गच्चीवरील_भाजीपाला
लेखांक १२
शंकासमाधान आणि समारोप
मंडळी, या लेखमालेतील हा समारोपाचा लेख. आशा आहे की या लेखमालेतील सर्व लेख आपणां सर्वांस उपयुक्त वाटले असावेत. ही लेखमाला लिहिण्यामागचा उद्देश एकच होता अन तो म्हणजे वर्षभर विविध सीझनमधे बाजारात ज्या ज्या भाज्या उपलब्ध असतात व सामान्यतः ज्या भाज्या खाल्ल्या जातात त्या आपल्याला आपल्या घरच्याच बागेत उगवता याव्यात अन त्याही घरीच केलेल्या सेंद्रीय खतात. याद्वारे पिकांचं भरघोस उत्पन्न अन केवळ नजरेलाच दिसणारं आकर्षक रुप यासाठी दिलेली रासायनिक खतं टाळून संपूर्णपणे सेंद्रीय खतांवरचंच अन तेही स्वतःच पिकवलेलं अन्न आपल्या पोटांत जावं, त्या त्या भाज्यांच्या नैसर्गिक गुणांसोबत अन चवींसोबत. ज्यांनी ज्यांनी ही लेखमाला वाचली त्यांच्यापैकी अगदी दहा टक्के लोकांनी जरी स्वतः भाजीपाल्याचं उत्पादन आपापल्या घरीच घेणं सुरु केलं तरीही ते खूपच मोठं यश आहे असं मी समजेन. काही भाज्या ज्या खूपच कॉमन आहेत व त्या थोड्याशाही प्रयत्नांमधे आपण उगवु शकतो त्या भाज्यांचा समावेश या लेखमालेत करण्याचं टाळलं आहे. तोचतोचपणा येऊ नये व मालिका कंटाळवाणी होऊ नये यासाठीच. या लेखांमधे काही प्रश्न विचारले गेले होते त्यांचं त्या त्या वेळी निरसन केलं होतं. पण काही प्रश्नांची उत्तरं देऊनही मी ती इथं वेगळं देतो कारण ते कदाचित अधिक वाचलं जाईल. एक म्हणजे मल्चिंग आणि दुसरं म्हणजे प्रत्येक लेखाशेवटी असलेली सूचना की या मातीत पुन्हा ती भाजी लावू नये.
मल्चिंग म्हणजे जमिनीवर वा कुंडीतल्या मातीवर रोपाभोवती घातलेलं जैविक आच्छादन अथवा पांघरुण. आपण झाडांना जेव्हा पाणी देतो तेव्हा जे पाणी मातीमधे उरतं त्यातल्या बहुतांश भागाचं हवेतील उष्म्यामुळे बाष्पीभवन होतं. ते होऊ नये व मातीमधे असलेलं पाणी रोपांनाच उपलब्ध व्हावं म्हणून केलेली योजना आहे ती. यासाठी आपण असं काही वापरायचं असतं की ज्याचं काही दिवसांतच खत होईल. म्हणजे सुका पाचोळा, झाडांच्याच काड्या, बारीक तुकडे केलेल्या फांद्या, वाळलेलं वा ओलं हिरवं गवत, वा या साऱ्याचं मिश्रण. अशा मल्चिंगचं पॉटिंग मिक्समधे असलेल्या कंपोस्टच्या सहाय्यानं कंपोस्ट होतं व ते काही दिवसांतच मातीशी एकरुप होऊन जातं.
मातीचा पुनर्वापर आपण मातीमधे काही भाज्या लावून त्यांची सायकल अथवा जीवनचक्र पूर्ण करतो. यादरम्यान कितीही काळजी घेतली तरी काही कीड ही जशी झाडांवर जन्म घेते तशीच ती मातीतही जन्म घेते. म्हणजे तिची अंडी मातीत असतात. काही किडी जेव्हा झाडं मृतावस्थेत जातात तेव्हा मातीमधे असलेल्या ओलाव्याचा आधार घेऊन तिथ लपून बसतात. तसंच काही किडी या त्याच भाज्यांवर येत असतात. त्यामुळे एकदा भाजीचं पूर्ण चक्र पूर्ण झाल्यावर पुन्हा तीच भाजी त्याच मातीत घेतली तर किडींची वसाहतही कायमस्वरुपी तिथं नांदू लागते. यासाठी मातीला थोडा विराम देऊन, हवा अन उन्ह देऊन त्यातील किडीचा नाश करावा. एवढंच नाही तर विरोधी पीक घेऊन त्यातील किड वा अंडी जागीच नष्ट होईल असं पहावं. यासाठीच पुन्हा तेच पीक अथवा भाजी न घेता त्या मातीत दुसरी कुठली तरी भाजी लावावी.
ही लेखमाला सुरु करण्याआधीच्या प्रास्तविकात मी या लेखांसाठी असलेला टार्गेट वाचक हा नवखा, नव्यानं बागकाम सुरु करणारा वा करण्याच्या विचारात असलेला आहे हे स्पष्टपणं नमूद केलं होतं. त्यामुळेच मी अशा व्यक्तींकडून आलेल्या प्रश्नांना यथायोग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. काहींच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं नजरचुकीनं राहुनही गेलं असेल. त्यांनाही जमल्यास मी उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ज्यांना अधिक काही माहिती हवी असेल त्यांनी तसंच ज्यांना काही शंका असतील त्यांनी vaanaspatya@gmail.com किंवा rajanonmail@gmail.com या इमेल आयडींपैकी कुठल्याही आयडीवर संपर्क साधावा. मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
©राजन लोहगांवकर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा