भाज्यांचा_फेरपालट

भाज्यांचा_फेरपालट


जेव्हा आपण आपल्या बागेत ठराविक कालावधीची झाडं लावत असतो, मग आपली बाग गच्ची-बाल्कनीमधली असो किंवा परसदारातली जमिनीवरची असो. तसंच ठराविक कालावधीची झाडं म्हणजे फुलझाडं असोत किंवा फळझाडं असोत की वांगी, टोमॅटोसारख्या भाज्या असोत वा मका असो अथवा वेलभाज्या असोत. त्यांच्या त्यांच्या जीवनचक्राप्रमाणं जेव्हा या वनस्पती मृत पावतात तेव्हा आपण त्या लावलेल्या ठिकाणाहून काढून टाकत असतो. अशा काढलेल्या वनस्पती कधी आपण कंपोस्टमधे वापरतो तर कधी तुकडे करुन मल्चिंगसाठी म्हणूनही वापरतो. पण जेव्हा त्याच प्रकारची नवीन झाडं लावायची झाल्यास ती पुन्हा त्याच जागेत किंवा कुंडीत न लावता वेगळ्या ठिकाणी लावावीत. या लेखाच्या पुढील भागात आपण याची कारणं पाहूया.

रोपं आपल्या वाढीच्या काळात मातीमधून बरीचशी अन्नद्रव्यं अन पोषकतत्वं सतत घेत असतात. आपण जरी नियमितपणं खतं देऊन त्याची भर करत असलो तरीही रोपांचं ठराविक अन्नद्रव्यं घेण्याचं प्रमाण अन आपलं ते देण्याचं प्रमाण यात तफावत ही होतच असते. तसंच त्यांचं नैसर्गिक गुणोत्तर अन प्रमाणही बदलत असतं. ते पुन्हा पूर्ववत करण्याचं काम निसर्गच करत असतो. त्यासाठी निसर्ग पाऊस, वारा, सूर्यप्रकाश यांची मदत घेत असतो. हे बिघडलेलं प्रमाण आपणही ठीक करु शकतो. पण त्यासाठी जसा अभ्यास अन अनुभव हवा तसंच वेळोवेळी माती परीक्षण वगैरे गोष्टीही करायला हव्या असतात. आपल्या छोट्या बागेसाठी त्या करणं अशक्य अन खर्चिक असतं. त्यामुळं हे काम आपण निसर्गावर सोपवुन द्यावं.

परंतु आपल्या हातात एक मात्र नक्कीच असतं अन ते म्हणजे एका जागेतुन एक पीक काढून झाल्यावर तिथं दुसरं असं पीक घेणं की जे आधीच्या पीकानं मातीतुन वा इतर माध्यमातुन जे काही घेतलं आहे ते नवीन पीक मातीला पुन्हा परत  देऊ शकेल. उदाहरणार्थ, मका हा मातीतुन मोठ्या प्रमाणात नत्र (नायट्रोजन) घेत असतो. मुबलक प्रमाणात नत्र पुरवल्यावर मक्याचं पीक उत्तम येत असतं. परंतु एकदा मक्याची ताटं काढून टाकल्यावर जर पुन्हा त्या जागी मकाच लावल्यास त्याला नत्र कमी प्रमाणात मिळेल अन परिणामी दुसऱ्यांदा लावलेल्या मक्यापासून आपल्याला मिळणारी कणसं कमी दर्जाची अन संख्येनंही कमी मिळतील.

याप्रमाणंच इतरही पिकं कमीअधिक प्रमाणात मातीतुन नायट्रोजन, पोटॅशियम अन फॉस्फरस यासोबतच इतरही अन्नघटक व इतर घटक जसं कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरे घेत असतात. त्यांची पूर्तता वा पुनर्भरण खतांद्वारे करतानाच पीकं बदलली तर माती अधिक सुपीक होते अन हे काम जलदही होतं. उदा. मका घेतल्यानंतर तर त्याच ठिकाणी चवळी, भुईमूग (शेंगदाणा), बटाटा वा इतर द्विदल धान्य घेतल्यास त्यांच्या मुळांवरील गाठींद्वारे हवेतील नत्र शोषून घेऊन ते पुन्हा मातीत जमा करता येतं.

पिकांच्या वाढीच्या काळात त्यांच्यावर पडणारे रोग अन ते पसरवणारे वा अशा रोगांना जबाबदार असणारे कीड वा जंतु व त्यांची अंडी हे मातीतच त्या रोपाभोवतीच वास्तव्य करत असतात. एकाच जागी पुन्हा तेच पीक घेतल्यास त्या किडीला फारसे कष्ट न घेता त्यांचं अन्न जागीच उपलब्ध होतं. पण त्याऐवजी आपण दुसरं पीक घेतल्यास मातीतून ही कीड आपोआप नष्ट होते. जर आपण पुन्हा तेच पीक पण दुसऱ्या जागी घेतलं तर ही कीड नवीन जागी स्थलांतरित होण्यास अनंत अडचणी येत असतात अन त्यामुळं त्या नवीन ठिकाणी जात नाहीत. त्यामुळं पीकांच्या फेरबदलामुळं किडीचाही प्रश्न सोडवण्यास मदत होते.

याचा अजुन एक फायदा म्हणजे पिकांच्या बदलत्या जागांमुळं ठराविक काळांनंतर आपली बागही रुप बदलत असते अन त्यामुळं आपण वेगवेगळ्या प्रयोगांनी बागेतील सौंदर्यात भरही घालू शकतो.


© राजन लोहगांवकर

वानस्पत्य

४ टिप्पण्या:

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...