झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक



आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक खतं टाळणं हेच तर असतं. खतं सेंद्रिय असली तरी बहुतांश खतं आपण विकत घेतो. काही बागकर्मी कंपोस्ट अन गांडूळखत जरी घरी करत असले तरी त्यासाठी अनंत कष्ट तर घ्यावे लागतातच पण ती तयार होण्यासाठी बराचसा वेळही खर्च करावा लागतो. मग अशा खर्चिक गोष्टी आपण अगदी काटकसरीनं नाही, पण योग्य प्रमाणातच वापरायला हव्यात. ज्या झाडांची, मग त्या भाज्या असोत की फुलझाडं, फळझाडं असोत की वेली, प्रत्येकाला असलेल्या खतांच्या भूकेनुसारच आपण त्यांना खतं द्याय़ला हवीत. सेंद्रीय खतं जास्त प्रमाणात दिली गेल्यास नुकसान जरी काही होत नसलं तरीही ते जास्तीचं खत ज्या झाडाची भूक जास्त असेल त्या झाडाला वेळीच मिळालं तर आपल्यालाच फुलं अन फळं जास्त मिळणार आहेत. मग त्यानुसार आपण खतांचं नियोजन का करु नये?

कंपोस्ट हे खत आहे की जमिनीची सुपीकता वाढवणारा एक घटक आहे हा वादचा मुद्दा आहे. परंतु निव्वळ कंपोस्टमधे झाडांना वाढीसाठी अन फळण्या-फुलण्यासाठी लागणारी सारीच जीवनसत्वं, अन्नद्रव्यं नसतात. त्यामुळं झाडाच्या पूर्ण वाढीसाठी सेंद्रीय खतं जी प्राण्यांच्या विविध उत्सर्गांपासुन तयार केली जातात ती वापरायला हवी. अशा खतांसोबत मातीमधे कंपोस्ट दिलं गेल्यास या खतांचं विघटन अन झाडांच्या मुळांना ते विघटीत स्वरुपात घेणं शक्य होतं. म्हणून महिन्यातुन एकदा किंवा खत देण्याच्या प्रत्येक वेळी कुंडीच्या आकारमानानुसार कंपोस्ट दिल्यास दिलेलं खत कारणी लागतं. कारण शेणखत वा बोनमील आपल्याला हव्या त्या रुपात बदलुन घेणं मुळांना शक्य नसतं. हे काम कंपोस्टच करु शकतं किंवा अन्य कुठले जीवाणूंचे स्त्रोत असलेलं खत करु शकतं, उदा. गुळपाणी वा गुळ अन ताक यांचं मिश्रण वगैरे.

बाग जर जनिमीवरची असेल तर खतांचा एवढा विचार वा प्लानिंग करण्याची फारशी गरज नसते. आपापल्या भुकेप्रमाणं झाडं जमिनीत अन्नाच्या शोधात आपली मुळं खोलवर वा इतस्ततः पाठवत असतात अन त्यांना हवी ती अन्नद्रव्यं ती मातीमधुन मिळवत असतात. जमिनीवरच्या बागेत वर्षातुन दोनवेळा म्हणजे पावसाळ्याच्या आधी अन हिवाळा संपत असताना झाडाचं वय अन पसारा याचा विचार करुन शेणखत दिलं की तेवढं पुरेसं होत असतं. पाऊस अन एरवी वरुन दिलेलं पाणी यावर बागा फुलत अन फळत रहातात. परंतु गच्चीवरची बाग वा कुंड्यांमधे लावलेल्या बागेला मात्र वरुनच खतं द्यावी लागतात. खतं मग ती अन्नद्रव्यं असो की खुराक असो, आवश्यकतेनुसार दिली तरच त्याचा सुयोग्य किंवा ज्याला ऑप्टिमम वापर म्हणतात ते होईल. अर्थात बागांच्या दोन्ही प्रकारांत जमीन अन पॉटिंग मिक्स सुपीक असेल तर खतांची फारशी गरजही पडत नाही. फक्त कुंडीमधल्या बागेत दिलेल्या पाण्यासोबत बरीचशी खतं वापरली गेल्यामुळं किंवा वापर न होता वाहून जात असल्यामुळं आपल्याला नियमितपणं खतं द्यावी लागतात.

सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जी झाडं फळं देतात, मग त्या फळभाज्या असोत की केवळ फळं, अशा झाडांना जास्त खाद्याची गरज असते. यांच्या तुलनेत जी झाडं केवळ फुलझाडंच आहेत वा केवळ शोभेची झाडं आहेत त्यांची भूक मध्यम असते. अशा झाडांचा जेव्हा फुलण्याचा हंगाम असतो त्याआधी दिलेली खतं त्यांना हंगामभर फुलण्यासाठी पुरेशी होत असतात. अर्थात, जी झाडं वर्षभर फुलत असतात त्यांना मात्र वेळोवेळी खतं देणं गरजेचं असतं. वेळीच मिळणारा चौरस आहार झाडांची तब्येत गुटगुटीत अन निरोगी ठेवण्याच्या दृष्टीनं महत्वाचा असतो. अशा झाडांवर सहसा रोग पडत नाही अन पर्यायानं कीटकनाशकांवरचा खर्च अन वेळ दोन्हीही वाचतं.

खतं मग ती सेंद्रिय असोत की रासायनिक, ती मुळांना खाण्यायोग्य असतील तेव्हाच ती झाडांना मिळतात अन तेव्हाच त्या खतांचा झाडांवर झालेला परिणाम आपल्याला दिसतो. सेंद्रिय खतांच्या तुलनेत रासायनिक खतं पाण्यात लवकर विरघळतात अन ती मुळांना घेण्यासाठी लवकर उपलब्ध होत असतात. सेंद्रिय खतं ही मुळांना खाण्यायोग्य अवस्थेत पोहोचण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो. एक तर सेंद्रिय म्हणून दिलेल्या पण डिकंपोज न झालेल्या कुठल्याही गोष्टी, उदा. केळीची सालं, अंड्याची टरफलं वगैरे गोष्टी पूर्णतः डिकंपोज झाल्याशिवाय मुळांना घेता येत नाहीत. म्हणून अशा कुठल्याही गोष्टी आधी कंपोस्टमधे घालून त्याचं पूर्णपणे कंपोस्ट करुन घेऊन मगच ते झाडांना द्यावं. हवं तर झाडांचं ऍसिडिक अन अल्कलाईन असं विभाजन करुन त्याप्रमाणं कंपोस्ट बनवावं किंवा सरसकट एकाच प्रकारचं कंपोस्ट बनवुन ते झाडांना त्या त्या प्रमाणात द्यावं.

झाडांना कोणती खतं द्याय़ची यासोबतच तितकंच, किंबहुना जास्त महत्वाचं काय असेल तर ती द्याय़ची कशी. झाडाच्या खोडापाशी खतं देणं अन आपल्या पोटावर मध्यभागी कच्चे डाळ-तांदूळ ठेवणं दोन्हीही सारखंच. अशा प्रकारे खतं दिली तर झाडाची अन आपली भूक भागणं केवळ अशक्य. म्हणून खतं जर द्रवस्वरुपात असतील तर ती पानांवर फवारावी किंवा कुंडीतील झाडांना खोडापासून काही अंतर सोडून मातीमधे बांगडी पद्धतीनं म्हणजे गोलाकार द्यावीत. अशी खतं दिल्यावर लगेचच पाणी देऊ नये. म्हणजे ती खतं पाण्यासोबत वाहून जाणार नाहीत. गांडूळखत, शेणखत आदी घनरुपातील खतं जमिनीवरच्या अन कुंडीमधल्या बागेत खोडापासून काही अंतर सोडून गोलाकार पद्धतीनं, माती थोडी बाजुला करुन त्यामधे घालावी अन माती पुर्ववत सारखी करावी. वरुन लगेचच माती ओलसर होईल एवढंच पाणी देऊन ही खतं मातीत मिसळण्याची प्रक्रिया सुरु करुन द्यावी. पूर्णतः डिकंपोज झालेले किंवा कुजलेले खत मातीत मिसळून जाण्यास किमान २ ते ४ आठवडे लागतात. त्यामुळं आधी दिलेलं खत पूर्णपणं मातीमधे रुपांतरित झालं नसेल तर पुन्हा खत देऊ नये. जसं आपण तोंडात घेतलेला घास चर्वणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अन ९०%-९५% भाग घशाखाली उतरल्याशिवाय दुसरा घास घेत नाही तसंच. काही कारणानं खत देण्याच्या दोन हप्त्यांमधला कालावधी वाढला असेल तर खत देताना ती घनस्वरुपात देण्याऐवजी द्रवस्वरुपात दिल्यास ती मुळांना घेण्यासाठी लवकर उपलब्ध होतील.

सर्वसाधारणपणं प्रत्येक बागेत जी झाडं असतात वा ज्या भाज्या लावल्या जातात त्यांचं आपण तीन भागांमधे वर्गीकरण करुया. एक म्हणजे खतांची जास्त भूक असलेली झाडं, दुसरा मध्यम भूक असलेली झाडं अन तिसरा म्हणजे अल्प भूक असलेली झाडं. या प्रकारांमधे जी नांवं खाली दिली आहेत ती सर्वसमावेशक नसुन ती झाडांच्या वेगवेगळ्या प्रजाती, वाण, हवामान, पाऊसमान, माती, पाणी यानुसार बदलू शकते. काही झाडं ही या तीन प्रकारांमधील कुठल्याही दोन प्रकारांमधील सीमारेषेवर असतात. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेचं आहे अन ते म्हणजे झाडांचा फुलण्या-फळण्याचा सीझन जेव्हा असतो तेव्हा त्या सीझनभर त्यांची खतांची अन अन्नद्रव्यांची गरज ही परमोच्च असते. अगदी आपल्यासारखंच. आपल्याही वाढीच्या अन कष्ट करण्याच्या काळात आपला आहार जास्तही असतो अन पौष्टिकही असतो. तरच आपण कष्टाची कामं विनासायास करु शकतो. जसं आपण वृद्धत्वाकडं झुकत जातो तसा आपला आहार कमी होत जातो, अगदी तसंच झाडांचंही आहे. तेव्हा हे सारं लक्षात ठेवूनच खतांचं अन त्यांच्या वारंवारिता व प्रमाण यांचं नियोजन करावं. झाडं लावलेली माती, मग ती जमिनीवरच्या बागेत असो की कुंडीमधल्या, जर ती सुपीक अन अन्नद्रव्यांनी युक्त असेल तर वरखतांची गरज जास्त भासत नाही. खासकरुन बहुवर्षीय झाडं अन ज्या झाडांची खतांची गरज अल्प वा काहीशी मध्यम आहे त्यांना वरखतांची फारशी गरज नसते.

जास्त भूक : टोमॅटो, कोबीवर्गीय पिकं म्हणजे कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, टरबूज, मिरची, पालक, काकडी, कारली, पडवळ, वांगी. दुधीभोपळा, लाल भोपळा, भेंडी, कलिंगड, पपई, केळी, पेरू, लिंबू व इतर लिंबूवर्गीय फळझाडं, आंबा, नारळ, अळू, आलं, हळद, गुलाब, कमळ, कुमुदिनी, रेन लिली वगळता सर्व लिली प्रकार, वगैरे.

मध्यम भूक : मका, लसूण, लेट्युस, बटाटा, मुळा, गवार, कोथिंबीर, सीताफळ, अनंत, मोगरा, काजू, चिकू, सोनटक्का, प्राजक्त, सदाफुली, जास्वंद, वगैरे.

अल्प भूक : चवळी व अन्य शेंगवर्गीय वेली, बीट, गाजर, वाटाणा, कांदा, कढीपत्ता, सुरण, शेवगा, पुदीना, अननस, रताळी, चाफा, कवठी चाफा, सोनचाफा, शेवंती, रेन लिली, बकुळ, गोकर्ण, वगैरे.

गच्चीवर बाग असलेल्यांनी या यादीनुसार व आपल्या अनुभव अन निरिक्षणानुसार ही झाडं असलेल्या कुंड्यां एकत्र वा जवळजवळ ठेवल्यास झाडांच्या गरजेनुसार खतं देता येतील. त्यानुसार वेळ व दिवस ठरवता येईल. त्यामुळं वेळ अन कष्ट तर वाचतीलच. पण एखाद्या झाडाला गरज नसताना जास्त खत दिलं जाणार नाही किंवा गरज असतानाही खत दिलं नाही असं होणार नाही. दुसरं म्हणजे हे जे वर्गीकरण केलं आहे त्याप्रमाणं आपली खताची मात्रा अन दोन हप्त्यांमधला कालावधी ठरवावा. अर्थात जास्त भूक म्हणजे अख्खं ताट भरुन अन्न वाढायचं असं नव्हे तर झाडाच्या वयानुसार अन कुंडीच्या आकारानुसार खताची मात्रा अन ते देण्याचा कालावधी हे ठरवायचं आहे. अपचन किंवा अजीर्ण हे फक्त आपल्यालाच होतं असं नव्हे तर ते झाडालाही होत असतं.

घनस्वरुपामधली खतं दिल्यावर झाडांना लगेचच पाणी देणं गरजेचं असतं. अन्यथा खतांमधील उष्णतेमुळं मुळं जळून जाण्याची शक्यता असते. यासाठी खतं दिल्यावर पुढचे चार ते पाच दिवस कुंडीमधली माती ओलसर राहील याची काळजी घ्यावी लागते. ज्या खतांमधे नत्र जास्त प्रमाणात आहे अशी खतं दिल्यावर तर पाणी देणं टाळू नये. नत्र जास्त झाल्यास मुळं जळतात.

आशा आहे की या लेखानुसार अन मुख्य म्हणजे आपापल्या अनुभव अन निरिक्षणानुसार तुम्ही खतांचं नियोजन कराल अन कमी कष्टांत आपल्या बागेतुन जास्त उत्पादन घ्याल.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya


गच्चीवर मोठी झाडं लावताना घ्यावयाची काळजी.

गच्चीवर मोठी झाडं लावताना घ्यावयाची काळजी.



आजवर गच्चीवर आपण फुलझाडं लावली, भाजीपालाही घेतला. त्यासाठी कुंड्यांपासून ते वाफे करण्यापर्यंत सार्ख काही केलं जे हीच झाडं जमिनीवर लावताना केलं असतं. ज्यांना शक्य आहे, ज्यांच्याकडं गच्चीवर जागा आहे, स्ट्रक्चरही भक्कम आहे अशांनी मोठी फळझाडंही लावण्यास हरकत नाही. फक्त त्यासाठी काही अभ्यास, काही पूर्वकाळजी घेणं गरजेचं आहे. ती काय आहे हे आपण या लेखात पाहू. पावसाळा जरी दोन महिन्यांवर आला असला तरी आपण गच्चीवर काय अन कसं लावायचं याची तयारी आतापासून करायला हवी.

मोठी झाडं जर जमिनीवर लावल्यास ती पूर्ण वाढल्यावर त्यांची मुळं किती खोल जातात हे आधी पहाय़ला हवं. त्यानुसार आपण कुंडी वा इतर तत्सम वस्तु अशी झाडं लावण्यासाठी घेऊ शकतो. अर्थातच जमिनीवर ही झाडं लावल्यास ती केवळ खालच्या दिशेनंच वाढतात असं नाही तर ती आसपासच्याही भागात पसरत जात असतात. आपण कुंडी कितीही खोल घेतली तरी तिचा व्यास मर्यादितच रहाणार आहे. परिणामी जी मुळं अन्यथा आजुबाजुस पसरली असती तीही खालच्या बाजुस वळून वाढणार आहेत. त्यामुळं काही काळानंतर कुंडीमधे मुळांची दाटी होणारच. यासाठी झाडाच्या वाढीनुसार अन वयानुसार त्याचं रिपॉटिंग एक ते दोन वर्षांआड करणं गरजेचं होतं. अशा रिपॉटिंगच्यावेळेस त्यावेळी असलेल्या कुंडीपेक्षा किमान दीडपट मोठी कुंडी घेणं क्रमप्राप्त ठरेल. हे कुंडी बदलणं क्रमाक्रमानं करणं योग्य ठरतं. रोप लहान असतानाच मोठी कुंडी घेणं शक्यतो टाळावं. कारण मोठी होणारी झाडं निसर्गतः आपला पाया अर्थात आपली रूट सिस्टिम भक्कम करण्याला प्राधान्य देत असतात. त्यामुळं आपण रोप लावताना मोठ्या कुंडीत लावलं तर त्याची वाढ पृष्ठभागावर कमी दिसते अन झाड वाढत नाही अशी शंका आपल्या मनात येते.

झाडांची मुळं मुख्यत्वे दोन प्रकारची असतात. काही झाडांना एक सोटमूळ असतं अन त्याला उपमुळं फुटलेली असतात तर काही झाडांना केसांसारखी अनेक मुळं असतात. झाडांची सोटमुळं दोन कामं करतात. एक म्हणजे जमिनीवरचा झाडाचा भार सांभाळणं अन झाडाला लागणारं पाणी मिळवण्यासाठी आवश्यक तितकं खोल जाणं. उत्तम प्रतीच्या जमिनीमधे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळं अशा मातीमधे लावलेल्या फळझाडांची सोटमुळं जास्तीत जास्त दीड फूट म्हणजे १८ इंच खोल मातीमधे जातात.

केसांसारखी मुळं असतात ती मुख्यतः झाडाचा भार सांभाळत असतात अन त्याबरोबरच झाडाच्या वाढीसाठी लागणारं पाणी अन अन्नद्रव्यं शोधण्यासाठी झाडाच्या आसपास पण साधारण एक फूटभर मातीमधे जात असतात. पाणी अन अन्नद्रव्य यांसोबतच ही मुळं झाडाला लागणारा प्राणवायुही पुरवणं हे यांचं काम असल्यानं ही मुळं मातीमधे फार खोलवर जात नाहीत. त्यामुळं कुंडीमधे हवा खेळती ठेवणं, बाहेरच्या भागाला भरपूर छिद्रं करुन ती नेहमी मोकळी रहातील हे पाहिल्यास ही मुळंही फार दूरवर पसरणार नाहीत. ज्या मातीमधे प्राणवायु कमी असतो किंवा जी माती घट्ट म्हणजे  कॉम्पॅक्ट असते तिथं ही मुळं वाढत नाहीत अन परिणामी झाडांची वाढ होत नाही. अर्थात आपण जर वांगी, टोमॅटो या रोपांची केशमुळं अन त्यांचा आकार व मोठ्या झाडांच्या केशमुळं अन त्यांचा आकार वा व्यास यांची तुलना केल्यास मोठ्या वाढणाऱ्या झाडांच्या केशमुळांचा पसारा अन व्यास व व्याप्ती मोठीच असते. म्हणून कुंडीची खोली अन व्यास निवडताना याही मुद्द्याचा विचार करणं महत्वाचं असतं.

हेच दुसऱ्या शब्दांत किंवा सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास झाडाला लागणारं पाणी जमिनीच्या वरच्या भागात उपलब्ध असेल अन त्याला वाढीसाठी लागणारी सारी अन्नद्रव्यं व प्राणवायु अन योग्य माती वरच्या थरात उपलब्ध असेल तर सोटमुळं जास्त खोलवर जाणार नाहीत अन केशमुळंही फार दूरवर पसरणार नाहीत. आपण जर झाडाची पाणी अन अन्नद्रव्याची योग्य ती सोय केली तर मोठी होणारी झाडंही मोठ्या कुंड्यांमधे लावू शकतो. मातीचा वरचा भाग जितका कोरडा तितकी मुळं खोल अन आजुबाजुस पसरलेली असणार हे ध्यानात ठेवल्यास अन त्यानुसार खतपाणी केल्यास अशी झाडं आपण गच्चीवरही लावू शकतो. रहाता राहिला प्रश्न वजनाचा. तर पूर्ण वाढलेलं झाड अधिक त्यावर लगडलेली फळं यांचं वजन आणि गच्चीची वजन पेलण्याची क्षमता या दोन्हीचा विचार करुनच झाडांची निवड अन योग्य ती संख्या हे ठरवुन लागवड करावी.

मुळांच्या या दोन प्रमुख प्रकारांशिवाय त्यांचा अजून एक प्रकार असतो. ती म्हणजे योगायोगानं वा काही खास कारणानं फुटलेली मुळं अर्थात Adventitious Roots. या प्रकारातली मुळं झाडांच्या जमिनीच्या वरच्या भागावर कधी झाडांच्या बेचक्यांमधे फुटतात तर कधी ती जमिनीशी समांतर पसरत जाऊन त्यातुन एखादा कोंब मातीच्या वर येतो. ही अशी मुळं केव्हाही फुटू शकतात. खास करुन जेव्हा झाडाचं अस्तित्व, त्याची मुख्य मुळं संकटात आल्यावर ते संपण्याची भिती उत्पन्न झाली की अशी मुळं फुटतात. म्हणजे उदाहरणार्थ, पूरसदृश स्थिती निर्माण झाली अन झाडं पाण्याखाली गेली की वरच्या भागावर अशी मुळं फुटून ती झाडासाठी आवश्यक असणारं अन्न अन प्राणवायू झाडाला उपलब्ध करुन देण्याचं काम करतात. बरेंचदा झाडाची नवीन पिढी वेगानं निर्माण करायची असेल तरीही अशी मुळं फुटुन नवे कोंब मातीमधुन वर येतात. कधी मुख्य मुळांना दुखापत झाली अन त्यांची काम करण्याची शक्यताच धोक्यात आली तरीदेखील अशी मुळं फुटतात. कधी झाडाच्या मोठ्या पसाऱ्याला आधार देण्यासाठीही अशी मुळं फुटतात. उदा. वड, पिंपळ अशा झाडांना फुटलेल्या मुळांना आपण पारंब्या म्हणतो. मुळांच्या या प्रकारावर अजुन बरंच काही लिहिता येईल, पण या लेखाचा तो विषय नसल्यानं या प्रकारच्या मुळांची एवढी तोंडओळख पुरेशी आहे. अर्थात यामागं निसर्गाचा त्याचं चक्र अविरत सुरु रहाण्यासाठी किती विचार असतो याची कल्पना यावी.

मोठ्या वाढणाऱ्या झाडांची मुळं खोलवर किंवा आजुबाजूस वाढत असताना ती पुष्कळ जागा घेत असतात. अशावेळी इतर झाडांची मुळं जवळपास आल्यास दोन्ही झाडांमधे अन्नद्रव्यं अन पाणी वगैरेंसाठी स्पर्धा उत्पन्न होते. म्हणून आपण लावलेल्या झाडाची मुळं वाढीदरम्यान किती जागा व्यापतील याचा हिशेब करुनच जवळपास वा त्या कुंडीत कुठली इतर झाडं वा रोपं लावता येतील याचा आधी विचार करुनच त्यानुसार लागवड करावी. हे विशेषतः सहचर लागवड अर्थात कम्पॅनिअन प्लांटिंग करत असताना मुख्य झाड अन दुय्यम स्थानी लावणार असलेलं झाड यांच्या वाढीच्या अन त्यांच्या अन्नाच्या गरजा यांचा विचार करुनच करावं.

मोठ्या झाडांची लागवड कुंडीमधे करताना जी माती वा पॉटिंग सॉईल किंवा जे मिश्रण निवडाल तेही आधी ठरवुनच घ्यावं. मुळांच्या वाढीसाठी लागणारं पाणी, मुख्य अन्नद्रव्यं अन मुख्य म्हणजे प्राणवायु यांचा विचार करता मातीमधे घालण्यासाठीचे घटक निवडावेत. गरजेपुरतं पाणी टिकून रहाण्यासाठी माती जास्त घेतली तर ती कालांतरानं घट्ट होऊन प्राणवायुची कमतरता भासणार. प्राणवायुसाठी हवा खेळती रहावी म्हणून वाळू जास्त घातली तर पाण्याचा निचरा लवकर होणार. तेव्हा सारे घटक हे झाडाची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊनच निवडावेत. म्हणून सुरुवातीच्या काळात झाडाची चांगली वाढ होण्यासाठी नियमित खतपाणी करण्यावर कटाक्षानं लक्ष द्यावं.

झाडं एकदा वाढू लागली की फळांचा एक सीझन झाल्यावर त्यांची आपण छाटणी करत असतो. त्यामुळं झाडांचा आकारही मर्यादित ठेवण्यास मदत होते अन नवीन फूट येऊन त्यावर फळं धरली जातात. पण अशा छाटणीनंतर जशा नवीन फांद्या फुटत असतात तशीच नवीन मुळंही फुटत असतात. झाडांमधे फांद्या आणि मुळं यांचं गुणोत्तर व त्यांच्यामधे असलेलं संदेशवहन अन अन्नद्रव्यांची देवाणघेवाण हे निसर्गतःच अगदी सुयोग्य पद्धतीनं आखलेलं असतं. यासाठीच छाटणी करत असतानाही ती योग्य प्रमाणातच करावी लागते. छाटणी जर जास्त प्रमाणात झाली तर झाडाची वाढ काही काळासाठी थांबते. क्वचितप्रसंगी झाड दगावण्याचीही शक्यता असते किंवा काही काळासाठी झाड फळं देणं बंद करतं. म्हणून मुळांनी सद्यस्थितीमधे कुंडीचा व्यापलेला भाग, किती छाटणी केली तर नवीन मुळं फुटतील अन त्यांना सामावुन घेण्यासाठी किती जागा असेल वा लागेल याचा विचार करुनच कुंडी निवडावी. हा मुद्दा खासकरुन रिपॉटिंगच्या वेळी ध्यानात ठेवावा.

खाली आपल्याकडं लावल्या जाणाऱ्या काही फळझाडांची यादी, त्यांची मुळं कशी असतात व कुंड्या वा पिंपांमधे ती लावायची झाल्यास दोन वर्षांमधे काय आकाराच्या कुंड्या वा इतर तत्सम वस्तु घ्याव्या लागतील याची यादी देत आहे. ज्या झाडांना सोटमुळं आहेत त्यांना उपमुळंही फुटत असतात अन तीही अन्नग्रहणाचं व पाणी अन प्राणवायु घेण्याचं काम करीत असतात. त्यामुळं त्यांची वाढही लक्षात घेणं गरजेचं आहे. जमिनीवर लावली असता ही झाडं ३०-४० फुट वा त्याहीपेक्षा मोठी होणारी आहेत. आपण जर जागेअभावी वा वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुंडीमधे लावणार असु तर दर वर्षी वा एक वर्षाआड त्यांची योग्य तेवढी छाटणी करणं गरजेचं आहे. नर्सरींमधे या साऱ्यांची कलमं वा ड्वार्फ व्हरायटीजही मिळतात. ती जर घेऊन लावल्यास सारंच काम सोपं होऊन जाईल अन फळंही लवकर मिळण्यास सुरुवात होईल. फक्त अशी कलमं वा ड्वार्फ व्हरायटीज खात्रीशीर असायला हव्यात.

पेरू - केशमुळं - १८ इंच खोल व १८ ते २० इंच व्यास

पपई - सोटमूळ - १८ इंच खोल व १८ ते २२ इंच व्यास

केळ - केशमुळं - १८ इंच खोल व १८ ते २२ इंच व्यास

सिताफळ - सोटमूळ - २४ इंच खोल व १८ ते २० इंच व्यास

आंबा - सोटमूळ - २४ इंच खोल व २४ इंच व्यास

चिकू - केशमुळं - २४ इंच खोल व २४ इंच व्यास

लिंबू - मिश्र - २४ इंच खोल व २४ इंच व्यास

अंजिर - केशमुळं - २४ इंच खोल व २४ इंच व्यास

काजू - सोटमूळ - ४० इंच खोल व ४० इंच व्यास

शेवगा - सोटमूळ - ३० इंच खोल व २०-२४ इंच व्यास


तळटीप : हा लेख स्वानुभवावर आधारित तर आहेच, पण आवश्यक तिथं इंटरनेटचा आधार घेतला आहे. सोबतचे फोटो माझ्या घराच्या गच्चीवरील आहेत.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

घरच्या बागेतल्या कुंडीत पिकवा भुईमूग.

घरच्या बागेतल्या कुंडीत पिकवा भुईमूग.



तुमची बाग गच्चीवरची असो की जमिनीवरची, त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बरंच काही लावत असाल. फुलझाडं असतील तसंच फळझाडंही. फळभाज्या असतील अन पालेभाज्या वा कंदवर्गीय भाज्यादेखील असतील. या साऱ्यासाठी वेगवेगळ्या कुंड्या असतील. पण जर कुंडीत एकच फळझाड असेल किंवा फुलझाड असेल तर त्या कुंडीमधली माती, तुम्ही देत असाल ते खत अन पाणी फक्त त्या झाडापुरतंच मर्यादित असेल तर त्याला अर्थशास्त्रीय भाषेत वेस्टेज ऑफ रिसोर्सेस म्हणता येईल. हे अगदीच अक्षम्य असं दर्शवायचं असेल तर त्यालाच क्रिमिनल वेस्टेज ऑफ रिसोर्सेस देखील म्हणता येईल.


यापुर्वी मी बरेंचदा आंतरपीकं किंवा कंपॅनिअन प्लँटिंग यावर लिहिलं आहे. कधी लेखनाच्या ओघात त्यावर लिहिलं असेल तर कधी वेगळे लेखही लिहिले असतील. त्याबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास, कुंडीतील खत, माती अन देण्यात येणारं पाणी या साऱ्यावर जसं कुंडीतलं मुख्य झाड पोसलं जात असतं तसंच त्याला त्रास न देता, उलट त्याला वाढीमधे अन फुलण्या-फळण्यामधे सहकार्य करत जर दुसरं काही लावलं तर त्याला आंतरपीकं किंवा कंपॅनिअन प्लँटिंग असं म्हणतात. या पद्धतीमधे पिकं घेताना सहसा जमिनीच्या वरच्या भागात एक अन खालच्या भागात एक अशा जोड्या लावल्या जातात. म्हणजे वांगी टोमॅटोसारखं फळझाड असेल तर तिथं कंदवर्गीय म्हणजे बटाटा, रताळं यासारखं पीक घेतलं जातं. यावर सविस्तर लेख याच ठिकाणी शोधल्यास मिळतील.


आंतरपीकं घेताना जर द्विदल प्रकारातील पिकं घेतली तर मुख्य पिकासाठी लागणारं नत्र आपोआप उपलब्ध होऊ शकतं. कारण द्विदल धान्यांची मुळं हवेतील नत्र शोषून घेऊन ते जवळील मातीमधे उपलब्ध करुन देत असतात. मुळांपासच्या मातीमधे जर नत्र भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल तर झाडाची शाखीय वाढ उत्तम रीतीनं होते. शाखा जेवढ्या जास्त तेवढी फुलं अन फळं जास्त हे साधं गणित आहे. सगळी कडधान्यं द्विदल प्रकारात मोडत असतात. भुईमूग हेही एक द्विदलवर्गीय पीक असल्यानं तसंच त्याच्या मुळावरील गाठींमुळं वातावरणातील नत्र वायू जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.


भुईमूग हे जमिनीखाली वाढणारं पीक आहे. त्यामुळं याच्या वाढीसाठी जमीन भुसभुशीत असणं गरजेचं असतं. वाळू अन सेंद्रिय पदार्थ विपुल प्रमाणात असलेल्या मातीमधे भुईमूगाच्या मुळांची वाढ चांगली होऊन त्यावर अधिक प्रमाणात शेंगा धरण्यास मदत होते. ज्या कुंड्या, विशेषतः फळझाडांच्या कुंड्या भरताना जर त्यामधे वाळू किंवा इतर काही घटक, जसं की भाताचं तूस, लिफ मोल्ड वगैरे भरुन जोडीला कंपोस्ट अन शेणखत मुबलक प्रमाणात घातलं असेल अन माती भुसभुशीत असेल तर अशा कुंड्यांमधे भुईमूग लावता येईल.


भुईमूग लावण्यासाठी जर वेगळी व्यवस्था करणार असाल तर कुंडी किमान दहा इंच खोल असावी. पुठ्ठ्याचा खोका किंवा आयताकृती कुंडी घेतल्यास रोपांची दाटी होणार नाही अन वरचा भाग व खालचा भाग या दोन्ही भागांना वाढण्यासाठी पुरेशी जागा राहील. कुंडी भरताना मातीमधे शेणखत, कंपोस्ट, वाळू, वाळू नसेल तर भाताचं तूस किंवा वाळलेल्या पाला-पाचोळ्याचा चुरा मिसळावा. माती भुसभुशीत रहावी म्हणून त्यामधे वाळू किंवा पालापाचोळा अन कंपोस्ट असणं गरजेचं आहे.


ज्यांची बाग जमिनीवर आहे त्यांनी मोठ्या झाडांच्या बुंध्याशी, आळ्यात लगवड करावी किंवा जागा असेल तर गादी वाफा तयार करुन घ्यावा. वाफ्याची लांबी अन रुंदी जागेच्या उपलब्धतेनुसार घ्यावी पण उंची मात्र आठ ते दहा इंच ठेवावी. वाफा भरुन घेताना त्यामाधे भरपूर पालापाचोळा चुरुन घातल्यास माती भुसभुशीत रहाण्यास मदत होईल. त्यासोबतच शेणखत अन कंपोस्ट देखील भरपूर घालावं म्हणजे शेंगा वाढताना लागणारं सेंद्रीय खत मुळांना उपलब्ध राहील. वाफ्याच्या सभोवार पाणी साचून रहाणार नाही, पण वाफा मात्र नेहमी ओलसर राहील याची दक्षता वाफा बनवत असतानाच घ्यावी.


पेरणीसाठी जे शेंगदाणे लागतील ते शक्यतो भुईमूगाच्या टरफलासह शेंगा असतील त्या वापराव्या. पेरताना टरफलं हलक्या हातानं, आतले दाणे दुखावणार नाहीत, ते जोडामधुन वेगळे होणार नाहीत अन त्यावरचं सालही निघणार नाही याची काळजी घ्यावी. घरात जे शेंगदाणे असतील अन ते जर नुकतेच आणले असतील तर त्यातीलही दाणे पेरणीसाठी वापरु शकता. फक्त दाणे अख्खे असावे. त्याची सालं निघालेली नसावीत. दाणे पेरणीसाठी निवडताना टपोरे घ्यावेत. दबलेले, छोटे, कोवळे तसंच जुने, बुरशी आलेले दाणे घेऊ नयेत. शेंगदाण्याचं शेल्फ लाईफ साधारणतः सहा महिने असतं. त्यानंतर ते खवट होऊ लागतात. असे दाणे पेरल्यास ते उगवणार नाहीत अन उगवलेच तर येणारं पीकही सकस नसेल. म्हणून नुकतेच आणलेले दाणे घ्यावेत किंवा नर्सरीतुन पेरणीसाठी असलेले दाणे आणावेत.


कुंडीच्या आकारमानाप्रमाणं दाणे पेरताना दोन दाण्यांमधलं अंतर चार ते पाच इंच ठेवावं. मातीमधे बोटानं दीड ते दोन इंच खोल खड्डा करुन त्यात दाणा पेरुन माती सारखी करुन घ्यावी. वाफा केला असेल तरीही दोन दाण्यांतलं अंतर चार ते पाच इंचच ठेवावं. एकापेक्षा अधिक रांगा होतील एवढा वाफा बनवला असेल तर दोन ओळींमधलं अंतर फूटभर ठेवावं. दाणे पेरून झाल्यावर लगेचच पाणी द्यावं.


लागवड वेगळ्या कुंडीमधे केलेली असो वा कुठल्या झाडाच्या मुळाशी किंवा जमिनीवरच्या वाफ्यांवर, पेरणी करुन पाणी दिल्यावर लगेचच सुक्या पाचोळ्याचं मल्चिंग करुन घ्यावं. त्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन तर होणार नाहीच, पण पीकवाढीसाठी आवश्यक असलेलं तापमानही राखलं जाईल. शेण वा मातीमधुन इतर तणांच्या बिया येऊन जर त्या रुजल्या असतील तर असं तण दिसताक्षणी काढून त्याचे तुकडे करुन जागेवरच टाकावं. त्याचं मल्चिंग म्हणून असलेल्या इतर पालापाचोळ्यासोबतच खत होऊन जाईल. भुईमूगाची रोपं वाढत असताना मात्र तण उपटून काढणं टाळावं. त्यामुळं भुईमूगाच्या रोपांच्या मुळांना धक्का लागु शकतो.


भुईमूगाला पाणी देताना कुंडी वा वाफा ओलसर (मॉईस्ट) राहील याची काळजी घ्यावी. पाण्याचा ताणही देऊ नये अन अती पाणीही देऊ नये. मातीचा वरचा इंचभराचा थर कोरडा दिसत असेल तरच पाणी द्यावं. बटाटा वाढताना जसं आपण मातीची भर देतो तसं भुईमूगाची रोपं वाढताना केल्यास अधिक शेंगा मिळू शकतील.


पेरणीच्या पंधरा ते वीस दिवसांनंतर दर दोन ते तीन आठवड्यांच्या अंतरानं रोपांवर कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेलं द्रावण फवारल्यास कुठलीही कीड लागणार नाही. कडुलिंबाचा पाला हातानं चुरडून दोन दिवस पाण्यात भिजत ठेवावा. नंतर ते पाणी गाळून घेऊन बाटलीत भरुन ठेवावं. पाला कंपोस्टमधे किंवा सर्व कुंड्यांच्या वर थोडा थोडा टाकुन द्यावा. हे पाणी दसपट साध्या पाण्यात मिक्स करुन ते बागेत फवारावं. अर्क जास्त झाला असेल तर बाटलीत भरुन सावलीत ठेवावा. असा अर्क तीन महिन्यांत वापरुन टाकावा.


भुईमूगाच्या शेंगा काढणीसाठी तयार होण्यासाठी त्याच्या वाणानुसार साडेतीन ते चार महिने लागतात. आपण छोट्या प्रमाणात अन तेही दुकानातून घेतलेल्या दाण्यांमधुन काही दाणे घेऊन पेरणार असल्यामुळं तो दाणा कुठल्या वाणाचा आहे हे आपल्याला माहीत असणं शक्य नाही. त्यामुळं शेंगा काढणीसाठी नक्की कधी तयार होतील हे सांगता येणार नाही. रोपांचा पाला पिवळा पडू लागल्यावर एखादं रोप हलकेच बाहेर काढून शेंगांचा आकार पहावा. शेंग योग्य त्या आकाराची झाली असेल, टरफल कडक झालं असेल तर एखादी शेंग काढून ती फोडून पहावी. तिचा आतला भाग काळसर झाला असेल तर शेंग काढणीसाठी तयार आहे असं समजावं.


आपापल्या आवडीनुसार वापरासाठी शेंगा काढून घ्याव्या. म्हणजे उकडून वा भाजून शेंगा खायच्या आहेत की पक्व दाणे काढून ते घरात वापरण्यासाठी घ्यायचे आहेत हे ठरवुन त्यानुसार शेंगा काढाव्यात. जर दाणे वापरण्यासाठी शेंगा काढायच्या असतील तर शेंगा पूर्णपणं पक्व होऊ द्याव्या. नंतर सर्व शेंगा काढून घेऊन वाळवाव्या अन मग सावकाश फोडून आतले दाणे वापरण्यासाठी घ्यावेत. किंवा रोपं दोरीला टांगून ठेऊन शेंगा वाळवाव्या अन नंतर वापरासाठी फोडून घ्याव्या. वाळलेली रोपं कंपोस्टमधे किंवा इतर कुंड्यांमधे पसरुन द्यावी. त्यांच्या मुळांवरील गाठींमधे असलेलं नत्र इतर झाडांना उपलब्ध होईल.


शेंगा काढल्यानंतर वेगळी कुंडी वापरली असेल तर त्यामधील माती किंवा वाफ्यावर लागवड केली असल्यास तो वाफा लगेचच इतर कुठल्याही रोपांसाठी वा पिकांसाठी वापरु नये. किमान आठवडाभर ती माती उन्हात वाळवुन घ्यावी. नंतर त्यात पुन्हा शेणखत, कंपोस्ट, नीमपेंड वगैरे घटक घालून मगच ती माती वापरांत घ्यावी.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya 

ज्यांची बाग संपूर्णपणं सेंद्रीय आहे त्यांच्यासाठी

ज्यांची बाग संपूर्णपणं सेंद्रीय आहे त्यांच्यासाठी.



तुमच्या बागेत जर तुम्ही फक्त अन फक्त सेंद्रीय खतंच वापरत असाल, म्हणजेच जर तुम्ही तुमच्या बागेचं बहुतांश सारं काम जीवाणूंमार्फतच करुन घेत असाल आणि जीवामृत वा इतर कुठलीही द्रवरुप खतं बनविण्यासाठी नळाचं पाणी थेट वापरत असाल तर एक सावधगिरीचा सल्ला.

तुम्ही जर बागेत नळाचं पाणी थेट देत असाल तर त्यात महानगरपालिकेद्वारे अथवा स्थानिक पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थेनं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी घातलेल्या क्लोरिनमुळं कंपोस्ट, गांडूळखत, शेणखत इत्यादी सेंद्रिय खतांमधले जीवाणू मरतात. त्यामुळं झाडांना दिलेली खतं त्यांना खाण्यायोग्य करण्यासाठी जीवाणू शिल्लक उरत नाहीत. यासाठी पाण्यातील क्लोरीन घालवणं गरजेचं असतं.

  • पाणी उकळून गार करुन झाडांना देणं हा एक मार्ग आहे पण तो खर्चिक अन तापदायक आहे.
  • बाजारात पाण्यात विरघळणाऱ्या "व्हिटामिन सी"च्या गोळ्या मिळतात. शंभर लिटर पाण्यात एक गोळी घालून दहा-पंधरा मिनिटं थांबल्यावर पाणी ढवळून घेतल्यास त्यातील क्लोरिन निघुन जातो. हाही उपाय खर्चिक आहे अन व्हिटामिन सी जास्त प्रमाणात घातलं गेल्यास मातीचा पीएच बदलु शकतो.
  • पाणी भरलेलं पिंप वा बादली चोवीस तास उघडं ठेवल्यासही त्यातील क्लोरिन निघुन जातो. हा उपाय सर्वात सोपा अन बिनखर्चाचा आहे. फक्त यासाठी प्लानिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे मला बागेला उद्या पाणी द्याय़चं असेल तर मी आजच बागेच्या गरजेनुसार पाणी भरुन ते पिंप तसंच उघडं ठेवणं किंवा त्यात काही पडू नये म्हणून पातळ अन जाळीदार फडक्यानं झाकुन ठेवणं आवश्यक आहे.

वरीलपैकी कुठलाही पर्याय वापरणार असाल तरीही बागेला पाणी देताना ते ढवळून दिल्यास त्याचा मातीला जास्त उपयोग होतो.

अर्थात, जीवाणूंच्या संख्येत सतत वाढ होत असल्यानं जे जीवाणू मरतात त्यांच्या जागी नवीन जीवाणू काही कालावधीतच येत असतात. पण आपण काळजी घेतलेली बरी. म्हणून हा आगंतुक सल्ला.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

केळी लागवडीची वेगळी पद्धत (Banana Circle)

केळी लागवडीची वेगळी पद्धत




ज्या बागप्रेमींची बाग जमिनीवर आहे त्यांच्यापैकी बहुतांशजणांच्या बागेत केळीची झाडं असतीलच. फारशी देखभालीची गरज नसलेलं अन वर्षातुन एकदा भरपूर केळी देऊन निवृत्त होण्यापूर्वी केळीचं झाड एक दोन नवीन रोपं देऊनच जातं. ही नवीन रोपं काढून दुसरीकडं लावली किंवा आहे तिथंच वाढवली तर पुढच्या वर्षभरात पुन्हा केळी अन पुन्हा काही रोपं असा क्रम सुरुच रहात असतो. ज्यांची बाग गच्चीवर वा बाल्कनीत आहे त्यांच्याऐकीही काहीजणांकडं केळीची झाडं कुंड्यांमधे लावलेली असतील.


केळीची झाडं बागेत जमिनीवर लावल्यावर त्यांना फारशा देखभालीची गरज भासत नाही. नियमितपणं मिळणारं पाणी अन इतर झाडांसोबतच मिळणारं खत यावर ही झाडं व्यवस्थित वाढतात अन आपल्या नियत वेळेनुसार फळं देतात. भरपूर उन अन वेळच्यावेळी पाणी मिळाल्यास साधारणतः दहा ते बारा महिन्यात केळीच्या झाडावर फुल येतं अन त्यातुनच एक एक करत फण्या निघतात अन साधारण चार ते पाच महिन्यांत केळी पिकतात. एखादी फणी पिकल्यावर घड काढून घेऊन पोत्यानं झाकुन ठेवल्यास आठवड्याभरात तो पिकतो अन आपल्या कष्टाचं फळ आपल्याला खायला मिळतं. अगदी फारसे कष्ट घेतले नसले तरीही. त्यानंतर केळीचं ते झाड काढून त्याची विल्हेवाट लावावी लागते किंवा नाही केल्यास ते जागीच डिकंपोज होतं. असं तोडलेलं झाड कंपोस्टमधे टाकता येतं किंवा तुकडे करुन मल्चिंग म्हणून वापरता येतं. अर्थात अती ओलसरपणामुळं बुरशीजन्य रोग लागु नयेत याची काळजी घेणं गरजेचं असतं.


साधारणतः जिथं घरात वापरलं जाणारं पाणी बाहेर बागेत निघतं अशा ठिकाणी केळीची झाडं लावली जातात. त्यामुळं त्यांना वेगळं पाणी देण्याची गरज पडत नाही. बाथरुम वा किचन सिंकमधुन बाहेर बागेत जाणाऱ्या पाण्यावर केळीची झाडं छान पोसली जात असतात. पण अशा ठिकाणी जर उन्हाची उणीव भासत असेल तर किंवा उनच मिळत नसेल तर तिथं केळीची झाडं लावण्यात काहीच अर्थ नसतो. कारण जितकं उन जास्त तितकी केळीची वाढ उत्तम होते.


याशिवाय केळीला सेंद्रीय खत जास्त मानवतं. केळीच्या झाडाची खताची भूक फारच तीव्र असते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तर केळीला आवश्यक असतेच, पण सेंद्रीय खतं जर भरपूर प्रमाणात मिळत असतील तर केळीच्या झाडाची वाढ उत्तम रितीनं होते अन येणारी फळंही छान सुदृढ असतात. या साऱ्या गोष्टींचा विचार केल्य़ास सामान्यतः केळीची झाडं बागेत अशा ठिकाणी लावली जातात जिथं भरपूर उन मिळतं. मग अशा ठिकाणी खड्डा खणून केळ लावली जाते अन तिला नियमितपणं पाणी दिलं जातं अन खतं दिली जातात.


परंतु जर केळीला लागणाऱ्या सेंद्रीय खतांची गरज जर आपण जागीच भागवु शकलो तर? हे असं करण्यासाठीच एक वेगळी पद्धत आपल्याला वापरता येईल. कशी ते पाहूया.


केळीचा एक कंद जरी आपण लावला तरी त्या कंदाची पूर्ण वाढ होईपर्यंत त्याला आजुबाजुनं नवीन कोंब फुटत रहातात. अगदी मुख्य कंदाला वा झाडाला चिकटून नवीन कोंब फूटून ते मातीबाहेर येतात अन वाढत रहातात. ते जर वेळीच काढून दुसरीकडं लावले नाहीत तर ते तिरके वाढतात. मग जेव्हा त्यांना फुल येऊन घड धरल्यावर तो जसजसा मोठा होत जातो तसे आधीच तिरकं असलेलं झाड जमिनीकडं अधिक झुकू लागतात. घडाचं वजन अशा तिरक्या वाढलेल्या झाडाला सहन झालं नाही किंवा जोराचा वारा सुटल्यास केळीचं झाड मध्यावर तुटून कोसळण्याची शक्यता असते. कारण केळीच्या खोडामधे पाण्याचाच जास्त भाग असतो. त्यामधे कुठंही इतर फळझाडांमधे असतं तसं कठिण असं लाकूड नसतं. यासाठी अशा वाढलेल्या झाडांना घड वाढण्याच्या काळात आधार द्यावा लागतो. पण हे टाळण्यासाठी म्हणून मातीमधुन आलेले कोंब मुळासह हलक्या हातानं मुख्य झाडापासून कापून काढून दुसरीकडं लावावे लागतात.


या लेखात आपण केळीचा कंद लावण्याची जी पद्धत पहाणार आहोत ती शेतीच्या पर्माकल्चर या प्रकारामधे वापरली जाते. पर्माकल्चर म्हणजे पर्मनंट ऍग्रीकल्चर. या पद्धतीत शेती करताना पारंपारिक पद्धतीमधे दर वर्षी किंवा ठराविक कालावधीनंतर जसं आपण नांगरणी वा खतं देण्यासाठी खोदणं किंवा माती उकरणं वगैरे करत असतो ते केलं जात नाही. झाडं लावताना किंवा प्रथमच शेती लावताना जी काय नांगरट असेल किंवा खड्डा खणणं असेल तेवढंच केलं जातं. नंतर शेतीला वा झाडांना निरंतर सेंद्रीय खतं जागच्या जागीच मिळण्याची व्यवस्था केली जाते.


या पद्धतीमधे केळ लावण्यासाठी आधी जागा ठरवुन घेऊन जागेच्या उपलब्धतेनुसार मध्यभागी जमेल तितका मोठा अन खोल खड्डा करुन घ्यायचा. खड्ड्यातून काढलेली माती खड्ड्याच्या बाजुनं ओढून घेऊन उंचवटा करुन घ्यायचा. हा खड्डा कंपोस्टनं भरुन घ्यायचा. खड्डा भरेल एवढं कंपोस्ट तयार नसेल तर बागेतला पालापाचोळा, काड्या वगैरे त्यात घालून भरुन घ्यायचा. पुढचे काही दिवस घरातुन निघणारा ओला कचरा म्हणजे भाज्यांची देठं, फळांच्या साली, पालेभाज्यांच्या काड्या वगैरे यातच टाकत रहायचं. कंपोस्ट करताना जे जे आपण त्यात टाकतो, अगदी कल्चरसुद्धा या खड्ड्यात टाकत रहायचं.


खड्ड्याच्या भोवती जो उंचवटा केला आहे त्यामधे केळीची रोपं वा कंद जे काही आहे ते ठराविक अंतरावर लावायचं. याप्रमाणं खड्ड्याच्या भोवती केळीची लागवड कराय़ची. त्याला आवश्यक तेवढं पाणी ठराविक दिवसांच्या अंतरानं देत रहायचं. केळीला लागणारं कंपोस्ट मध्यभागी असलेल्या खड्ड्यात तयार होत राहील. तोपर्यंत केळीची झाडं सेट होऊन त्यांची मुळं मधल्या खड्ड्यात तयार होत असलेलं खत घेऊन त्यावर पोसत रहातील. खड्ड्यातलं खत तयार होत आल्यावर त्यात जागा होईल. ती जागा बागेतला पाचोळा, ओला-सुका कचरा टाकून भरत राहिल्यावर ही कंपोस्टिंगची प्रक्रिया सतत सुरुच राहील. अशा पद्धतीमधे केळीच्या झाडांना वेगळं खत देण्याची गरज भासत नाही. जर शेणखत, गांडूळखत अन नीमपेंड वगैरे काही द्यायचं असेल तर तेही या खड्ड्यातच टाकल्यावर खड्ड्याभोवतीच्या केळीच्या झाडांना ते मिळत राहील.


खड्ड्यात कंपोस्ट भरपूर उपलब्ध आहे, केळीच्या दोन झाडांमधे जागाही आहे म्हटल्यावर या जागेचा अन अधिकच्या खताचा फायदा करुन घेण्यासाठी म्हणून या जागेत इतर काही आपण लावू शकतो. फक्त जे काही लावणार आहोत ते केळीला त्रासदायक ठरु नये एवढी काळजी घ्यायला हवी. म्हणून ज्याला आपण आंतरपीक म्हणतो त्या प्रकारातील सहचर रोपांची म्हणजेच कंपॅनिअन प्लाण्ट्सची लागवड आपण यात करु शकतो.


केळीच्या दोन रोपांमधे आपण रताळी, हळद, आलं, अळू, गवतीचहा इत्यादी लावू शकतो. केळीला दिलेल्या पाण्यावर अन मधल्या खड्ड्यात असलेल्या कंपोस्टवर या साऱ्यांची चांगली वाढ होत रहाते. त्यामुळं जेव्हा आपण केळीचा घड काढून घेतल्यावर ते झाड काढण्यासाठी खोदू तेव्हा त्याच वेळी अपल्याला तयार रताळी, आलं वा हळद मिळू शकेल. नियमित मिळणाऱ्या पाण्यामुळं अन खाली सावली असल्यामुळं अळूची पानंही आपल्याला वर्षभर सतत मिळत राहील. रताळी लावल्यास तो वेल खाली पसरुन हिरवं मल्चिंगही त्याठिकाणी मिळेल अन उन्हाळ्यात पाण्याचं बाष्पीभावन होणंही टाळता येईल.


पर्माकल्चरमधे या प्रकाराला केळीचं वर्तुळ म्हणजेच बनाना सर्कल म्हणतात. यासाठी मोठी जागा घेतल्यास वर्षभर आपल्याला घरची केळी नियमितपणं मिळत रहातील. केळीचा एक कंद लावयावर काही वर्षांतच भरपूर कंद आपल्याला त्यापासून याठिकाणी लावण्यास मिळतील. शक्य असल्यास अन आवड असल्यास केळीचे विविध प्रकारही आपण यामधे लावू शकतो. कारण केळीच्या झाडांमधे काही भेदभाव नसतो. विभिन्न जातीची केळीची दोन झाडं एकमेकांसोबत नक्कीच रहातात. त्यात क्रॉस पोलिनेशन वगैरे काहीच नसल्यानं ते आपापली वाढत रहातात अन आपल्या नियत वेळी फुलून  आपल्या नैसर्गिक गुणांनुसार फळं देत रहातात.


कमी कष्टाच्या अन अत्यंत कमी देखभालीच्या या प्रकारामधे तेवढ्याच कमी कष्टांत जास्त फळं देणारं हे पीक ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या बागेत अथवा शेताच्या एखाद्या कोपऱ्यात अवश्य लावावं


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

द्रावण डवीकडून उजवीकडं का ढवळतात?

द्रावण डवीकडून उजवीकडं का ढवळतात?



तशी ही पोस्ट केवळ बागेशीच संबंधित आहे असं नाही. हे कुठलंही द्रवरुप मिश्रण ढवळत असताना आपण अनुभवतो. पण जेव्हा आपण बागेला देण्यासाठी द्रवरुप खतं बनवत असतो तेव्हा ते ढवळताना आपण काठी वा अन्य काही नेहमी क्लॉकवाईजच फिरवत असतो किंवा ते तसंच फिरवावं हे सांगितलं जात असतं. तर ते तसंच का फिरवायचं हे आपल्याला कळावं म्हणून ही पोस्ट या समूहावर.


वेस्ट डिकंपोजरचं द्रावण असो की जीवामृत, किंवा कुठलं कीटकनाशकाचं द्रावण असो की सकाळी कपभर दुधात टाकलेली चमचाभार साखर वा नेसकॉफी असो. ती आपण अगदी नकळतच डावीकडून उजवीकडं ढवळतो. हे सारं ढवळणं थांबवुन त्यातली काठी वा चमचा, जे काही असेल ते काढलं तरीही द्रावण बराच वेळ तसंच फिरत रहातं. पण आपण जर द्रावण ऍण्टीक्लॉकवाईज अथवा उजवीकडून डावीकडं फिरवलं तर ते फिरवायला तुलनेनं जास्त जोर लावावा लागतोच पण फिरवणं थांबवल्यावर द्रावण फिरणं थोड्याच वेळात थांबतं.


काय असेल यामागचं कारण?


यामागं आहे भौगोलिक कारण. पृथ्वी दोन गोलार्धात विभागली आहे अन मध्यभागी एक काल्पनिक रेषा जिला विषुववृत्त म्हणतात हे आपण सारेच शाळेत शिकलो आहोत. उत्तर गोलार्ध अन दक्षिण गोलार्ध हे ते दोन गोलार्ध. दोन्हीकडं निर्माण होणारे भवरे, वाऱ्या-वादळाच्या फिरण्याच्या दिशा या वेगवेगळ्या दिशेनं फिरत असतात. यामधल्या शास्त्रात अन कार्यकारणभावात आपण फारसं पडण्याची गरज नाही.


आपला भारत देश येतो उत्तर गोलार्धात. इथं निसर्गतः निर्माण होणारे भवरे, चक्रीवादळं, बेसिनमधे साठलेलं पाणी खालून वाहून जाण्याची पद्धत हे सारं घड्याळाच्या काट्यांप्रमाणं डावीकडून उजवीकडं फिरतं. त्यामुळं त्या दिशेनं जर आपण एखादं जाडसर द्रावण जर फिरवत असु तर त्यासाठी आपल्याला फारसे कष्ट पडत नाहीत. अन द्रावण फिरवायचं थांबल्यावरही ते काही वेळ त्याच दिशेनं फिरत रहातं. परंतु जर आपण तेच जाडसर द्रावण उलट दिशेनं म्हणजे ऍण्टीक्लॉकवाईज फिरवायला गेलो तर त्यासाठी आपल्याला तुलनेनं जास्त जोर लावावा लागेल. अन फिरवणं थांबवताच थोड्याच वेळात ते फिरायचंही थांबेल.


पण म्हणून उलट दिशेनं फिरवल्यास मिसळण्याची क्रिया होत नसेल काय? तर ती नक्कीच होते. पण निसर्गतः असलेले दिशा अन वेग यांची मदत घेतल्यास आपलं काम सोपं होतं. अन दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपण द्रावण क्लॉकवाईज फिरवत असताना जे विद्राव्य पदार्थ म्हणजे उदा. गुळ, डाळीचं पीठ वगैरे सुरुवातीच्या जडत्वामुळं खाली बसलेले असतात ते पाणी फिरताना खालच्या बाजुला जाताना निर्माण होणाऱ्या भवऱ्यामुळं वरच्या दिशेला येतात. वर येत असताना अन पुन्हा खाली जात असताना होणाऱ्या घर्षणामुळं त्यांची पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया लवकर अन वेगानं घडते अन पर्यायानं मिश्रण लवकर तयार होतं.


पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात याच्या बरोबर उलट घडत असतं तर विषुववृत्तावर पाणी सरळ खालच्या दिशेनं वाहून जातं. तिथं पाणी वाहून जात असताना भवरा निर्माण होत नाही.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

विचित्र आकाराची फळं आणि भाज्या

 विचित्र आकाराची फळं आणि भाज्या




आपण भाज्या अन फळांच्या बिया विकत घेतो, त्या आपल्या बागेत पेरतो अन यथावकाश त्या तयार झाल्या की झाडांवरुन तोडतो. मग त्या फळभाज्या असोत की फळं. तसंच मुळा, गाजर, बीट वगैरे कंदवर्गीय भाज्याही लावतो अन ठराविक कालावधीनंतर ते तयार झाले की मातीमधुन बाहेर काढतो. पण काही वेळा फळं अथवा टोमॅटो किंवा भोपळी मिरची बाजारात ज्या आकाराची असतात किंवा आणलेल्या बियांच्या पाकीटावर जशी दाखवलेली आसतात तशी आकारानं नसतात. एका बाजुनं दबलेली तरी असतात किंवा काकडी वगैरे अर्धगोल आकारात वळलेली असतात. गाजर अन मुळेही सरळ नसतात तर कधी दोन पाय असल्यासारखी दिसतात. बीटही गोलमटोल न रहाता लंबगोल आकाराची येतात.

आपल्या कष्टाला आलेलं असं विचित्र आकाराचं फळ (किंवा मूळ) पाहून आपलं मन खट्टू होतं. आपलं काय चुकलं म्हणून असं विकृत आकाराचं फळ आपल्या हाती आलं असा आपण विचार करु लागतो. पण थांबा. तुम्ही जगात असे एकटेच नाही ज्यांच्या बागेत असे दोन पायांचे मुळे अन गाजरं आली आहेत किंवा ज्यांच्या बागेमधल्या टोमॅटो किंवा भोपळी मिरचीवर खालच्या बाजूला डाग आहे. किंवा गाजरांचा रंग कधी फिका तर कधी चक्क पांढरट आला आहे. बटाटे लहान किंवा विचित्र आकाराचे येणं, डबल कांदे येणं, लसूण आकारानं लहान असणं वगैरे अगदी नैसर्गिक आहे.

व्यापारी तत्वावर अन आपल्यापेक्षा आकारानं कितीतरी पटीनं मोठी शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातही अशी विचित्र आकाराची फळं अन कंदवर्गीय भाज्या येत असतात. अगदी प्रत्येक हंगामात. फक्त तशी फळं वा भाज्या आपल्यासमोर येत नाहीत. विक्री करताना ते अन बाजारातले विक्रेते चांगल्या आकाराची अन रंगाची फळं अन भाज्या ग्राहकांना दिसतील अशा तऱ्हेनं मांडत असतात. अशी विचित्र आकारांची फळं अन भाज्या पल्प किंवा सॉस वगैरे बनवणाऱ्या कंपन्यांकडे जातात किंवा हॉटेल्स व ज्युस सेंटर्स कमी भावात घेतात. कारण पल्प वा हॉटेल अन ज्युस सेंटर्स जे पदार्थ आपल्याला विकत देतात तिथं आकार अन रंगाशी काहीही देणंघेणं नसतं. दोघांनाही, विकणाऱ्यांनाही अन विकत घेणाऱ्यांनाही. तर कधी अशी विचित्र आकाराची फळं वा भाज्या शेतातच टाकून दिली जातात. तिथं त्य़ांचं खत होतं. आता अशी फळं वा भाज्या कुणा गरजूंसाठी अन्न म्हणून नक्कीच उपयोगात येऊ शकतात. पण काढणीच्या वेळी अथवा पुढच्या एक दोन दिवसांत अशा गरजूंनी शेतात जागेवर जाणं गरजेचं असतं. मुद्दामहून फारसं कुणी अशी फळं आणून कुणाला देण्याच्या भानगडीत पडत नाही.

तर हे असं का होतं? अशी फळं अन भाज्या खाणं चुकीचं तर नाही ना? मुळीच नाही. जसं वर म्हटलं तसं असे चित्र-विचित्र आकार येणं अगदीच नैसर्गिक असतं. हा काही कुठला रोग नसतो की अशी फळं खाल्ल्यावर आपल्याला अपाय व्हावा. उलट अशी नैसर्गिक पद्धतीनं आलेली फळं ही जास्त उत्तम, चविष्ट अन सर्वगुणसंपन्न असतात. कारण मोठा आकार किंवा अधिक गडद रंग येण्यासाठी त्यावर कुठलंही रासायनिक खत किंवा औषध आपण फवारलेलं नसतं.

या अशा आकाराच्या भाज्यांना अन फळांना कधी निसर्ग जबाबदार असतो तर कधी परागीभवन व्यवस्थित झालेलं नसतं. कधी उन्हाचा तडाखा जास्त बसतो तर कधी पाणी कमी जास्त होतं. तर कधी आपलीही चूक असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ माती मोकळी नसल्यानं मुळा, गाजर, बीटसारख्या कंदवर्गीय भाज्यांना वाढण्यासाठी वावच मिळाला नसेल तर ते सरळ कसे वाढणार? ते जागा मिळेल तसे वाढणार. झालंच तर आकारानं लहान असलेल्या गाजराच्या बिया पेरताना एकाच जागी पाच सहा पडल्या अन नंतर रोपं उगवुन आल्यानंतर जर आपण त्यांची विरळणी केली नसेल तर एकाच ठिकाणी दाटी होऊन ती रोपं एकमेकांशी स्पर्धा करत जागा मिळेल तशी वाढणार.

इतकंच नाही तर आपण सेंद्रीय खतं दिल्यावर अन कुंडीत वाढीसाठी वाव मिळाला नाही तर केवळ मुळवर्गीय भाज्यांच्याच बाबतीत असं होतं असं नाही तर कोबी, फ्लॉवर वगैरेही आकारानं लहान येतात. पण चवीच्या बाबतीत मात्र कुठंही तडजोड नसते. उलट रासायनिक खतं नसल्यानं त्यांची नैसर्गिक चव आपल्याला अनुभवता येते. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यानं टोमॅटोंनाही तडा जातो. पण असे टोमॅटो किंवा तळाशी खराब झालेले टोमॅटो ज्याला ब्लॉसम एंड रॉट म्हणतात ते टोमॅटोही तेवढा खराब झालेला भाग कापून उरलेला भाग आपण नक्कीच खाऊ शकतो. त्यामुळं कुठलाही अपाय होत नाही. अर्धवर्तुळाकार काकड्या किंवा इतर वेलवर्गीय भाज्यांच्या विचित्र आकाराला जर कुठली कीड अथवा फळमाशी जबाबदार नसेल तर अशा भाज्याही आपण नक्कीच खाऊ शकतो.

शेवटी काही झालं तरी हे आपल्या कष्टाचं फळ आहे. मग ते आकारानं वेडंवाकडं का असेना. आपण ते खायलाच हवं. फक्त असं जेव्हा घडतं अन त्यात आपलीच जर काही चूक असेल तर पुढच्या वेळी ती टाळणं महत्वाचं. अन सर्वात महत्वाचं म्हणजे बाजारातल्याप्रमाणं घरच्या बागेतले टोमॅटो वा सिताफळं गोल अन टपोरीच असायला हवीत अशी अपेक्षा ठेऊ नका. कारण आपली बाग जर कुंड्यांतली असेल तर आपण देऊ त्या अन त्याच खतपाण्यावर ती झाडं पोसली जात असतात. तेव्हा त्यांच्या वाढींवर अन फुलण्या-फळण्यांवर मर्यादा या पडणारच. जर आपली बाग जमिनीवरची असेल अन आपण केवळ सेंद्रिय खतंच वापरणार असु अन त्यांच्या वेळाही जर आपण काटेकोरपणं पाळणार नसु तर मिळेल तो आकार गोड मानुन घ्यायलाच हवा. चव तर गोड असणारच आहे, अन तो गोडवाही नैसर्गिकच असणार आहे.

तेव्हा फार विचार करु नका. अशी फळं हाती आली म्हणून नाराजही होऊ नका. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वकष्टानं स्वतःच्या बागेत काही पिकवलेलं आहे. ते तुमच्या कष्टांचं फळ आहे. ते गोडच असणार हा विश्वास मनात बाळगा अन त्यांचा आस्वाद घ्या.


फोटो स्त्रोत : इंटरनेट


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...