
इथं आपल्याला घरच्या बागेविषयी सारी माहिती मराठीमधुन मिळेल. आपली बाग गच्ची वा बाल्कनीमधली असो की घराभोवती जमिनीवरची असो. आपापल्या घरी लावल्या जाणाऱ्या भाज्या, फुलझाडं अन फळझाडं याविषयीची सर्वंकष माहिती इथं देण्याचा प्रयत्न राहील. बागेविषयी सारी माहिती मराठीमधूनच देणारा हा वेगळा असा ब्लॉग आहे. आपण आपले प्रश्न वा शंका इथं वा vaanaspatya@gmail.com किंवा rajanonmail@gmail.com या इमेल आयडींपैकी कुठल्याही आयडीवर विचारु शकता.
गच्चीवरचा पोर्टेबल मांडव (DIY)
एप्सम सॉल्ट - बागेत वापरावं की वापरु नये?
सहचर रोपांची लागवड (Companion Planting)
सहचर रोपांची लागवड (Companion Planting)
निसर्गतः काही वनस्पती या एकमेकांचे जोडीदार असतात किंवा त्यांच्यात मैत्री असते. दोन्ही वनस्पती भलेही भिन्न प्रकारातील वा कुळातील असल्या तरीही त्यांच्यात घट्ट मैत्री असते अन एकत्र वा जवळजवळ लावल्यास त्या एकमेकांच्या साथीनं वाढतात. एवढंच नव्हे तर एकमेकांची काळजीही घेतात. एकीवर कीड वा रोग पडला तर दुसरी त्या कीडीचा वा रोगाचा नायनाट करते किंवा एकीनं उत्सर्जित केलेला टाकाऊ भाग दुसरी खताप्रमाणं सेवन करुन वाढते. दोन्ही वनस्पती एकमेकांच्या सहाय्यानं अन आधारानं एकोप्यानं वाढतात. कुणावरही कुरघोडी न करता, सकारात्मक स्पर्धा करत दोन्ही वनस्पती वाढतात अन फुलतात व फळतात. एकत्र वाढताना त्या एकमेकांना विरोध करण्याऐवजी एकमेकांना पूरक ठरतात.
अशा वनस्पती ओळखून त्या जर जवळजवळ वा एकाच जागी लावल्यास आपले बरेचसे कष्टही वाचतात अन खर्चही आटोक्यात रहातो. या प्रकारालाच सहचर रोपांची लागवड किंवा Companion Planting असं म्हणतात. याचे बरेचसे फायदे आहेत. आपल्या सीमीत स्वरुपातील बागेला, बाग गच्ची-बाल्कनीतील असुद्या किंवा परसातील असुद्या, निसर्गाच्या या गुणामुळं आपण जसं जागेची बचत करु शकतो किंवा कमी जागेत जास्त रोपं लावू शकतो तसंच कीडींवर अन तणांवरही नियंत्रण ठेवु शकतो. सहचर रोपांची लागवड करण्याचे काही फायदे पुढीलप्रमाणं आहेत;
कमी जागेत जास्त पीकं : गच्ची असो की बाल्कनी, बाग एकदा करायला घेतली की तिच्यासाठी थोड्याच दिवसांत जागा कमी पडू लागते. कुंड्या, त्यातही गोलाकार कुंड्या असल्या की हे हमखास होतंच. अशा वेळी या पद्धतीनं रोपांची लागवड केल्यास उपलब्ध जागेतही जास्त रोपं लावता येतात. पर्यायानं बागेत वैविध्यही जपता येतं अन जर आपण बागेत भाज्या लावत असु तर उत्पादनही जास्त मिळतं.
अनावश्यक तणांवर नियंत्रण : बाग म्हटली की तिथं अनावश्यक तण हे आलंच. तणांच्या बिया कधी वाऱ्यानं उडून येत असतात किंवा खतांद्वारेही येत असतात. अशा बियांना एकदा मोकळी जागा मिळाली की त्यांची वाढ भराभर होते. आपण लावलेल्या रोपांना आपण जे खत वा इतर अन्नद्रव्यं देत असतो ते खाऊन हे तणही जोमानं वाढत रहातं. परंतु जर एकाच कुंडीत दोन वेगवेगळ्या प्रकारची रोपं असतील तर तणांना वाढण्यासाठी जागाच उरत नाही. पर्यायानं कुंडीत तणच रहात नाही. किंवा असलंच तर ते अल्प प्रमाणात असतं.
कीडीचं नियंत्रण : बागेत कुठलीही रोपं लावली की त्यावर कीड ही येतच असते. निसर्गतःच हे होत असतं. अर्थात त्यामागं निसर्गाचीही काही कारणं आहेत. पण त्यामुळं आपल्या बागेचं मात्र अतोनात नुकसान होत असतं. परंतु या कीडींचंही एक शास्त्र असतं. कुठलीही कीड कुठल्याही रोपांवर नाही पडत. रोपांच्या अन फळा-फुलांच्या प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळी कीड असते. काही किडी असतीलही ज्या बहुतेक प्रकारच्या झाडांना त्रास देतात. पण तशा किडींचा वेगळा उपाय करता येतो. पण कुंडीत जेव्हा दोन वेगळ्या प्रकारची झाडं लावली जातात तेव्हा कीडीला जर एक प्रकारचं झाड आवडत असेल किंवा आकर्षित करुन घेत असेल तर तिथंच असणारं दुसरं झाड हे किडीच्या दृष्टीनं त्रासदायक असेल. सहाजिकच कीड अशा ठिकाणी येण्याचं टाळते.
परागीभावन : परागीभवन करणारे जे माशा वा फुलपाखरं वगैरे मित्र आहेत ते कुंडीतील विविध प्रकारच्या फुलांकडं आकर्षित होऊन रोपांवर येऊन त्यातील मध प्राशन करण्यासाठी येतात अन त्यामुळं आपोआप परागीभवन होऊन रोपांवर फळं जास्त धरली जातात. याचा फायदा आपल्यालाच होत असतो. रोपांवर येणाऱ्या सर्व मादी फुलांचं रुपांतर जर फळांमधे होत असेल तर सहाजिकच आपल्याला जास्त भाज्या वा फळं मिळतील.
उन्हापासून संरक्षण : काही नाजूक प्रकृतीची रोपं असतात ज्यांना फार तीव्र वा थेट उन्ह सहन होत नाही. अशी रोपं जर मोठी वाढ होणाऱ्या रोपांजवळ लावली तर त्यांना आवश्यक तेवढंच उन्ह मिळून त्यांची वाढही व्यवस्थित होते. त्यांना दुपारच्या तीव्र अन थेट डोक्यावर पडणाऱ्या उन्हाचा सामना करावा लागत नाही. सकाळचं कोवळं किंवा संध्याकाळाचं सरतं उन्ह मिळून त्यावर त्यांची वाढ चांगली होते.
वनस्पतींमधे प्रत्येक वनस्पतीची बी रुजण्यापासून ते फळं देऊन जीवन संपेपर्यंत जी जी अवस्था अन अन्नद्रव्यांची गरज असते ती सर्वस्वी वेगवेगळी अन अद्वितीय असते. दोन विभिन्न प्रकारच्या वनस्पतींची अन्नाची व खतपाण्याची गरज ही वेगवेगळी असते. परंतु त्यातही दोन वेगळ्या प्रजातींच्या वनस्पती एकमेकांना पूरक ठरत अन एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत वाढवल्यास खतपाण्याचीही बचत होते अन कमी जागेतही जास्त उत्पादन घेता येतं.
बागेत सहचर रोपांची लागवड करण्यासाठी पुष्कळ प्रकारच्या मित्र वनस्पती आहेत. अर्थात या वनस्पतींची निवड करताना, आपलं ठिकाण, तिथला पाऊस, हवामान, रोपांसाठीचा योग्य तो हंगाम, मातीचा पोत वगैरेंचा विचार करुनच निवड करावी. व्यवस्थित नियोजन करुन या प्रकारे रोपांची लागवड केल्यास आपल्याला मर्यादित जागेतही भरपूर उत्पादन घेता येईल.
सोबत दिलेल्या यादीत मित्र वनस्पतींची नांवं जशी दिली आहेत तसंच कुठली रोपं कुणाबरोबर लावू नयेत हेही लिहिलं आहे. ही यादी सर्वसमावेशक नक्कीच नाही. आपण साधारणतः ज्या ज्या प्रकारची रोपं वा भाज्या आपल्या बागेत लावत असतो तीच नांवं दिली आहेत. या यादीशिवायही वनस्पतींचे पुष्कळ प्रकार आहेत जे एकमेकांसोबत वाढतात. परंतु आपल्या मर्यादित बागेचा विचार करत असताना या सर्वच वनस्पतींचा विचार करण्याची आपल्याला आवश्यकता नाही.
©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya
बियाणांमधे पुसा आणि अर्का यांचा अर्थ काय?
अती पावसात बागेची काळजी कशी घ्याल
जुलै महिना तसा सगळीकडंच अतीपावसाचा. जुन महिन्यात जास्त पाऊस पडला तरी उन्हाळ्यात सगळीकडं कोरडं ठक्क झालेलं असतं. त्यामुळं जुनमधला पाऊस मातीमधे आतपर्यंत जाऊन सगळं भिजवतो. सगळीकडं हिरवंगार अन ताजं टवटवीत दिसू लागतं. पण जुलै महिन्यात हे सगळं चित्र पालटू लागतं. पाऊस रौद्र रूप धारण करु लागतो. काही ठिकाणी छतही गळू लागलेलं असतं. रस्त्यांमधे, रेल्वे रुळांवर सगळीकडं पाणी साचु लागतं. इतर गोष्टी जास्त महत्वाच्या असल्यामुळं सहाजिकच बागेकडं थोडंफार दुर्लक्षच होतं.
जुलै संपता संपता वाराही जोर धरु लागतो. त्यामुळं जमिनीवरची आसुपालव वगैरेंसारखी झाडं जमिनीला डोकं टेकवु पहातात, मुळं फारशी खोलवर न जाणारी पण सहा-सात फुटांपेक्षाही उंच झालेली पपई, केळीसारखी झाडं कलु लागतात. त्यात त्यांच्यावर फळं असतील तर हे हमखास होतंच. गच्चीवरच्या बागेतही बऱ्यापैकी पडझड व्हायला सुरुवात झालेली असते. पावसाला सुरुवात होण्यापुर्वी कितीही काळजी घेतलेली असली तरी थोडंफार नुकसान हे होतच असतं. जमिनीवरच्या जुन्या झाडांच्या काही वाळलेल्या फांद्या खाली पडतात तर काही फांद्या हा हा म्हणता एवढ्या वाढतात की त्या लगेच छाटणंही गरजेचं होऊन जातं. अशातच कारंदं किंवा कुठल्याही मॉर्निंग ग्लोरी कुटुंबातील वेल भराभर वाढून मुख्य झाडाचा श्वास गुदमरुन जाईल अशा प्रकारे त्यांना वेढे घालुन बसलेले असतात. उन्हाळ्यात छाटलेल्या झाडांना पालवी फुटून तिची दाटीही प्रमाणाबाहेर झालेली असते. बरं, घरातुन पहाताना हे सगळं डोळ्यांना दिसत असुनही चिखलात जाण्याची इच्छाही होत नसते.
पण थोडी उघडीप मिळताच हे सगळं सावरणं गरजेचं असतं. नाहीतर पावसाळ्यानंतर बागेची दुरवस्था झालेली असते. ती सावरण्यात पाठ-कंबर एक होते. अन तो पसारा अन कचरा काढल्यावर काय दिसतं तर बरीचशी झाडं अन वेली रोगाला बळी पडली आहेत. भाज्यांच्या वेली अन रोपांवर काही भाज्या लागल्या होत्या पण त्या एक तर पावसानं सडून गेल्या आहेत किंवा निबर झाल्या आहेत. काही विकृत आकारात वाढल्या आहेत तर काही गळून पडल्या आहेत. तेव्हा हा पसारा आवरण्यात बराच वेळ जातो. अशातच बागकामाच्या मूडला किंवा इंटरेस्टलाच सुरुंग लागू शकतो. ते तर फारच भयानक.
पाऊस जेव्हा आक्रमक असतो अन त्यामुळं आपण बागेत पाऊलही ठेऊ शकत नाही तेव्हा काय काय घडतं पहा;
विविध रोग : सगळी बाग ओलीगच्च झालेली असते. उन्ह जवळपास नसतंच अन असलं तरी त्यात फारशी उष्णता नसते. त्यामुळं बागेतील झाडांवर विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग हल्ला करतात. थोडी उघडीप मिळाल्यावर मावाही हल्ला करतो. बुरशी लागलेल्या फांद्या अन पानं तोडली तर रोपावरील तेवढा भाग तसाच नवीन रोगासाठी उघडा पडतो. अधुनमधुन पडणाऱ्या पावसामुळं त्या उघड्या भागावर काही लावताही येत नाही की कसलं औषधही फवारता येत नाही. फवारलेली औषधं पाऊस पडल्यावर वाहुन जातात. उन्हाळ्यात केलेल्या मल्चिंगमुळं बुरशीला रहाण्यासाठी तयार घर मिळतं.
कीटक अन किड : ओलसरपणा आवडणारे प्राणी म्हणजे शंख अन गोगलगायी. तसंच इतरही असंख्य प्रकारच्या अळ्या. हे सगळे आपल्या झाडांवर हल्ला करतात. कोवळी पानं खाऊन फस्त करतात. यापैकी पुढं जाऊन फुलपाखरं होणाऱ्या अळ्या सोडल्यास इतर सारेच त्रासदायक असतात. त्यांची संख्या नियंत्रणात असेल तर ठीक, पण संख्या जास्त असेल तर मात्र बागेचं काही खरं नाही.
परागीभवनात अडथळे : नैसर्गिकरित्या परागीभवन करणारे कितीतरी सैनिक पावसामुळं आपलं काम करु शकत नाहीत. त्यामुळं कित्येक मादीफुलं परागीभवनाअभावी तशीच गळुन पडतात. त्यामुळं फळं अन फळभाज्यांच्या उत्पन्नातही घट होते.
फळं तडकणे : टोमॅटो, लिंबू वगैरे काही फळं आहेत ज्यांना पाणी जास्त झाल्यास ती तडकतात. झाडानं जास्त पाणी प्याय़लं की अशा फळांची त्वचा फाटते. अशी फाटलेली जागा बुरशीजन्य रोगांनाही आमंत्रण देते. म्हणून पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं, अन वरुन संततधार लागली तर त्यापासुनही बचाव करण्याची गरज असते.
अनावश्यक गवत : बागेत वावर कमी असेल तर तसंच रोपां-झाडांमधली माती नियमितपणं खुरपणं थांबल्यावर तण अन गवत वाढत जातं. तणांची वाढही इतकी प्रचंड वेगानं होत असते की दोन दिवसांपूर्वी दोन इंचांचं एखाद्या मिलीमिटरएवढी जाड दांडी असलेलं रोपटंही आठ दहा इंचांचं होऊन त्यावर कळ्या आलेल्या असतात. तण वेळेत काढले नाहीत तर नंतर कामही वाढतं, अन तेव्हा ते अधिक कष्टाचंही होतं. अन तोपर्यंत किडींनाही नवीन आश्रय मिळतो.
यासाठी, पावसाची उघडीप मिळताच पायात रबरी बूट, हातात मोजे. डासांपासून बचाव म्हणून अंगभर कपडे घालायचे अन बागेत उतरायचं. जवळ धारदार कात्री वा सिकेटर, खुरपं घ्यायचं. पालापाचोळा, गवत अन छाटलेल्या फांद्या ठेवण्यासाठी एखादा टब किंवा टोपलीही घ्यायची अन लागायचं कामाला.
सर्वात आधी आपण लावलेल्या झाडांना मोकळा श्वास घेता येईल याची व्यवस्था करा. आळ्यातलं वा कुंडीमधलं गवत काढून याचे तुकडे करुन ते तिथंच गाडा. रोपांवर वेल चढले असतील तर तेही सावकाश हलक्या हातानं सोडवुन घेऊन त्याचेही तुकडे करुन जागीच गाडा. हे करत असताना मुख्य झाडाआ धक्का लागणार नाही. त्यावर काही फुलं अथवा फळं असतील तर ती तुटणार नाहीत याची काळजी घ्या. आळी मोकळी झाल्यावर आळ्यांमधे पाणी साचून रहातंय का ते पहा. साचत असेल तर आळं तोडून पाणी वाहून जाईल याची व्यवस्था करा. आळ्यांमधली पानं व इतर काडीकचरा अन नंतर गवत घातलं असेल तर ते मातीमधे व्यवस्थित मिसळून घ्या. थोडी नीमपेंड पसरुन घाला. कोरडं कंपोस्ट अथवा चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर ते वरुन पसरुन द्या. यामुळं अधिकचा ओलावाही शोषला जाईल अन पावसाळ्याच्या सुरुवातीला दिलेल्या खतांमधली अन्नंद्रव्यं जर वाहून गेली असतील तर तीही पुन्हा झाडांना मिळतील. हे खासकरुन कुंड्यांसाठी अवश्य करावं.
कुंड्यांमधे झाडं असतील तर त्यांच्याभोवती पाणी साठून रहाणार नाही याची काळजी घ्या. कुंड्या विटांवर वा तत्सम काही वस्तूंवर ठेऊन खालून पाणी आत शोषलं जाणार नाही याची काळजी घ्या. त्यांची पाणी वाहून जाण्यासाठी केलेली छिद्रं मोकळी करुन घ्या. छतावरुन पडणारं पाणी जर जवळपासच्या झाडांजवळ किंवा वाफे केले असतील तर तिथं जमा होत असेल तर त्याला योग्य ती दिशा देऊन झाडांपाशी मुरणार नाही हे बघा. वाफे पावसाच्या जोरानं खाली बसले असतील तर त्यांच्या कडा उंचावुन घ्या. जेणेकरुन बाहेरचं पाणी आत घुसणार नाही. अर्थात मधे खोलगटपणा करु नका. नाहीतर त्यावर पडलेलं पाणी तिथंच साठेल. शक्य तेवढं करुनही काही झाडं पावसाच्या माऱ्याला तोंड देणार नाहीत असं वाटत असेल तर त्याच्या फांद्या काढून काही रोपं तयार करायला ठेवा. म्हणजे तुमच्याकडं पर्यायी व्यवस्था उपलब्ध असेल.
वर्षभर बागेत प्रचंड कामं असतात. फक्त प्रत्येक ऋतुप्रमाणं ती बदलत असतात. पावसाळ्यात तसा बऱ्यापैकी आराम असला तरी बागेचा पावसापासून बचाव करणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं. अन ते ठराविक दिवसांनी करावंच लागतं. तेव्हा चिखलात हातच नव्हे तर पायही घालण्याची तयारी ठेवा. पण हो, स्वतःला सांभाळूनच. उगीच पाय घसरुन पडाल. आकाश रात्री बघायला छान वाटतं. पण दिवसा बागेत पाठीवर पडून ते तितकंसं छान नाही वाटत.
©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya
झाडांची खतांची भूक
झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...
-
गुलाब - लागवड अन व्यवस्थापन जिथं जिथं बाग आहे तिथं गुलाबाचं किमान एक तरी रोप असतंच असतं. मग ते गावठी गुलाबाचं असो की कलमी. गुलाबी असो की पा...
-
कुंड्यांसाठी_खताचं_योग्य_प्रमाण प्रत्येक बागकर्मीला काही ठराविक प्रश्न असतात. त्या प्रश्नांतला एक सामायिक प्रश्न असतो अन तो म्हणजे कुंडीतील ...