पावसाळ्यापूर्वीची कामं - गच्चीवर बाग असणाऱ्यांसाठी

पावसाळ्यापूर्वीची कामं - गच्चीवर बाग असणाऱ्यांसाठी


मंडळी थोड्याच दिवसांत पावसाला सुरुवात होईल. पाऊस एकदा सुरु झाला की सुरुवातीचे काही दिवस आपल्याला फार काही करता येणार नाही. अन पाऊस जेव्हा उसंत घेईल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. म्हणून अजून हातात वेळ आहे तोवर पावसाळ्यापूर्वीची काही कामं आपण केली तर पावसाळ्यात आपल्याला भाज्या व इतर फुलझाडं वगैरेंनी आपली बाग आपल्याला सुशोभित करता येईल. तेव्हा त्यासाठी काही सुचना व सल्ले. बागकाम करणाऱ्या तीनही प्रकारांसाठी. म्हणजे कुंडीमधली बाग, गच्चीवरची बाग अन जमिनीवरची मातीमधली बाग करणाऱ्या सर्वांसाठीच.


१. काय भाजी लावायची आहे व कुठे हे निश्चित करुन घ्या. 

२. उपलब्ध जागेप्रमाणे वाफे बनवुन घ्या. गच्चीवर वाफे बनवणं शक्य नसेल किंवा व्यवहार्य अथवा सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याचं असेल तर मोठे ट्रे वा कुंड्या घ्याव्या. घरगुती भाज्यांची मुळं सहा ते आठ इंच एवढीच असतात. त्यामुळे जास्तीत जास्त फूटभर खोल कुंडी वा तत्सम गोष्ट आपण भाजी लावण्यासाठी घेऊ शकतो.

३. दोन्ही प्रकारात, म्हणजे कुंडी वा वाफा यापैकी कुठल्याही प्रकारात मातीमधे खतं मिसळणं गरजेचं आहे. यामधे माती+शेणखत+कंपोस्ट खत+निमपेंड हे सगळं मिसळून घ्यावं. खालच्या भागात पालापाचोळा वा उसाची चिपाडं पसरवून घेऊन त्यावर हे सगळं मिश्रण घालून मध्यभागी थोडासा उंचवटा व सर्व कडांनी उतार अशा प्रकारे कुंडी वा वाफा भरुन घ्यावा. हलक्या हाताने पाणी घालून घडी न मोडता सारी माती भिजवून घ्यावी. पाच सहा दिवसांत रानटी बिया असल्या तर त्या रुजून वर येतील. छोटं खुरपं असेल तर किंवा लोखंडी पंजा किंवा काहीच नसलं तर हाताने मातीचा वरचा भाग चांगला वर खाली करावा. म्हणजे ही रानटी रोपं मुळासह निघून मातीत मिसळली जातील.

४. माती सारखी करून पुन्हा पहिल्यासारखी करुन घ्यावी. मग आपण ठरवल्याप्रमाणे बिया जास्तीत जास्त एक सेंमी जमिनीखाली जातील अशा बेताने पेराव्या. माती सारखी करुन हलक्या हाताने पाणी द्यावं.

५. माती पृष्ठभागावर कोरडी वाटली तरच थोडं पाणी देऊन ओलावा करुन घ्यावा. चार ते पाच दिवसांत बिया रुजुन वरच्या भागावर कोंब फुटलेले दिसू लागतील. जरूर भासली तरच पाणी द्यावं. या दिवसांत पाण्याचं बाष्पीभवन लवकर होत नसल्यामुळे वारंवार पाणी देण्याची गरज नसते.

६. आठ ते दहा दिवसांत रोपं बऱ्यापैकी वर येतील. काही बिया रुजल्या नाहीत अन त्या ठिकाणी मोकळी जागा असेल तर नवीन बिया पेराव्यात.

७. दोन आठवड्यांत आपण लावलेल्या रोपांव्यतिरिक्त वेगळं काही उगवून आलं असेल तर ते काढून त्याचे तुकडे करुन मातीतच टाका. त्याचं खत होईल.

८. पालेभाज्या असतील तर २१ दिवसांनंतर आपल्याला हवी तेवढी भाजी हलक्या हाताने कापून घ्या. नवीन फुटवे येत रहातील.

९. जर आपण टोमॅटो, वांगी, सर्व प्रकारची मिरची यापैकी कसल्या बिया पेरल्या असतील तर तीन आठड्यात रोपं वीतभर तरी झाली असतील. अशी सर्व रोपं काढून घ्या. वेगळ्या कुंड्या किंवा वाफा असेल तर तिथे किंवा आहे त्याच कुंडीत वा वाफ्यात आपल्याला ही रोपं पुन्हा लावायची आहेत.

१०. कुंडी किंवा वाफ्यातली माती वरखाली हलवून घ्या. घातलेलं खत मातीशी एकजीव झालं असेल. खाली घातलेला पाला किंवा उसाचं चिपाड कुजू लागलं असेल. ते खालीच राहूद्या. माती व्यवस्थित सारखी करून घ्या. आवश्यकता भासल्यास नीमपेंड किंवा इतर कुठलं कीडनाशक असेल तर ते घाला. खतही घातल्यास उत्तम.

११. माती पुन्हा पहिल्यासारखी करुन घेतल्यावर काढलेली रोपं लावून घ्या. मुळं संपूर्णपणे आत जातील हे पहा. रोपं ताठ उभी रहायला हवीत. आडवी पडू देऊ नका. गरज असल्यासच पाणी द्या. जास्त पाण्याने रोपं झोपण्याची शक्यता असते.

१२. वेळच्या वेळी रोपांची अवस्था पाहून, तिरकी झाली असतील तर बुंध्यापाशी हलक्या हाताने माती दाबून व गरज असेल तरच पाणी देऊन रोपांची काळजी घ्या.

१३. रोपं फूट दीड फूट उंच झाली की ती आपल्याच आधाराने उभी रहातील. पण तेवढं पुरेसं नाही. खासकरून वांगी व टोमॅटोसाठी तरी. यांना आधाराची गरज लागेल. तेव्हा रोपांच्या बाजूला जाडसर काठी मातीत खोचून रोपं हलक्या हाताने काठीला बांधून घ्या.

१४. साधारण चौथ्या ते पाचव्या आठवड्यात फुलं दिसू लागतील. काही जाती सेल्फ पोलिनेशनच्या असतात तर काहींना पोलीनेशन करावं लागतं. फुलांवर हलक्या हाताने टिचकी मारून पोलिनेशन होतं तर कधी कधी एका फुलावरून बोट फिरवून ते दुसऱ्या फुलावर लावलं की पोलिनेशन होतं. वस्तुतः नैसर्गिक रित्या पोलिनेशन होतच असतं. पण समजा नाहीच झालं तरच आपण हस्तक्षेप करावा. अन्यथा निसर्गाचं काम त्याच्यावरच सोपवून द्यावं.

१५. फुलं दिसल्यावर साधारण तीन ते चार आठवड्यात आपण फळभाज्या वापरासाठी तोडू शकतो. अर्थात प्रत्येक भाजीचा कालावधी हा वेगवेगळा असतो. पालेभाज्या तीन ते चार आठवड्यात तयार होतात. भेंडीही चार आठवड्यात तयार होते. गवार ५-६ आठवडे घेते तर वांगी टोमॅटो ६-७ आठवडे घेतात. भाजी व फळांची अवस्था बघून आपल्या लक्षात येईल की ती कधी काढणीला तयार होतील.

१६. पालेभाज्यांची काही रोपं व फळभाज्यांची काही फळं ही तशीच झाडावर राहूद्या. पालेभाज्यांना फुलं येतील. ती फुलं पूर्ण फुलुन गेल्यावर तिथेच आपल्याला पुढील लागवडीसाठी बिया मिळतील. तसंच भेंडी, वांगी वगैरे फळं पूर्ण पक्व झाल्यावर वाळली की आपल्याला बिया मिळू शकतील.

१७. रोपांकडे वेळोवेळी लक्ष द्या. कीड लागली आहे असं दिसताच बाधीत पानं लगेचच काढून दूर फेकून द्या व झाडांवर कडूलिंबाचा अर्क वा तंबाखूचं पाणी वगैरे फवारा. सध्या अतिशय लोकप्रिय असलेलं कांद्याच्या सालींचं पाणीही फवारायला हरकत नाही.


© राजन लोहगांवकर

वानस्पत्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...