बियांची साठवण - भाग १

बियांची साठवण - भाग १

बियांची साठवण कशी करायची या विषयाला हात घालण्यापुर्वी आपण ती का करायची हे पहाणं जास्त महत्वाचं आहे. बियांच्या साठवणीमागं आपला वेळ अन पैसा वाचवणं ही कारणं फारच क्षुल्लक आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांत हायब्रीड बिया वापरुन घेतलेल्या पिकाचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. बऱ्याचशा प्रकारच्या देशी बिया या अस्तंगत झालेल्या आहेत. याला जबाबदार जशा हायब्रीड बियांची विक्री करणाऱ्या कंपन्या आहेत तसंच आपणही आहोत. किंबहुना या परिस्थितीला आपणच जास्त जबाबदार आहोत. तुलनेनं स्वस्तात काही मिळतंय अन ते सुरुवातीला कमी त्रासाचं अन जास्त उत्पन्न देणारं जरी भासलं तरी पुढं जाऊन ते किती महाग पडलं हे आज आपल्याला बऱ्यापैकी उमजलेलं आहे.

जमिनीची सुपीकता गेली आहे, निसर्गचक्रात केलेले बदल दुरुस्तीपलिकडं जात आहेत. पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत आहेत. त्यांचं निर्मुलन करण्यासाठी विविध प्रकारची रासायनिक खतं अन कीटकनाशकं यांचा वापर होत आहे. यापैकी काहींचे अंश हे अन्नावाटे आपल्याही शरिरात जात आहेत. कारण पिकांना दिलं गेलेलं रसायन जास्त प्रमाणात वापरलं गेलं असेल किंवा दिलेला भाग पिकानं घेऊन पचवला नसेल तर त्याचा थोडातरी अंश आपल्या पोटात जाणं अपरिहार्यच आहे. तो पचवण्यासाठी आपली शारिरीक ठेवण अन अंतर्गत रचना पूरक नसल्यानं तो शरीरातच कुठंतरी साचणं अन त्याचे दुष्परिणाम भयंकर रोगांद्वारे आपल्याला भोगावे लागणं हे आता नवीन राहिलेलं नाहीये. लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर सारखे विकार, अकाली वृद्धत्व हे सगळं आता समाजाच्या सर्वच वर्गात दिसू लागलंय. हिशेब केलात तर आपल्या अन्नासाठी केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च आज आपल्याला वेगवेगळ्या औषधांसाठी करावा लागत आहे. रासायनिक खतांची अन औषधांची ही कधीही न संपणारी साखळी आहे अन कळत नकळत अन इच्छा नसतानाही आपण त्यात ओढले गेलो आहोत. (आठवत असेल तर आठवुन पहा. काही वर्षांपुर्वी पंजाबमधे सॉफ्ट ड्रिंकमधे अधिक प्रमाणात रसायनांचा अंश सापडल्यावर असं सिद्ध झालं होतं किंवा करुन दाखवलं होतं की शेतात वापरली जाणारी रासायनिक खतं अन कीटकनाशकं ही पाण्याबरोबर वहात जाऊन ती नदीत मिसळली गेली अन ते पाणी पेप्सी अन कोकाकोला कंपन्यांनी आपल्या प्रॉडक्शनसाठी वापरल्यामुळं ती रसायनं पेप्सी अन कोकमधे अधिक प्रमाणात सापडली होती.)

हायब्रीड बीजांच्या कंपन्यांनी केवळ आपल्याला त्यांच्या नादीच लावलं असं नाहीये तर आपल्याकडच्या देशी वाणाच्या बिया घेऊन त्या नष्टही केल्या आहेत. त्यासाठी जे काही साम-दाम-दंड-भेद अवलंबावं लागलं तेही त्यांनी केलं आहे. तात्कालिक फायद्याला बळी पडून आपण त्यांच्या म्हणण्याला बळी पडलो आहोत हे सत्य नाकारता येणार नाही. एक लक्षात घ्या, या कंपन्या फार मोठ्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या आपला व्यवसाय करीत असतात. या कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक असल्या तरी सामान्य शेतकऱ्यांशी लढताना त्या एकत्र येतातच. अशा कंपन्या स्थानिक वाणाच्या पुरवठादारांबरोबर कायदेशीर लढाया जिंकल्याचीही उदाहरणं आहेत. (https://kulturpflanzen-nutztiervielfalt.org/press-release-july-16-2012-european-court-justice-confirms-sales-hurdles-plant-biodiversity) आणि (https://european-seed.com/2020/09/the-court-of-justice-of-the-european-union-sheds-light-in-case-c-176-18-on-the-scope-of-eu-plant-variety-rights/) (इथं एक गोष्ट लक्षात घ्या की या कंपन्या तुमच्या शेतातही शिरुन तुम्ही लावलेली झाडं अन त्यापासुन येणारी फळं या वर वर पहाता क्षुल्लक गोष्टीही कोर्टात घेऊन जाण्यास मागंपुढं पहात नाहीत. अन आपल्याकडं रस्त्यावरुन जाताजाता आपण सहजच एखाद्याच्या बागेतली फांदी तोडून नेतो, वर घरमालक काही बोलला तर त्यालाच सुनावतो. लिंकमधे दिलेल्यांपेक्षाही पुष्कळ दाखले आहेत जिथं "कंपन्याच" जिंकल्या आहेत अन त्यांना वकीलांच्या "फिया" परवडत असतात. सामान्य शेतकरी केस शेवटपर्यंत लढला तर जिंकुही शकेल, पण त्यासाठी हवं आर्थिक बळ अन साथीला उभे रहाणारे अन्य शेतकरी अन पुढारी.)

असो. या सगळ्या कोर्टकज्जे, कायदेशीर अधिकार, बलवानांच्या पाठीशी उभे रहाणारे कायदे अन सत्ताधीश यांच्यामुळंच बियांचे जे काही वाण आज शिल्लक आहेत ते वाचवणं अन वाढवणं याची जबाबदारी आपल्याच शिरावर आहे. अन ती आपण पूर्णपणे पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा पुढील पिढीला केवळ हायब्रीड किंवा जेनेटिकली मॉडिफाईडच नव्हे तर इतरही प्रकारे मॉडिफिकेशन्स केलेल्या बियांपासून घेतलेलं अन्न खाण्यावाचून कुठलाही पर्याय उपलब्ध रहाणार नाही अन आपण कळत नकळत कुणाच्यातरी हातचं बाहुलं बनून गेलेलो असू. सध्याच्या करोनाच्या स्थितीवरुन तरी ते आपल्या ध्यानात यायला हवं अन पटायलाही हवं आहे.

तेव्हा देशी वाणाचं रक्षण अन संवर्धन करणं हे आपण "मीच का?" किंवा "सरकारनंच काहीतरी करायला हवं" असा कुठलाही विचार न करता करायला हवं आहे. नव्हे, ती काळाची गरज आहे हे ध्यानात घ्यायला हवं. एकदा आपण हे कार्य हाती घेतलं की जे समाधान आपल्याला मिळेल ते केवळ बागकामानं मिळणाऱ्या समाधानापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त असेल याची खात्री बाळगा.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...