आलं लागवड

आलं लागवड



आलं हे उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असलेलं कंदवर्गातील एक पीक. याच्या नियमित सेवनानं बरेचसे आजार दूर रहातात. चहात घालून अथवा याचा रस मध व लिंबाच्या रसात घालून पिण्यानं त्वचा नितळ तर होतेच पण वजनही आटोक्यात रहातं. असं हे बहुगुणी आलं आपण आपल्या घरच्या बागेत कुंडीतही घेऊ शकतो. अगदी बाल्कनीमधल्या छोट्याशा बागेतही.

आलं जर व्यावसायिक तत्वावर लावायचं झाल्यास एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात लावावं, अगदीच उशीर झाला तर दुसऱ्या पंधरवड्यात हरकत नाही. पण त्यापेक्षा उशीर करु नये. पण आपण इथं सारे शहरातले कुंडीकरी. तर आपण जर एक-दोन कुंड्यांतच लावणार असू तर ते वर्षभरात केव्हाही लावता येतं.

सर्वात आधी म्हणजे कुंडीची निवड. तर आलं हे जमिनीखाली साधारण सहा ते आठ इंचांवरच तयार होत असल्यामुळे फुटभर खोलीची कुंडी पुरेशी होते. आल्याचा पसारा आडवा जास्त पसरत असल्यामुळे कुंडी मोठ्या व्यासाची किंवा शक्यतो आयताकार घ्यावी. आंब्याची लाकडी पेटी घेतली तर उत्तमच. आल्याला अशा पेटीमधे वाढण्यासही भरपूर जागा मिळेल अन खेळत्या हवेमुळे त्याची वाढही चांगली होईल. मातीतच आलं जास्त वाढून पसरत असल्यामुळे सहाजिकच माती मोकळी असायला हवी. त्यामुळे मातीमधे पालापाचोळा, शेणखत/कंपोस्ट जास्त प्रमाणात घ्यावं. खाली विटांचे तुकडे, वर पाचोळा, त्यावर कंपोस्ट/शेणखत, त्यावर नीमपेंडचा पातळसा थर, वरुन थोडी माती व पुन्हा हे सगळं रिपीट करुन कुंडी तया करुन घ्यावी. जवळपास कडुनिंबाचं झाड असल्यास त्याचा पाचोळा सहज उपलब्ध होतो. असा पाला, हिरवा वा वाळलेला भरपूर प्रमाणात वापरल्यास खतही होईल अन कीडही लागणार नाही.

आपण नेहमी बाजारातुन जे आलं आणतो त्यापैकीच डोळे असलेले आल्याचे काही तुकडे आपल्याला लागवडीसाठी वापरायचे असतात. त्यामुळं बियाणं आणण्यासाठी आपल्याला वेगळं काहीच करावं लागत नाही. डोळे म्हणजे आल्याच्या पृष्ठभागावर जिथं रेषा असतील अन काहीसा भाग फुगीर असेल तो भाग. शेजारच्या फोटोमधे सर्कल करुन दाखवल्याप्रमाणे आल्याचा तेवढा कोंब असलेला भाग काढून घेऊन तो कुंडीत कुंडीच्या आकाराप्रमाणे पण कडेला दोन-तीन इंच भाग सोडून मातीमधे दोन अडीच इंच खोलवर पेरावा. पेरल्यावर माती ओलसर होईल इतपतच पाणी द्यावं. आपण आल्याचा कोंब असलेला भागच तोडून लावत असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या भागात आलं उघडं पडलेलं असतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जास्त पाण्यामुळं आलं सडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून माती ओलसर होण्यापुरतंच पाणी द्यावं. नंतरचं पाणीही अशाच पद्धतीनं द्यावं.

आल्याला फार उन लागत नाही. त्यामुळं दिवसभरात दोन अडीच तास उन मिळालं तरी पुष्कळ होतं. कुंडी शक्यतो सकाळपासून ते दुपारचे साडेअकरा-बारा पर्यंत उन मिळेल अशा ठिकाणीच ठेवल्यास उत्तम. आलं तयार होण्यासाठी साधारणपणे सहा ते सात महिने लागतात. अर्थात सुंठ वगैरे तयार करण्यासाठी जर आलं लावायचं असेल तर ते आठ दहा महिन्यांनी काढलं तरी चालतं. पण घरच्या वापरासाठी सहा सात महिन्यांनी काढावं. अन्यथा त्यात जास्त तंतु तयार होऊन रस कमी मिळतो.

पानं पिवळी पडायला सुरुवात झाली की आलं तयार होत आलं आहे असं समजावं. क्वचित कधी आल्याच्या काही प्रकारांमधे फुलही येतं. कळी स्वरुपात असलेलं फुल एखाद्या कणसासारखं दिसतं.घरीच वापरणार असाल तर दोन तीन दिवस पुरेल इतकंच आलं कुंडीतून काढून घ्यावं व उरलेलं मातीत तसंच राहू द्यावं. म्हणजे नवीन फुटवे येऊ लागतील. एप्रिलमधे आलं लावल्यावर सुरुवातीला ३-४ दिवसांतनं पाणी द्यावं. नंतर पावसाचं पाणी आल्याला पुरे होतं. एरवी माती कोरडी वाटली तरच पाणी द्यावं. दर पंधरा दिवसांनी कंपोस्ट व शेणखत आळीपाळीनं द्यावं व अधुन-मधुन नीमपेंड दिली तर इतर कुठल्याही खताची गरज पडत नाही. नीमपेंड असल्यामुळे रोगही पडत नाही.

पावसाळ्यांत सगळीकडेच असलेला त्रास म्हणजे पानं खाणाऱ्या अळ्या. पण त्यांच्यामुळे आल्याला कसल्याही प्रकारची इजा होत नाही. फक्त हुमणी वगैरे नाही ना हे अधून मधून बघत रहावं. अन्यथा एकदा लावून सहा महिने ढुंकुनही बघण्याची गरज नसलेलं हे पीक.

पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या काळात पृष्ठभागावरची जागा मोकळीच असते. त्यामुळे या काळात ज्याला शेतकरी आंतरपीक म्हणतात ते घेण्यास हरकत नाही. म्हणजे पालेभाज्या किंवा टोमॅटो, वांगी वगैरे. म्हणजे एकाच खतात अन पाण्यात दोन पीकं घेऊन जागा, खत, पाणी अन कष्ट या सगळ्यांची बचत होऊ शकते. त्यामुळं जागेची, खताची अन पाण्याचीही बचत होते. म्हणून घरात नेहमी लागणारं, कमी कष्टातलं आलं प्रत्येक बागकर्मीनं लावायलाच हवं.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...