पावसाळ्यापूर्वीची कामं - जमिनीवरील बाग असणाऱ्यांसाठी

पावसाळ्यापूर्वीची कामं - जमिनीवरील बाग असणाऱ्यांसाठी


मंडळी थोड्याच दिवसांत पावसाला सुरुवात होईल. पाऊस एकदा सुरु झाला की सुरुवातीचे काही दिवस आपल्याला फार काही करता येणार नाही. अन पाऊस जेव्हा उसंत घेईल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. म्हणून अजून हातात वेळ आहे तोवर पावसाळ्यापूर्वीची काही कामं आपण केली तर पावसाळ्यात आपल्याला भाज्या व इतर फुलझाडं वगैरेंनी आपली बाग आपल्याला सुशोभित करता येईल. तेव्हा त्यासाठी काही सुचना व सल्ले. बागकाम करणाऱ्या तीनही प्रकारांसाठी. म्हणजे कुंडीमधली बाग, गच्चीवरची बाग अन जमिनीवरची मातीमधली बाग करणाऱ्या सर्वांसाठीच.


१. झाडाच्या आकारमानाप्रमाणे आपण आळं करुन घेतलं असेल. त्यातली माती कुदळीच्या सहाय्यानं मोकळी करुन घ्या. उन्हाळ्यात जर पाला पाचोळ्याचं मल्चिंग केलं असेल तर तो बाहेर काढून घ्या. मल्चिंग नसेल तर माती कडक झाली असेल. ती मोकळी करुन घ्या. खोडाला वा मुळांना धक्का लागणार नाही अशा बेतानं हे करा.

२. वरच्या थरातील चार पाच इंच माती काढून घ्या. आतला भाग कडक असेल तर तोही हलक्या हाताने, मुळांना धक्का पोहोचणार नाही अशा बेताने मोकळा करुन घ्या.

३. आता मोकळ्या झालेल्या भागात कंपोस्ट / शेणखत / गांडूळखत वगैरे जे काही उपलब्ध असेल किंवा जे काही नेहमी वापरत असाल ते घालून घ्या. या खताचं प्रमाण साधारणपणे झाडाचं जेवढं वय तेवढी घमेली खत असं असावं. छोट्या व मध्यम आकाराच्या झाडांना एक घमेलं शेणखत वा कंपोस्ट खत पुरतं.

४. खत घातल्यावर आधी काढलेला पालापाचोळा वरुन टाकून घ्या. त्यावर मातीचा एक थर देऊन आळं पुन्हा पुर्वीसारखं करा. अर्थात मोठा पाऊस सुरु झाल्यावर जर आळ्यात पाणी साचून रहात असेल तेव्हा आळं फोडून अतिरिक्त पाण्याला बाहेर वाहून जाण्याचाठी रस्ता करुन द्यायला विसरू नका.

५. पाऊस सुरु होताना किंवा त्यापूर्वी वेगाने वारे वाहू लागण्यापूर्वी झाडांचा आकार आटोपशीर करुन घ्या. फांद्यांचे वरचे भाग छाटून घ्या. झाडाचा आकार आटोपशीर ठेवा. अर्थात पाऊस अजून सुरु झाला नसेल व उन्हाची तीव्रता अधिक असेल तर असं प्रुनिंग करु नका. एखाद दोन सरी येऊन गेल्या, वातावरणार गारवा आला की मगच करा. झाडाची योग्य आकारात शाखीय वाढ होण्यासाठी हे गरजेचं असतं. नंतर फळं फुलं काढण्य़ासाठीही हे सोपं जातं.

६. बागेत जास्तीचा पाचोळा असेल तर सर्व झाडांच्या बुंध्यापाशी तो सारख्या प्रमाणात साठवून ठेवा. यामुळे रानटी गवत आटोक्यात रहातंच पण झाडालाही खत मिळतं.

७. जमिनीलगतच्या फांद्या छाटून घ्या. जमिनीपासून झाडाच्या आकारमानाप्रमाणे दीड ते दोन फूट जागा मोकळी असायला हवी. पावसाळ्यात जास्तीचं गवत वाढेल तेव्हा बुंध्यापाशी साप वगैरे काही जाऊन बसलं असेल तर ते सहजच नजरेस पडेल याकरिता खालची जागा शक्यतेवढी मोकळी ठेवा.

८. कितीही कंट्रोल केलं तरी पावसाळी गवत येतच रहातं. साधारणपणे आपल्या हातात सहज येईल त्यावेळीच व गवत फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच मुळासह उपटून काढून घेऊन त्याचे किमान दोन तरी तुकडे करुन झाडाच्या बुंध्यातच टाका. तिथेच त्याचं खत होईल.


© राजन लोहगांवकर

वानस्पत्य 

२ टिप्पण्या:

  1. फेसबूक वरून तुमचा लेख वाचून इथपर्यंत आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ची कामे यावरील लेख माहितपूर्ण आहे. असेच मार्गदर्शन भविष्यात मिळेल ही सदिच्छा🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद. मला जे काही ठाऊक आहे ते इथं सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. तुमच्या शब्दांनी हुरुप आला.

      हटवा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...