झाडांसाठीची_पोषकतत्वं - लेखांक ०४

झाडांसाठीची_पोषकतत्वं

लेखांक ०४


शेतकरी जेव्हा मोठ्या प्रमाणात शेती करतो तेव्हा ही सारी अन्नद्रव्यं पेरणीच्या आधीपासून ते पीक काढून पुन्हा जमीन मोकळी करेपर्यंत वेळच्या वेळी देतच असतो. त्याला या खतांच्या वेळा अन मात्रा म्हणजे जमिनीच्या किती भागाला किती क्वांटिटीमधे खतं द्यायची हे पूर्ण माहित असतं. त्यामुळे तो कधीही पिकांमधे यापैकी कुठल्याही अन्नाची कमतरता असल्यास लक्षणं दिसण्याची वाट पहात नाही.

पण आपल्याकडे तो अनुभव नाही की ती नजरही नाही. आपण आहोत हौशी कुंडीकरी. बी पेरल्यापासून ते तिच्यापासून भेंडी वा टोमॅटो बनुन आपल्या ताटात पडणं हा आपल्यासाठी आहे एक छंद. आपण त्याचं कॉस्टिंगही कधी काढत नाही, की काढलेली एक किलो भेंडी किंवा टोमॅटो आपल्याला काय भावाने पडले. तर लावलेल्या रोपांच्या खतपाण्याच्या वेळा सांभाळणं अन लक्षणं पहाणं हे आपण काय करणार? अन या सगळ्या नोंदी ठेवुन त्याप्रमाणे सगळं करणं हे अपेक्षितही नाही. अर्थात तशी जागरुकता वाढवण्याची गरज आहे. तरच खर्च कमी करुन आपल्यालाही जास्त उत्पादन मिळवणं शक्य होईल. अन त्याचसाठी हा लेख.

तर ही सगळी अन्नद्रव्यं आपण कशा प्रकारे, तेही सेंद्रिय प्रकारे कशी देऊ शकतो? साधारणपणे एनपीके व डीएपी तसंच कॅल्शियम व गंधक वगैरे शेतकरी सहसा रासायनिक पद्धतीनंच देत असतात. कारण एकच. जो फरक ऍलोपथी व आयुर्वेदिक औषधं यांमधे आहे तोच. दोन्ही प्रकारांमधली खतं वा औषधं खतांसाठी उपलब्ध होण्यास लागणारा वेळ. सेंद्रिय खतं देऊन ती मातीमधे मिसळून पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध होईपर्यंत काही आठवडे जाऊ शकतात पण तेच जर रासायनिक खतं वापरली तर कमी मात्रेत जास्त परिणाम अन तोही काही दिवसांतच दिसतो. अर्थात यामुळे मातीचा कस वा पोत कमी होणं वगैरे गोष्टी निश्चितच आहेत. पण त्यावरही पुन्हा रासायनिक उपायच केले जात असल्यामुळे एका दुष्टचक्रात अडकल्यासारखी स्थिती होते.

आपण हे सगळं टाळून सेंद्रिय प्रकारे आपल्या घरच्या बागेत जर या भाज्या व फळं घेतली, त्यांची खतांची व अन्नद्र्व्यांची गरज लक्षात घेऊन, सुरुवातीच्या काही फेऱ्यांमधे निरीक्षणं करुन व त्यांच्या नोंदी ठेऊन जर त्याप्रमाणे वेळापत्रक बनवुन ते व्यवस्थित अन काटेकोरपणे पाळलं तर सकस भाज्या अन फळफळावळं आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. तेही कुठलंही कीटकनाशक न फवारता.

आपण नेहमी जी सेंद्रीय खतं वापरतो ती म्हणजे शेणखत, गांडूळखत व कंपोस्ट. या तीन खतांमधून वरील सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता होतेच. पण याबरोबरीनं जर आपण अशा खतांच्यासोबतच बोनमील, नर्सरीमधे उपलब्ध असलेलं जनावरांच्या रक्त-मांस मिश्रीत खत, सीवीड, मासळीखत, भुईमुगाच्या शेंगांची टरफलं, अंड्यांच्या कवचांचे बारीक तुकडे, कंपोस्ट टी, वापरलेली कॉफी पावडर, ताकाचं पाणी हे सगळं देत राहिलो तर इतर कुठलंही खत देण्याची आपल्याला गरज पडणार नाही. सोबतीनं जीवामृत अथवा वेस्ट डिकंपोजरचं पाणी दिलंत किंवा वरील खतं वेस्ट डिकंपोजरच्या पाण्यात विरघळवुन वा मिसळून दिली तर ती रोपांना सेवन करण्यास लवकर उपलब्ध होतील. अन एकदा रोपं निरोगीपणे वाढली की त्यांच्यावर फारशी कीडही पडणार नाही.

वर लिहिलेली तीन प्रमुख सेंद्रिय खतं दर दोन आठवड्यांनी कुंडीच्या आकारमानाप्रमाणे मूठभर ते ओंजळभर देताना त्यामधे इतर खतं चमचा दोन चमचे मिसळली तरी पुष्कळ होतं. किंवा शेणखत वगैरे कुंडीच्या वरच्या भागात दिल्यावर दोन दिवस आधी वेस्ट डिकंपोजरच्या पाण्यात बोनमील वा इतर खतं भिजवुन ठेवुन ते पाणी कुंड्यांत दिल्यास त्याचा फायदा अधिक होतो. आपल्या कुंडीची साईज व तीमधील रोपाचा आकार अन वय यांचं प्रमाण अंदाजे ठरवुन घ्यावं अन त्याप्रमाणे खतं द्यावीत. फक्त खतं आलटुन पालटुन द्यावीत. म्हणजे आज शेणखत दिलं असेल तर पुढल्या खेपेला गांडूळखत द्यावं, त्याच्या पुढच्या वेळी कंपोस्ट द्यावं. यासोबतीनं न चुकता मल्चिंग केलं म्हणजे अशा खतांची कामं जलद गतीनं सुरु होऊन रोपांसाठी ती लवकरात लवकर उपलब्धही होतील.

पुढे दिलेली यादी व उपायांमधून आपल्याला याविषयी अधिक माहिती मिळेल;

मासळीखत : मासळी धुतल्यावरचं पाणी किंवा मासे साफ करुन उरलेल्या कचऱ्यापासून बनवलेलं खत. यामधे ऑर्गॅनिक एनपीके असतो. त्यातही नत्राचं प्रमाण पी अन के पेक्षा जास्त असतं.

बोनमील : म्हणजे हाडांचा चुरा. यामधे फॉस्फरस आणि नत्र विपुल प्रमाणात असतं. कंदवर्गिय भाज्या वा जी फुलं कंद लावुन घेतली जातात आणि जी रोपं ट्रान्सप्लांट करुन लावली जातात अशांसाठी हे फारच उपयुक्त आहे.

ब्लडमील : खाटीकखान्यात जेव्हा प्राणी कापले जातात तेव्हा त्यांचं रक्त, हाडांचे व मांसाचे बारीक तुकडे मातीमधे मिसळले जातात. अशी माती नर्सरीमधे उपलब्ध असते. यामधेही नत्राचं प्रमाण भरपूर असतं.

कोंबडीखत आणि लेंडी खत : पोल्ट्रीमधुन कोंबड्यांची विष्ठा मिसळलेली माती तसंच शेळ्या-मेंढ्या-बकऱ्यांपासून मिळालेलं लेंडीखत हेही एक उत्तम सेंद्रिय खत आहे. फक्त वापरताना याचं प्रमाण खूपच कमी असायला हवं. कारण हे अतिशय उष्ण असतं व जास्त प्रमाण झाल्यास रोपं दगावण्याचीही शक्यता असते.

गुळाचं पाणी : गुळामधे भरपूर प्रमाणात फॉस्फरस असतो. आणि हेच कारण असतं गुळाचा आपल्या आहारात जास्तीत जास्त वापर करण्यामागे. हेच कारण जीवामृत व वेस्ट डिकंपोजरचं द्रावण बनवतानाही गुळ का वापरला जातो याचंही असतं. केवळ हेच नाही तर विविध फळांची एन्झाईम्स व इतर सेंद्रिय खतं बनवताना सेंद्रीय गुळाचा वापर केला जातो. तेव्हा इतर कुठलंही द्रवस्वरुपामधलं खत नसेल तर कंपोस्ट टी बनवुन त्यामधे थोडा गुळ मिसळून दिल्यास खुपच फायदा होतो.

© राजन लोहगांवकर

वानस्पत्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...