तुळस

तुळस



तुळशीचे खूप सारे औषधी उपयोग आहेत. हिंदूंसाठी ती पूजनीय आहे. प्रत्येक घराच्या दारात तुळशीचं रोप लावलेली कुंडी ही असतेच असते. आपल्या पूर्वजांनी तुळशीचं औषधीमूल्य जाणल्यामुळंच तिला देवत्व बहाल केलं अन त्यामुळं नसते गैरसमजही पसरले. तेही गेल्या काही वर्षांतच. त्यावर आजवर पुषकळशी चर्चा अन लिखाण झालेलं असल्यामुळं त्यात नवीन सांगण्यासारखं काहीच उरलेलं नाही अन म्हणूनच ते लिहिण्याचं टाळत आपण तुळशीच्या रोपाची काय काळजी घ्यावी यावरच चर्चा करु. 

तुळशीची रोपं तयार करणं ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे. घरोघरच्या तुळशीच्या बिया उन्हाळ्यातल्या वाऱ्यामुळं इतस्ततः पसरतात अन पावसाळ्यात रुजतात. अशी रोपं काढून आपण आपल्या बागेत योग्य त्या ठिकाणी लावु शकतो. तसंच बियांपासूनही आपण रोपं करु शकतो व फांद्यांपासुनही रोपं तयार करु शकतो. तुळशीतही अनेक प्रकार आहेत. आपण आपल्या आवडीप्रमाणं अन मुख्य म्हणजे आपल्या परिसरात जे वाण जास्त टिकतं वा बहरतं ते वाण निवडून लावावं.

साधारणपणं तुळशीच्या रोपाचं आयुर्मान सरासरी ३ वर्षं असतं. अपवादात्मक परिस्थितीत अन जातीनुरुप हे कमीजास्तही होत असतं. काही ठिकाणी वर्षानुवर्षं तुळशीची रोपं असल्याचंही पहायला मिळतं. तुळस जरी कुठल्याही मातीमधे रुजत असली तरी पाण्याचा चांगला निचरा होणारी अन भरपूर पोषणमुल्यं असणारी जमीन तिला मानवते. कुंडीत जर तुळस लावायची असेल तर त्यातील माती सेंद्रीय खतांनी पुरेशी युक्त असायला हवी. त्याबरोबरच पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होणारी हवी. जर आपल्या अंगणात तुळशीसाठी कायमस्वरुपी वृंदावन केलेलं असेल तर ते बांधतानाच जास्तीचं पाणी वाहून जाण्यासाठीची व्यवस्था केलेली असावी. त्यामधे माती भरताना कंपोस्ट, गांडूळखत किंवा शेणखत हे भरपूर प्रमाणात घालावं.

तुळशीला उन्ह जरी मानवत असलं तरी तिला उन्हाळ्यातलं तीव्र उन्ह सहन होत नाही. सहा ते आठ तासांचा सूर्यप्रकाश जरी आवश्यक असला तरी मध्यान्हीच्या तीव्र उन्हात रोपाची काळजी घ्यायलाच हवी. महिन्यातुन किमान एकदा तरी सेंद्रिय खत देणं हे गरजेचंच असतं. तुळस म्हणजे देवता, मग तिला शेणखत कसं चालेल किंवा कांद्याचं पाणी कसं चालेल वगैरे विचारांच्या फंदात न पडता रोपासाठी आवश्यक ती अन्नद्रव्यं देण्याचं काम करावं. केवळ पाण्यावर कुठलाही जीव फार काळ जगत नाही हे वैश्विक सत्य आहे हे मनात ठसवुन घ्यावं.

सर्वात महत्वाचं म्हणजे तुळशीकडं बागेतलीच एक वनस्पती याच नजरेनं पहाण्याची गरज आहे. म्हणजे तिची छान निगा राखता येईल. तिला आवश्यक ते खतपाणी देता येईल. वेळच्यावेळी तिची छाटणीही करता येईल. तुळशीला दिलेलं देवत्व हे तिच्या औषधी गुणधर्मांवरुनच आहे. त्यामुळं देवांना आंघोळ घालुन ते पुजेचं पाणी ज्यात हळद अन बाजारात मिळणारं केमिकलयुक्त कुंकु मिसळलेलं असतं ते घालू नये. असं पाणी कुठं टाकावं हे आपलं आपण ठरवावं पण ते तुळशीलाच नव्हे तर कुठल्याही झाडांना घालू नये.

बरेंचदा तुळस जगत नाही अशा तक्रारी येत असतात. तशी अवस्था टाळण्यासाठी पुढील उपाय करावेत;

* अती पाणी देणं टाळायला हवं. मातीचा वरचा इंचभराचा थर वाळल्याशिवाय पाणी देऊ नये.

* तुळशीला उन्ह जरी मानवत असलं तरी तीव्र उन्हात तुळशीला अर्धसावलीत ठेवणं वा हलवता येत नसेल तर वर कापडाचा मांडव घालणं हे आवश्यक आहे.

* तुळशीवरही कीड पडत असते. तेव्हा कीड घालवण्यासाठी पाण्याचा जोरदार फवारा, किंवा त्यात थोडा साबण वा किंचितसं मीठ घालून जोरदार फवारा केल्यावरही कीड जाते.

* तुळशीच्या रोपाच्या आजुबाजुला झेंडू, कांदा, लसूण लावल्यास देखील कीडीपासून संरक्षण करता येतं.

* तुळशीच्या वाळलेल्या फांद्या अन मंजिऱ्या यांची नियमित छाटणी करावी.

* तुळशीलाही खताची गरज असते. तेव्हा कंपोस्ट, शेणखत, गांडूळखत, जीवामृत वा वेस्ट डिकंपोजरचं पाणी वगैरे नियमितपणं देत रहावं.

* बागेतील इतर झाडांना जर कांद्याच्या सालींचं पाणी, नीमपेंड वगैरे देत असाल तर ते तुळशीलाही द्यायला हरकत नाही.

* तुळशीच्या रोपाची नियमित छाटणी करत राहिल्यास त्याला नवीन फुटवे येतात अन रोप सदाहरित रहाण्यास मदत होते.

* बिया नको असतील तर मंजिऱ्या पूर्ण वाळेपर्यंत न थांबता वरची दोन-चार फुलं फुलल्यावर लगेचच देठापर्यंत तोडावी. म्हणजे रोपामधलं अन्न मंजिऱ्यांचं पोषण करण्यासाठी न वापरता नवीन पानं तयार करण्यासाठी वापरलं जाईल.

* तुळस ही झुडुप प्रकारातील वनस्पती असल्यानं तिची योग्य छाटणी करत राहिल्यास ती व्यवस्थित बहरत रहाते,

एकदा तुळस हे बागेतील इतर रोपांप्रमाणंच एक, फक्त अधिकचे औषधी गुण असलेलं रोप असं मनात पक्कं केल्यावर त्याची निगा राखण्यात कुठलीही अडचण येत नाही. अन काही कारणानं रोप दगावलंच तर त्यातून कुठलाही गैरअर्थ किंवा नकारात्मक इशारा न समजता दुसरं रोप लावावं. तुळस बागेत एक औषधी वनस्पती म्हणून लावा. तिची पानं नियमित चहामधे घालून वा इतर कुठला काढा वगैरे करत असाल तर त्यात घालुन प्या. कारण तुळशीच्या पानात एक गुण आहे जो इतर कुठल्याही वनस्पतींच्या पानांत नाही. अन तो म्हणजे ज्या औषधासोबत वा काढ्यासोबत तुम्ही तुळशीच्या पानाचा काढा वा रस घ्याल तो काढा रक्तात लवकर मिसळण्यास मदत होते. अन हेच कारण आहे तुळशीची पानं काढ्यात घालण्याचं व नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचं पान ठेवण्याचं. तुळशीचं महत्व लोकांमधे पसरवण्यासाठीच तिला देवत्व दिलं गेलं आहे.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...