मोठ्या वृक्षांच्या सावलीत यांची लागवड केली तर उपलब्ध जागेचा वापरही होतो अन भाज्याही मिळतात.

२ ते ४ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या : मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर वगैरे सर्व पालेभाज्या तसंच लेट्यूस वगैरेंसाठी कमी उन असल्यास त्यांची वाढ उत्तम होते. साधारणतः पालेभाज्या कोवळ्या असतानाच खाल्ल्या जात असतात. त्यामुळं कमी उन्हात जर त्या वाढवल्या तर त्यांचे सर्व गुण अन चव अबाधित रहाते.

आपल्या बागेत किती उन येतं, दिवसाच्या कुठल्या वेळांत ते बागेमधल्या कुठल्या भागात अन किती प्रमाणात अन तीव्रतेत असतं याचा अभ्यास सुरुवातीचे काही दिवस तसंच वर्षभरांतल्या वेगवेगळ्या मोसमात करुन त्याप्रमाणं नियोजन करुन भाज्या लावण्याच्या जागा ठरवाव्यात. अर्थात आपण कितीही अभ्यास केला, अन त्याप्रमाणं ठरवलं तरीही शेवटी तो निसर्ग आहे हे एक अन सभोवतीच्या इमारती व मोठी झाडं वगैरेंमुळं सर्वच दिवस सारखे नक्कीच नसणार.

यासाठी आपल्या उपलब्ध जागेनुसार आपण झाडांची अन कुंड्यांची रचना करुन त्याप्रमाणं मिळणाऱ्या उन अन सावली यांमधे आपण भाज्या लावून त्यांची गरज भागवु शकतो. जास्त उन लागणाऱ्या भाज्या मधल्या मोकळ्या जागेत लावून वा त्या ठिकाणी कुंड्या ठेवून मोठ्या झाडांच्या पडणाऱ्या सावलीमधे कमी उन्हाची अन सूर्यप्रकाशाची गरज असणाऱ्या भाज्या आपण लावू शकतो. बागेत सावली असणारा भाग नक्कीच असतो. त्या भागात सावलीत वाढणाऱ्या भाज्या लावून तीही जागा आपण उपयोगात आणू शकतो.

बागेच्या ज्या भागात थेट उनच नव्हे तर सूर्यप्रकाशही अभावानंच पडत असेल तिथं आपण फुलझाडं वा ओर्नॅमेंटल झाडं लावु शकतो. ओर्नॅमेंटल वा इनडोअर प्रकारात मोडणारी झाडं अशा भागात छान वाढतात. ज्या भाज्यांना भरपूर उन आवश्यक असतं अन जी आपण एका रांगेत जर लावत असू तर अशा झाडांच्या रांगा उत्तर दक्षिण ठेवल्या तर सर्वच झाडांना सकाळ ते संध्याकाळ समान उन मिळेल. उन्हात वाढणाऱ्या भाज्यांच्या मुळांपाशी कुंडीत अर्धसावलीत वाढणाऱ्या भाज्या लावल्या तर एकाच खतात दोन भाज्या तर घेता येतातच, पण कमी जागेत जास्त भाज्या आपल्याला मिळू शकतील.

पूर्ण उन्हाची गरज असलेल्या भाज्या अर्ध उन्हात अन अर्ध उन्हात होणाऱ्या भाज्या जर सावलीत लावल्या तर त्या फळणार नाहीत असं नाही तर त्यांना लागणारी फळं रंग अन आकारानं कमी असतील. चव तीच असेल पण संख्या कमी असेल. आणि कळी ते पक्व भाजी हा काळही जास्त असेल. कारण एकच. त्यांना वाढीसाठी आवश्यक असणारं उन कमी प्रमाणात मिळेल अन त्यामुळं मिळणारी जीवनसत्वं अन अन्नद्रव्यं कमी मिळतील ज्यांची उणीव आपण खतांद्वारे भरून काढु शकणार नाही. म्हणून आपल्या जागेनुसार काय लावायचं ते ठरवा अन त्याप्रमाणंच बागेकडून अपेक्षा ठेवा. शेवटी आपल्या बागेत पिकलेला टोमॅटो बाजारातल्याप्रमाणं दोन इंच व्यासाचा नसला तरी तो आपण स्वतः पिकवला आहे अन त्याला कुठलं खत अन पाणी कुठलं दिलं आहे ते आपल्याला माहीत आहे अन त्यावर आपला अंकुश आहे हे महत्वाचं.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...